म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, November 12, 2019

 असंही पर्यटन

एरवी वेळेची फार टंचाई असते असं नाही, पण ठरवलेल्या वेळापत्रकातली मधलीअधली कामं रद्द झाली किंवा लवकर संपली, तर तो मिळालेला वेळ लॉटरीसारखा वाटतो. घरी असाल तर लोळायला, बाहेर असाल तर निर्हेतुक भटकायला निमित्त. पुण्यात तर ही दुग्धशर्करा पर्वणी. त्यामुळे शुक्रवारी ही पर्वणी ऐन उन्हाची वेळ असूनही साधली. अचानक दीडेक तासाचा वेळ हाताशी आयता सापडला. जेमतेम तीनेक किमीच अंतर, पण रमतगमत, रद्दीच्या दुकानात रेंंगाळत, बुचाचं आजवर लपून राहिलेलं झाड शोधून फुलं वेचत, रोजच्या जाययायच्या वाटांवर वर्षभरात झालेले बदल टिपत, नव्यानं उगम पावलेल्या कशाकशांचे फोटो काढत सुशेगाद फिरत सत्कारणी लावलं.
बादशाहीतला नाश्ता ते नुतनीकरणासाठी बंद असल्यामुळे हुकला. मग कल्पना गाठलं. तिथून ठरवून वाट वाकडी करून खूप दिवसांनी 'कलाश्री'ला बाहेरून नमस्कार पावता केला. बरं वाटलं. सेनादत्त पेठेतच आतल्या शांत गल्लीत सुवासानं हाका मारणारं बुचाचं झाड दिसलं. तो एक खजिना गोळा केला. पुढच्या कोप-यावरच्या रद्दीच्या दुकानात जुन्या मुखपृष्ठाचं पडघवली मिळालं. माझ्याकडे आधीच आहे, पण हेही होईल कुणाला वाचायला द्यायला म्हणून उचललं. सत्संग सोसायटीच्या अलिकडे दोन चकचकीत नवे बंगले झालेले दिसताहेत. छान आहेत. अभिनव सोसायटीच्या दोन रोहाऊसेसना नवी नावं दिसली. वैकुंठातल्या आतल्या रस्त्यानं एस एम जोशी पुलावर निघायचं होतं खरंतर. अद्याप एकदाही वैकुंठच्या कमानीतून आत गेलेले नाही मी. पण कुणाची तरी महायात्रा नुकतीच पोहोचत होती, म्हणून वळसा घेऊन निवा-याकडून पुलावर आले. तर तिकडे सुबक ठळक चित्ररुप पुणे दर्शन घडलं. सगळी चित्रे चांगली काढली आहेत. अजून पाहिली नसतील तर जाऊन पाहून या एकदा मुद्दाम. कर्वे रस्त्यावर मेट्रोचं काम कुठवर आलं ते पाहिलं, वेगात आहे प्रगती. अर्थात, आता त्या गर्दीचा भाग नसताना फक्त अलिप्तपणेच असं म्हणणं सोपंय. तसंच पुढे सरकत प्रभात आणि भांडारकर रस्तेही पालथे घालायचे होते, पण सूर्य मी म्हणायला लागल्यावर इथवर पोचून भटकंती आटोपती घ्यावी लागली. मात्र एवढ्यानंही ऑक्सिजन टँक्स रिफील केल्यासारखी तरतरी आली एकदम.
हे असं शंख करत भटकणं पूर्वीही अनेकदा केलंय. केव्हाही कधीही वाटलं की उठायचं आणि सुटायचं. काही ठरवायचं नाही. भारी मजा येते. अशा पद्धतीनं पुण्याच्या हवेतच घाईगडबड भरलेली आहे, वगैरे प्रवादांना झकासपैकी खोटं ठरवता येतं. पुणंच असं नाही, कोणत्याही गावात, शहरात, खरंतर. तर अनपेक्षितपणे असा एखाददुसरा तास हातात मोकळा सापडतो आणि त्याचा सदुपयोग करण्याची बुद्धी सुचते, तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटते.




No comments:

Post a Comment