ललिता पंचमी आणि त्र्यंबोली यात्रा
ललिता पंचमीला कोल्हापुरात टेंबलाईची यात्रा असते. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी, दोघींच्यात काहीतरी चकमक झाली आणि टेंबलाई रुसून गावाबाहेरच्या टेकाडावर जाऊन बसली. ललिता पंचमी दिवशी अंबाबाई पालखीतून ह्या बहिणीला भेटायला जाते, त्यांच्या गप्पागोष्टी, आहेरमाहेर होतात आणि त्या आनंदाप्रित्यर्थ ही यात्रा भरते. [@सई]
ही यात्रा म्हणजे समस्त कोल्हापूरकरांसाठी आणि विशेष करून आमच्यासारख्या ऐन शहरातच रहाणा-या नागरीकांसाठी रम्य आठवणी आहेत. टेंबलाईचा हा गावाबाहेरचा भाग अगदी खरोखरचा आणि तेव्हा लांब असलेला ओसाड माळ होता. हे एवढं एक आणि एरवी तसा शुकशुकाटच असणारं एकच देऊळ त्या टेकाडावर. माझ्या आठवणीप्रमाणे झाडंही फारशी नव्हती तिकडे. पहाटेपासून डोक्यावर पाण्याच्या फुलापानांनी सजवलेल्या कळशा वहात एकटेदुकटे किंवा घोळक्यानं, छोट्या मिरवणुकांनी चालत टेंबलाईला निघालेले स्त्री पुरुष रस्त्यावर दिसू लागत. यात्रेसाठी पालिकेने खास जादा डबल डेकर्स सोडलेल्या असत, त्या बिंदू चौकातून सुटत. त्या बसेससाठी प्रचंड लांबच लांब रांगा असायच्या. [@सई] कारण खाजगी वाहनं तेव्हा फार कुणाकडे नसत आणि असली तरी सहकुटुंब सहपरिवार गर्दीबरोबर यात्रेला जाणं हा आनंद मोठाच असणार. दुपारपासून लोक ताटकळत रांगेत थांबायचे. आम्ही दोघी बहिणी, बाबा, आमच्याबरोबर दोघं चुलतभाऊ, काकु, तिच्या मैत्रिणी आणि त्यांची मुलं, शेजारची मुलं असा मोठा गट मिळून यात्रेला जायचो. शिवाय रांगेत थांबलेलं असताना आणि नंतर यात्रेत फिरतानासुद्धा सगळे ओळखीचे लोक, नातेवाईक, इतर शेजारी पाजारी, शाळेतल्या मैत्रिणी, बाई वगैरे भेटायच्या. थोडक्यात अख्खं कोल्हापूर यात्रेला लोटायचं, ह्यावरून गर्दीची कल्पना येईल. ह्या गोंधळातून जर डबल डेकरच्या वरच्या मजल्यावर पुढे बसायला मिळालं तर होणारा आनंद आभाळाएवढा असायचा. [@सई] आम्ही रांगेतली पोरंटोरं त्यासाठी आसुसलेले असायचो आणि आमचा नंबर यायच्या आधीची बस भरल्यावर रांग कुठे तुटली, त्यावरून आपण बसमध्ये वर की खाली, पुढे की मागे हे अंदाज चालायचे. काय काय गंमती!
