नॉस्टॅल्जिया
मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. घराभोवती पाच मशिदी होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, गंजी गल्ली, आझाद गल्ली, शिवाजी मार्केट, महानगरपालिका, जेल ते पार मटण मार्केट एवढ्या परिसरात पसरलेल्या. बोहरी समाजाची एक मशीद तर घराच्या अगदी समोर. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री आठ, अशी नियमित अजान कानावर पडायची. तीही एकोनं. कारण सगळ्या मशिदींची बांग एकानंतर एक सुरू व्हायची. त्यापैकी काही अत्यंत अत्यंत सुरेल, ऐकताना ब्रह्मानंदी लागावी, इतक्या. रोज सकाळी शाळेत जाताना घुडणपीर दर्ग्यातनं शॉर्टकट घेत भाऊसिंगजी रस्त्याला लागायचं, मग ज्योतिबा रोडनं घाटी दरवाजातनं देवळात थेट आत शिरायचं, गाभा-यासमोर उभं राहून अंबाबाईला नमस्कार करून प्रदक्षिणा घालायची, मग पुढे महाद्वारातनं बाहेर पडून शाळेची वाट पकडायची. हा रोजचा परिपाठ. आज निव्वळ अविश्वसनीय वाटावा असा.
मोमीन, बागवान, दोडमणी, टिनवाले, कांचवाले, शेख असे सख्खे शेजारी. समोरच्या गल्लीत बाबांचे जीवलग मित्र रमजान मण्यार. रमजानकाका आणि बाबा एकदा ट्रक चालवत बेंगलोरला गेलेले वगैरे. आई भेंडे गल्ली पोस्टात जायची, तिथंही शेख म्हणून पोस्टमास्तर होते, त्यांच्या घरी सगळे डिस्टींक्शनवाले होते तेव्हा. बाकीचे काही आठवत नाहीत. शाळेत माझी बाकमैत्रिण रेश्मा बागवान. शनिवारच्या सकाळच्या शाळेसाठी माझी आई कधीच डबा द्यायची नाही, सकाळी निघताना पेलाभर दूध आणि मग थेट घरी जाऊन पानावर. रेश्माची आई मात्र दर शनिवारी डब्यात तुपावर खरपूस भाजलेले मिल्कब्रेडचे गोडसर स्लाइसेस आम्हा दोघींसाठीही पुरेसे द्यायची. मनात रुतलेली फार हृद्य आठवण आह तीे. आजही हिवाळ्यातल्या गारेगार सकाळी त्या डब्याच्या आठवणी येऊन मनाला उब येते. आमच्या घरामागच्या इमारतीत प्रसिद्ध गायिका गुलाबबाई कागलकर रहायच्या. दोन गल्ल्या जोडणा-या टिनवाल्यांच्या घरातनं ये जा करायचो. पकडापकडी खेळताना एकदा ते कुटुंब गोल करून अन्नाची भांडी मधे घेऊन जेवायला बसलेलं होतं. तरी आमची बाजूनं मागनं पळापळी चाललेलीच असताना मी धाडकन आमटीच्या पातेल्यातच पडले! तेव्हापासून मला घरात काय म्हणातात ते म्हणतातच. ते सांगायचं नसतंय.
टिनवाले वगळता बाकीची घरं लख्ख. रमजानकाका, पोस्टमास्तर शेखांकडंं तर चेहरे पाहून घ्यावेत इतकी नितळ फरशी आणि भांडी. रमजानकाका सुरमा आणायचे, आमच्या आजोबांना लागायचा. मग आजोबा आमच्याही डोळ्यात काडी फिरवायचे. अहाहा! शांत शांत वाटायचं. रमजान ईदला शिरखुर्म्याची किटली यायची. बकरी ईदला आठवडाभर आधी प्रत्येकाच्या परसात बक-या मुक्कामाला यायच्या. मग ते चा-यांचे भारे, लिदामुताचे विशिष्ट वास, त्यांचं दिवसागणिक वाढत जाणारं आणि शेवटच्या दिवसाला पुढची चाहूल लागलासारखं भासणारं करूण बेंबाटणं, आठवड्याभरात होणारा पुष्ट बदल. बोहरींच्या मशिदीत ईदच्या आधी आकांत सुरू व्हायचे, छाती पिटून, पिळवटलेल्या प्रार्थना करत स्त्री पुरुष निर्दोष असल्याचं कळवळून सांगत रहायचे. सकाळ संध्याकाळ करूण रुदन आणि बघवणार नाही इतका आत्मक्लेश.
