गानसरस्वती आणि दिव्यत्व
परवा कुलदिप आणि मी, आपण शब्द किती उथळपणे वापरतो ह्यावर बोलत होतो. केवळ आपल्याला माहिती असतात, संग्रहात असतात, त्यांचे पुस्तकी अर्थ माहिती असतात म्हणून उच्चारले जातात, त्यात नुसताच जीभ, टाळूचा वापर असतो. त्या शब्दांची खोली, वजन, रुंदी मात्र आपल्याला प्रसंगानुरूपच जाणवते. तेव्हा शब्द म्हणजे काय हे ख-या अर्थाने उमगतं.
गानसरस्वतीला ऐकताना मला दिव्यत्व ह्या शब्दाची छटा दिसते, समजते. छ्टा ह्यासाठी कारण त्या देतात तो अनुभव आणि दिव्यत्व हा शब्द, दोन्हीचा पूर्ण अर्थ लागण्याची माझी कुवत नाही. मी जेव्हा जेव्हा त्यांना समोर बसून ऐकते तेव्हा डोळ्यांनी दिसत नसलेल्या, पण अस्तित्वात असलेल्या एका निराळ्या विश्वात त्या मला नेतात. त्यांचं गाणं तांत्रिक दृष्ट्या कसं झालं, रसिक तृप्त झाले की नाही, ह्यात मला स्वारस्य नसतं. मला तंत्रातलं काही कळत नाही, ताईंचंच काय, कुणाचंही मोजमाप करायचा माझा आवाका नाही. पण कानावर पडणा-या स्वरांत माधूर्य असतं, जिव्हाळा असतो, आदर असतो, प्रसन्नता असते, समाधान असतं, शांतता असते, माझं मन तिथे एकाग्र होतं आणि ह्यातल्या कशातूनही आनंद आणि सौंदर्य वेचून वेगळं काढता येत नाही, ते तिथे अंगभूत असतं. प्रत्येक कलाकार त्याच्या आणि आपल्यामधे पूल बांधत असतो, आपल्या अंतरंगाशी आपले सूर जुळवून पहात असतो, प्रत्येकाशी ते जुळतातच असं नाही. ताई मला त्या पूलावरून कित्येक योजने पुढे नेत वरती लिहिलेल्या सर्व पाय-यांवरून, त्या मला दिसत नसलेल्या पण जाणवत असलेल्या विश्वात नेत असतात. माझ्यासाठी ते फक्त स्वरोद्यानं फुलवणं, स्वरांचे निरनिराळे सुबक आकृतीबंध रचणं इतकं ते मर्यादित उरत नाही. मला त्यापलिकडे कुठेतरी पोचवलं जातं, ते काय असतं मला सांगता येणार नाही. समोर गात असलेल्या स्त्रीला राग-लोभ, स्वभाव, बरे-वाईट प्रसंग, आघात, आनंद सर्व काही माझ्याप्रमाणेच आहे. पण त्या कशाचंही प्रतिबिंब स्वरावर उमटू दिलं जात नाहिये. ही दोन स्वतंत्र जगणी आहेत. स्वर साधनेबरोबरच ह्यासाठीही केलेली तपश्चर्या आहे ही. मी गाणं ऐकून निर्ममपणे उठून चालू लागू शकत नाही. वरती चढलेल्या पाय-यांचे पडसाद पुढे माझ्या आयुष्यात पडत रहातात. मला लक्षात येतं की निव्वळ अन्न, वस्त्र, निवारा इतक्याच बाबींवर माझं भागू शकत नाही, या वरच्या सर्व गोष्टीही माझ्या गरजा आहेत, मी त्यांशिवाय जगू शकणार नाही. त्या अर्थानं माझ्या गरजा मोठ्या आहेत. ह्या समोर बसलेल्या स्त्रीसोबतचं हे माझं व्यक्तिगत अद्वैत आहे. ते प्रत्येक कलाकाराशी निर्माण होत नाही. कुमारांना आणि पंडितजींना मी प्रत्यक्ष ऐकलं नाही. तिथे ही अनुभूती मला आली असती असं खात्रीनं वाटतं. ही ८५च्या उंबरठ्यावर उभी असलेली स्त्री सलग काही तास नेटानं बसून गातेय, एकाच तडफेनं तीनही सप्तकांत लिलया विहार करतेय, ताना आलापीची आजही दिसणारी देखणी फिरत, वयपरत्वे आलेल्या शारिरीक मर्यादांचा स्वरांत मागमूस नाही की दर्जात तडजोड नाही, हे सगळं मी याची देही याची डोळा पहातेय. माझ्यासमोर मूर्तीमंत स्वर आहे, तो मी ऐकतेय, दिव्यत्वाची प्रचिती घेतेय. मी अंतर्मुख होतेय, नतमस्तक होतेय. दिव्यत्वाबरोबरच मेहनत, साधना, सामर्थ्य ह्याही शब्दांचा अर्थ उलगडतो आहे मला. ह्या सर्व अनुभूतींसाठी माझे कर आपोआप जुळतात.
