आंसू भारी है ये जीवन की राहें
आज खूप जण मुकेशची आठवण काढतायत. एकाहून एक सुरेख गाणी ऐकायला, वाचायला मिळतायत. मुकेश आवडतो. त्याची काही गाणी पुन्हा पुन्हा ऐकली जातात ती म्हणजे 'सूर की गती मैं क्या जानूं', 'ये दिन क्या आए लगे फूल हंसनें', 'कई बार युं भी देखा है', 'मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', 'जाने कहाँ गए वो दिन', 'मुझको इस रात की तनहाई में आवाज न दो', 'बडे अरमानों से रखा है बलम तेरी कसम' वगैरे. तशी बरीच आहेत खरंतर.
पण 'आंसू भरी है' जरा जास्त आवडतं. साधे शब्द, कसलाही मेलोड्रामा, दोषारोप, कडवटपणा नाही. त्यामुळे दुःखी असलं तरी रडवं नाही. एक प्रकारचं हवंहवंसं, आकर्षून घेणारं गांभीर्य आहे. हसरत जिंदाबाद. सारंगी प्रचंड भावखाऊ आहे ह्यात. मुकेशच्या बरोबरीनं वाजते. आर्त आणि जखम न करता आत घुसणारी. (ही सारंगी आणि 'है दुनिया उसी की जमाना उसी का' मधला Saxophone एकाच जातकुळीचे वाटतात. गायकाइतकाच परिणाम साधतात.) सतार तेवढ्या मोजक्या तुकड्यातही मन प्रसन्न करून जाते. राज कपूरबद्दल काय बोलावं, इसम भलताच देखणा आहे. शिवाय सहज आहे. बरेचदा असतात तसे नाटकी हावभाव नाहीत इथे. दत्तारामांची चाल इतकी प्रभावी आहे, की कशातही कितीही गर्क असलं तरी जरा जरी कुठून कानावर आली तरी ऑक्टोपससारखी मनाला वेढून टाकते आणि दुसरं तितकंच दमदार काही कानावर पडेपर्यंत तशीच घट्ट वेढून रहाते. इतकं सगळं असलं तरी गाणं मुकेश स्पेशलच आहे.
पण एवढं उगीच बोलतेय मी. काही आवश्यकताच नाही. एकदा ऐकलं की ते ठावच घेतं.