प्रत्यक्ष ईदच्या दिवशी दारांबाहेर पडलेले मांडव, परसात पेटलेली चुल्हाणी, त्यावर मोठमोठ्या पातेल्यातून शिजणारे खाटखुट आणि खास त्यासाठी आलेले खानसामे, पाहुण्यांनी भरलेली घरं, पठाणी कुडते आणि क्रोशाच्या सुंदर टोप्या घातलेल्या यजमानांची लगबग, सजलेली पळणारी बागडणारी मुलंमुली, मेंदीनं हात (वडीलधारे स्त्री पुरुष केसही रंगवलेल्या) रंगलेल्या, ठेवणीतल्या झगमगीत साड्या पेहेनलेल्या आणि मोठमोठाले झुमके, जडजड खास नजाकतीचे मोठालेच दागिने घातलेल्या स्त्रियांच्या आचारी ते पाहुणे अशा येरझा-या, मोठ्यानं रंगलेल्या बागवानीतल्या गप्पा, मुलांवर चाललेली आरडाओरड, आसमंतात गच्च भरून दरवळणारे बिर्याणीचे खमंग वास असा माहौल असायचा. खूप आनंद असायचा हवेत. दिसायला आधीच छान असणारे लोकं आणखीच छान, तर बेतास बात असणारेही खुललेल्या चेह-यामुळं देखणे दिसायचे. कौसर, रुबाब, दिलशाद, उम्मेहानी, परवीन, शाहीन, बिल्लाल, सगळे धांदलीत असायचे. बोहरींच्या मशिदीत बुरख्यांचे आणि पुरुषांच्या टोप्यांचे अत्यंत सटल रंगसंगतींचे आणि कलाकुसरीचे अत्यंत बहारदार नमुने दिसायचे. फुलांचे ताटवे फुलल्यासारखं दृश्य असायचं ते. आमच्या खालीच मारियाताई, जोहेबदादा, मुन्नीताई, नफीसाताई रहायचे, आम्ही त्यांच्याकडे एकाच भल्यामोठ्या थाळ्यात पण वेगवेगळे वाटे करून सगळे मिळून एकत्र जेवायचो. असं असूनही कधीही कुणी आम्हाला आमच्या आहाराचा भाग नसलेलं काहीही खायला घातलं नाही. आमच्या घरच्यांनाही कधी कसल्या शंका नव्हत्या. दिवाळीला आमची फराळाची ताटं सगळ्यांकडं फिरायची.
दरवेळी ईद येऊ घातली की हे सगळं ओळखीचं, स्मरणात मुरलेलं मनाच्या पृष्ठभागावर दुधावरच्या सायीसारखं तरंगायला लागतं. माझ्याइतकेच आमचे आत्याकाकालोकंही ह्या स्मरणरंजनात रेंगाळतात. ईदचं त्यामुळं मनात एक खास खास स्थान आहे. तिला निर्धास्त स्वच्छंद बालपणाचा, आनंदाच्या दिवसांचा, निखळ शेजाराचा, निर्व्याज मैत्रीचा, धर्मरहीत आपलेपणाचा, मोठ्यांमधल्या समंजस विश्वासाचा, कानांवर प्रभातवंदनइतक्याच प्रभावीपणे सुरेल संस्कार करणा-या अजानचा, गोड बागवानीचा, सौहार्दाचा, हवेतल्या घट्ट सुरक्षिततेचा असे अनंत सुगंध लगडलेले आहेत. दरसाल बिल्लाल मुल्ला ईदला न चुकता खूप अगत्यानं शिरखर्म्याचं आमंत्रण करतात आणि मी हे सगळं पुन्हा अनुभवून घेते. सुखाचं असतं ते. ऊर्जा पुरवणारं, आयुष्य वाढवणारं. हे वातावरण भोवती असल्याचं मोल आज प्रकर्षानं जाणवतं आणि भाग्यवान वाटतं. माझ्या लेकालाही हे असं अनुभवायला मिळालं तर माझ्या खुशीला चारचाँद लागतील. कारण अगदी कुबेराइतकी ऐपत असती तरी हे बाजारातून विकत घेऊन देता यायचं नाही!
काल सगेसोयरे मिळून मुद्दाम मोमिनपु-यात इम्दादीत जाऊन असेच काही आठवणींचे क्षण पुन्हा वेचून आलो. आम्ही घासफुसवाले त्यामुळे फिरनी, तहुरा, खरबुज फालुदा, शाही तुकड्यापर्यंतच मजल मारली. पण जे सर्वाहार घेतात, त्यांनी अवश्य भेट देऊन आस्वाद घ्यावा असं ठिकाण आहे.
सर्वांना मनापासून ईद मुबारक :-)
No comments:
Post a Comment