#मदतनीससख्या #friends #मैतरणी #कृतज्ञता
रविवारच्या रणरणत्या दुपारची गोष्ट. मी फ्रिज साफ करत बसले होते. रतन मावशी आल्या आणि एक हात कंबरेवर आणि एक हात गालावर ठेवून पाच मिनिटं नुसत्या माझ्याकडं बघत उभ्या राहिल्या. "××× कडं जाऊन आल्या का?" मी भुवई वाकडी करून त्यांच्याकडं बघितल्यावर चेटकीणीसारख्या हसल्या आणि म्हणाल्या, "त्याशिवाय तुमच्या अंगात येणार नाही!" मी चिडचिडत माझ्या हातातली गारेगार काकडी त्यांच्या दिशेनं फेकली आणि त्यांनी ती झेलून नळाखाली धुऊन तोंडात धरून व्हॅंपसारखा तिचा तुकडा मोडला आणि मुद्दाम दात विचकत हसणं पुढं चालू ठेवलं.
रतन आणि मंगल मावशी या दोघी जावा गेली कित्येक वर्षं अशाच माझा छळ मांडत आल्या आहेत. मला कोळून प्यायल्या आहेत. पण तेवढाच जीवही लावला आहे. मला फ्रिज साफ करताना बघून म्हणूनच त्यांना पार्श्वभूमी कळली. माझे एक नातलग आहेत. साधारण दोन ते तीन वर्षं स्वयंपाकाच्या ओट्याला किंवा गॅसच्या शेगडीला पाणी म्हणून दाखवलेलं नाही त्यांनी. कारण मला नाही माहित. मी तशी जवळच राहते, त्यामुळे सहसा त्यांच्याकडे काही खाय-प्यायची वेळ येत नाही. आणि मला इतरांच्या घरच्या पसाऱ्याचा, अस्वच्छतेचा जोवर मला तिथं रहायचीच वेळ येत नाही, तोवर विनाकारण त्रास होत नाही. त्या त्या घरचे लोक मजेत असतात तशी मीही असू शकते. गप्पा मारल्या, निघालं. बसायला जागा असावी, बास. लोक छान असतात, त्यांच्या घराच्या भिंती कशा का असेनात. फक्त खिडक्या सताड उघड्या असाव्यात आणि कोंदट वास असू नये, एवढंच. चुकून रहायबिहायची वेळ कुठं गेल्यावर आलीच तर तेव्हाचं तेव्हा बघता येईल.
तर त्यांना रतन मावशीही चांगल्या ओळखतात. एरवी मी मॉडरेटली स्वच्छता करते. माझ्या आईसारखा किंवा धाकट्या बहिणी सारखा ओसीडीही नाही आणि घाण म्हणावं इतकाही गलथानपणा नाही. पण साधारण त्या नातेवाईकांकडं फेरी झाली की मला तिरमिरी येते आणि मी घरी येऊन स्वच्छतेचा सपाटा लावते. मग मावशी जाम वैतागतात आणि म्हणतात, एवढा तुमचा वेळ जात नसला तर माझ्याकडं चला आणि मला मदत करू लागा.
या दोघी अशाच एक नंबर नाकझाड्या आहेत. कुणाच्या घरी जेवायचं-खायचं, कुणाच्या घरी नुसतं पाणी प्यायचं, कुणाच्या घरी स्वच्छता गृह वापरायचं, कुणाला त्यांच्या घरी बोलवायचं अन् कुणाला नाही, याचे त्यांचे ठोकताळे ठरलेले असतात. त्यांची स्वतःची घरं लख्ख असतात. तुमच्याकडे येणाऱ्या मावशींचीही असतील बघा. धमाल गंमती जमती असतात. बहुतेकदा रविवारी दुपारी आमची ही गॉसिप सत्रं जोरदार चालतात. कारण रविवारी मी सहसा त्यांच्यासाठी काही कामं ठेवत नाही. कारण रविवारी इतर घरांमध्ये साहजिकच नेहमीपेक्षा जास्त लोड असतं, त्याला त्या त्या घरांचाही इलाज नसतो. मग माझ्याकडं शक्यतो ब्रेक. जोरात पंखा सोडायचा, हातात थंड ताकाचा किंवा मिल्कशेकचा पेला आणि निर्विष मापं काढत तुफान हसणं.