ताईंना पुण्याची थंडी मानवली नसावी. त्या अधेमधे खोकल्याने त्रस्त होत होत्या. सुरुवात करताना स्वरात कंप होता. गळा सहकार्य करत नव्हता. गारठ्याने कुडकुडलेल्या मुलांना आपण सकाळी हळूहळू पांघरूणाचा एकेक पदर दूर करत, त्यांचे हात चोळत, उचलून जवळ घेऊन जागं करतो, तसं ताईंनी स्वरांना हळूहळू उब देत, मायेनं राजी करत पांघरूणातून बाहेर काढलं. आणि मग त्या आम्हाला स्वरपर्यटनाला घेऊन गेल्या. ताईंचा कधीही स्वरांवर आरुढ होण्याचा आवेश नसतो, त्या कधीही त्यावर स्वार होत नाहीत. त्या आजही स्वरांची आर्जवं करतात, मनधरणी करतात, ती अर्चना असते, श्रद्धा असते, निष्ठा असते. मला हे इतरत्र कुठे पहायला मिळत नाही, हे माझ्या ओळखीचं नसतं, मला हे विलक्षण वाटतं. माझे डोळे घळघळतात. डोळे वहाणं ही मातब्बरी नव्हे, पण आतल्या ओलाव्याचा ओहोळ कुठल्या अद्भूत स्पर्शाने खळखळायला लागतो, तो स्पर्श फरक पाडतो. त्या दृष्टीनं मी भाग्यवान आहे. मी अनेक गोष्टींनी भाग्यवान आहे तशी. मी तुम्हाला प्रत्यक्ष ऐकू शकतेय, त्याचं महत्त्व समजण्याइतकी समज सुदैवाने मला आहे, मी पुण्यात आहे, तुम्ही माझ्या घराजवळ गायला आलायत, आधल्या संध्याकाळपर्यंत काहीही ठरलं नसतानाही ऐनवेळी माझ्यासाठी तिकिटाची केली गेलेली सोय, अशा कितीतरी गोष्टी. तुम्हाला ऐकावं असं वाटणारे हजारो असतील ताई. गाण्यात गती असलेला पण मोलमजुरी करणारा एखादा कामगार असेल, मला कार्यक्रमाला जायचंय असं म्हणायला धजू न शकलेली एखादी स्त्री असेल, परावलंबी जीवन असणारा एखादा रुग्ण असेल, काना-कोप-यातल्या एखाद्या खेड्यात रहाणारी एखादी तरुणी असेल, भारताबाहेरचे येऊ न शकणारे, भारतात कुठे कुठे लांब असणारे, किंवा अगदी पुण्यातच असणारे, यायची अनिवार इच्छा असूनही कित्येक कारणांनी येणं जमवू न शकलेले माझे अनेक मित्र-मैत्रिणी असतील...
ताई, माझा मित्र अविनाश म्हणत असे की आपलं आयुष्य ही एक रांगोळी असते. कोणते ठिपके कुठे, कधी, कसे जुळणार, कोण कोणते रंग भरणार याबद्दल आपण अगदी अनभिज्ञ असतो. आयुष्याच्या अंतापर्यंत हे बिंदू जुळत रहाणं अखंड सुरू रहातं. एका बिंदूपासून दुस-या बिंदूपर्यंतच्या प्रवासात आयुष्यातले खाच-खळगे, सुख-दु:खं येतात. नंतर मागे वळून पहाताना मात्र त्या रेषेचं सुरेखन होऊन गेलेलं दिसतं. हा मला आजवर सर्वात आवडलेला आणि पटलेला सिद्धांत. वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला भेटलेल्या सुहृदांबद्दल विचार करताना तो सिद्ध होत रहातो, आपली रांगोळी मनोहर होताना दिसत रहाते. तुम्हीही माझ्या आयुष्याच्या रांगोळीतला एक बिंदू आहात, तुम्ही फार विलोभनीय रंग भरत आलाय माझ्या रांगोळीत. तुमच्या पायावर डोकं टेकवण्याची मनस्वी इच्छा झाली. ते शक्य नव्हतं. अशी इच्छा असणारे त्या क्षणी तिथे शेकडो असतील.
शतायुषी व्हा ताई, अशाच गात रहा. हा स्वार्थ आहे, तरीही प्रार्थना आहे, आम्हाला समृद्ध करत रहा. देव असेल तर तो तुमचं बरं करो.
No comments:
Post a Comment