कोणत्याही यात्रेत असतात तसे टेंबलाईला पण फिरत्या दुकानांचे नाना त-हेच्या वस्तूंनी भरलेले ठेले असायचे. नजर जाईल तिथवर माळ आणि टेकाडाची देवळापर्यंतची चढण गच्च भरलेली दिसायची. आणि कशी कोण जाणे, तेव्हा ती टेकडी उंचही भासायची, जी प्रत्यक्षात बुटकी आहे. पिपाण्या, मातीची चित्रं, पळत जाताना हातात धरायची वा-यानं फिरणारी कागदी चक्रं, पिसाच्या उंच टोप्या, गडद पिवळे दागिने, हवेतले आणि जमिनीवरचे पाळणे, इकडे तिकडे फिरणा-या गारेगारच्या, बर्फाच्या रंगीत गोळ्यांच्या हातगाड्या, पेरीना आईस्क्रिमच्या हॅंडलवाल्या पांढ-या आणि देखण्या सुबक ढकलगाड्या, [@सई] शेवखंडासारखे सहसा घरी न होणारे अन् एरवी उघड्यावरचे माशा, धूळ बसलेले म्हणून फिरत्या गाडीवरून घ्यायला बंदी असणारे म्हणूनच खूप खावेसे वाटणारे आणि फक्त यात्रेतच खायला मिळणारे खाऊ, तिखटमीठ भुरभुरलेल्या वाळकाच्या फोडी, खारे शेंगदाणे-फुटाणे आणि तळलेले लाल-हिरवे-पिवळे वाटाणे (हे आता मिळत नाहीत काय, खूप शोधले, फार कुणी करत नाहीत बहुतेक), गोड रंगीत कापूस, बॉबी नळ्यांचे वगैरे फिरते विक्रेते (आम्ही असले उठवळ आणि बाजारू खाऊ खाऊ नयेत ह्यासाठी आम्हाला बॉबीमध्ये पाल असते अशी भिती घातली जायची आणि आम्ही प्रामाणिकपणे घाबरून ते कधी मागायचो तर नाहीच, पण एरवी शाळेपाशीसुद्धा घ्यायला धजावायचो नाही! असल्या चाणाक्ष पालकनितीत आमची पिढी सपशेल मार खाते आणि करू गेलो तर आमची पोरं आमच्यावरच दात काढून हसतील. आता म्हणजे टोल नाक्यावर थांबल्यावर बॉबीची पाकिटं घेऊन बोटात अडकवून खाणे हा एक बहुतेक लहानथोरांचा महत्त्वाचा उद्योग असतो. असो), भेळशेवपुरीचे गाडे, वडे-भजीच्या गाड्यांवरच्या तेलांचे वास, संध्याकाळी प्रत्येक ठेल्यावर लागणारे पेट्रोमॅक्सचे दिवे. ह्या सगळ्यात पार्श्वभूमीला भयंकर कलकलाट आणि कोलाहल. एकजात सगळी पोरंसोरं पिपाण्या गेंगाणतच फिरत असायची. भटकताना एकीकडे सारखं सटरफटर काही तरी खात आमची तोंडंही चालू असायची. खरेदी फारशी नसायचीच, पण बाबा कोणत्याही गोष्टी घ्यायला कधी नाही म्हणाल्याचंही आठवत नाही. तसंच आम्ही किंवा बाबांनीही [@सई] रांगेत उभे राहून टेंबलाईचं दर्शनही घेतल्याचं आठवत नाही. अगदी वरपर्यंत जायचो, पण ते फिरत फिरत यात्रेच्या आनंदासाठीच.
यात्रेत बाबांचे मित्र वसंत कुंभारकाकांचं मातीच्या चित्रांचं दुकान असायचं. मग चालून चालून पाय दुखायला लागले की थोडा वेळ तिथं त्यांच्यामागे जाऊन बसायचं आणि आजुबाजूची मजा [@सई] निरखायची. परत येताना पुन्हा रांगेत थांबून डबल डेकरनंच यायचं. पण येताना अंगात त्राण नसायचं. बिंदू चौकापासून घर दोन मिनिटंही नाही, पण ते अंतर चालणंही रात्री जीवावर यायचं इतके पाय बोलायचे. मग दुसऱ्या दिवशी शाळेत दिवसभर हाच विषय आणि चर्चा चाललेली असे.
पंचवीसेक वर्षं कोल्हापूरबाहेर असल्याने यात्रा घडली नाही आणि आता इकडे [@सई] आल्यापासून यात्राच होऊ शकलेली नाही. कसे योग असतात! पुढच्या वर्षापर्यंत नव्हे, तर लवकरात लवकर सगळं आलबेल होऊन यात्राच काय, अख्खं जगच सुरळीत नांदायला लागू दे, ही अंबाबाई आणि टेंबलाई ह्या दोघींच्या चरणी मनापासून प्रार्थना. ही यात्रा आमच्यासाठी एक अविस्मरणीय आनंदाची दुपार ते उशिरा संध्याकाळ असायची, एवढं मात्र खरं.
No comments:
Post a Comment