पतंगाच्या निमित्ताने बिळातून थोडी तरी बाहेर पडलेली पोरं.
नील जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो. बहुतेक पालकवर्ग श्रमजीवी आहे. सगळेच स्मार्टफोनवाले नाहीत, त्यामुळे ऑनलाईन वर्ग वगैरे नाहीत. एका इयत्तेत जेमतेम २०-२२ विद्यार्थी, मग शिक्षक अधेमधे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन हालहवाल घेतायत. शासनाकडून दर तिमाहीचं एक सर्व विषय सामाईक केलेलं पुस्तक येतंय ते (ओझं कमी करण्याचा एक चांगला प्रयत्न) आणि दर महिन्याला पोषण आहाराचा शिधाही न चुकता येतो, तो आम्ही पालक घेऊन येतो. दर आठवड्याला अभ्यास पीडीएफ्स आणि शिक्षकांनी सहामाहीसाठी हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सप ग्रुपवर येतात. मुलं त्यांच्या सोयीसवडीनं गृहपाठ करून आणि पेपर्स सोडवून ते फोटो शिक्षकांना पाठवतात. मुलं अक्षरशः आसुसलेली आहेत शाळेत जाण्यासाठी. अगदी शिक्षकांचं ओरडणं खाण्यासाठीसुद्धा! आमच्या शाळेत मुलांना ओरडतात शिक्षक आणि आम्ही कुणीही त्यांना त्याबद्दल विचारायला जात नाही. पीटीए असते अधेमधे (मार्चपुर्वीचं सांगतेय) पण त्यात पालकांना मुलांची कौतुकं जास्त ऐकायला मिळतात. हे नक्की आपल्याच मुलाबद्दल बोलतायत ना ही खात्री करून घ्यावी लागते.
मध्यंतरी मुख्याध्यापकांना जरा काळजीच्या सुरात म्हणाले, 'सर, जरा मोबाईल, टीव्हीबद्दल काही तरी सांगा, आम्हाला दाद देत नाहीत.' सरांनी क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, 'यंदा फक्त सुखरूप रहायचं आहे. मुलांनी आणि आपण सगळ्यांनीच. अभ्यासाचाच नव्हे, कसलाही जाच करू नका त्याला. पुढच्या वर्षी बघू आम्ही काय करायचं ते. जे काही होतंय, व्हायचंय, ते जगभरातल्या मुलांचं होणारे, तुमच्या एकट्याच्या मुलाचं नाही. घरातून बाहेर पडायचं नाही, शाळा दिसत नाही, मित्र भेटत नाहीत, हुंदडता येत नाही, मैदानावर जायला मिळत नाही, करायचं काय त्यांनी?'
मुकाट्यानं मान डोलावून घरी परत आले. नशीब, त्यांच्या विद्यार्थ्यानं हे ऐकलं नाही. पण अशा कानपिचक्या मिळाल्या की भान येतं जरा आणि मग बरं वाटतं. घडोघडी विनाकारण असुरक्षितता बाळगायची सवय लागत चाललीये, ती झटकता येते. हा शिक्षकवर्ग मला ज्या प्रकारे आश्वस्त करत आलाय, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. डिसलेसरांच्या निमित्ताने ह्या दुर्लक्षित वर्गाकडे लक्ष वेधलं गेलं आहे हे खरंच चांगलं घडलंय.
No comments:
Post a Comment