मंगल मावशींचं स्वयंपाकाचं काम माझ्याकडेच पहिलं होतं. त्यात तो बामणी स्वयंपाक. मग आमची जी काही युद्धं झाली आहेत, ते काय विचारू नका. कशात गोडा मसाला, कशात हिरवी मिरची, कशात तिखट, कशात गूळ, कशात साखर, कशात पाणी, कशाला नुसतीच वाफ. कांदा-लसूण मी जवळजवळ वापरत नसल्यासारखं आहे. सुरुवात तर आच मंद, तेल नुसतं दाखवायचं इथूनच. तेलाचा आणि चवीचा संबंध नाही, हे कसं पटणार त्यांना! त्यांचं बिचाऱ्यांचं डोकंच फिरायचं. त्यात त्या स्वभावानं जाम तापट. साधारण दर आठवड्याला 'मी उद्यापासून येत नाही' किंवा 'तुम्ही उद्यापासून अजिबात येऊ नका' हे वरच्या पट्टीतले संवाद झालेच पाहिजेत. तरीही दुसऱ्याच महिन्यात आमच्या केर-फरशीच्या मावशी दुसरीकडे रहायला गेल्यावर आपल्या धाकट्या जावेला घेऊन आल्या आणि मग दोघी मिळून माझ्या डोक्यावर बसल्या. आमचे चिरंजीव मोठे होऊ लागले तसा तिघांनी मिळून सासुरवास सुरू केला मला. तो त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेला असल्यामुळे चकमकीत माझी बाजू घेतच नाही. सगळी मजा असते.
मंगलमावशींना साधारण वर्षभर लागलं स्वयंपाकावर कमांड यायला. वाटणघाटण नाही, मांस-मच्छी नाही, मला अस्सा जाता जाता तुमचा स्वयंपाक येईल म्हणणाऱ्या मावशींना सोपा वाटणारा हा साधा स्वयंपाक प्रत्यक्षात तेवढा सोपा नाही हे लक्षात यायला लागलं. त्यांनी हळूहळू मला नाकं मुरडणं कमी करून नेटानं मनापासून सगळं शिकून घेतलं आणि मग मात्र मी केलंय की त्यांनी ते ओळखूही येईना. भरीला त्या त्यांच्या घरीही कोशिंबिरी, ताक वगैरे सर्रास करायला लागल्या. त्यांच्या घरचं तेलाचं प्रमाणही महिन्याला जवळपास दोन लिटरनं कमी आलं. मोकळं तिखट, तांबड्या भोपळ्याचं भरीत, सांज्याच्या पोळ्या, चिंच गुळाची आमटी, बटाटे पोहे, पीठ पेरलेल्या कोरड्या भाज्या हे त्यांना करायला आवडणारे विशेष पदार्थ. हाताला चव अफाट. मेमरी जबरदस्त. तोंड मुलखाचं फटकळ पण मायेनं करणार. पोळ्या मऊसूत, पदर सुटलेल्या. डब्यात नेलेला त्यांनी तूप घालून कालवून वाफ घालवून दिलेला भरपूर आमटी-भात लंचटाईमपर्यंत मुरायचा आणि टेबलवर प्रत्येक जण आधी स्वतःला वाढून घेऊन माझ्यासाठी जेमतेम दोन घास उरायचा. तव्यावरची गरमागरम पोळी, पहिल्या वाफेची भाजी आणि दुधाचा कप हा नाश्ता किती वर्षं त्यांच्या कृपेनं हाणला. माझी आणि लेकाची किती आजारपणं या दोघींनी काढली, मोजदाद नाही. त्यांनीच वेळोवेळी पाठीवर हात फिरवून हेही दिवस जातील हे दिलासे दिलेले आहेत आणि खरोखरच तसे दिवस ढकलून सुखरूप पुढं आल्यावर आम्ही मिळून त्या दिवसांकडे मागं वळून बघितलंही आहे.
अविध्वा नवमीला काकू आणि आईचा मान या दोघींना नाही देणार तर आणखी कुणाला! त्यांच्या आवडीच्या साड्या, एखादी त्यांच्या हौसेची वस्तू घ्यायची हे कृतज्ञतेचं एक निमित्त. गौरीच्या जेवणाला संध्याकाळी साग्रसंगीत किंवा खरंतर एरवी केव्हाही संध्याकाळी उठायचं आणि त्यांच्याकडे जाऊन जे असेल ते जेऊन यायचं ही सवय आहे आम्हाला. त्यांची घरं म्हणजे सुना-जावयांनी नातवंडांनी भरलेली गोकुळं आहेत. आणि त्याहीपेक्षा, अक्षर ओळखही नसणाऱ्या या बायकांची ती कष्टाळू, धोरणी वृत्तीची उत्कृष्ट आर्थिक मॅनेजमेंट केलेली अफाट कर्तबगारी आहे. यांच्या जीवावर तर आपण उड्या मारतो, नाही का! जगावं कसं हे यांच्याकडून मी सप्रात्यक्षिक जास्त शिकत आलेय.