जीवेत् शरद: शतम् उषाताई
अतिशय गुणवंत गायिका, गुणवंत चित्रकार, गुणवंत निर्मात्या आणि मितभाषी प्रसिद्धी पराङ्मुख व्यक्तिमत्त्व असणाऱ्या उषाताईंना केवळ लावणी आणि मुंगळा ही मुख्य ओळख मिळाली आहे. ती कमी महत्त्वाची नसली तरी त्यांची लावणीव्यतिरिक्तची गाणीसुद्धा तेवढीच उल्लेखनीय आहेत. मीना खडीकर, मानस मुखर्जी, श्रीनिवास खळे, विश्वनाथ मोरे अशांसारख्या काही संगितकारांनी त्यांना जी इतर गाणी दिली, ती अगदी कस पाहणारी आहेत आणि उषाताईंनी त्यांचं खणखणीत सोनं केलं आहे. क्वचित जैत रे जैत वगळता पं. मंगेशकरांनी उषाताईंबाबत हात अगदीच आखडता घेतला आहे. तरी उषाताई आनंदी असतात. खरंतर त्यांनाही रडगाणी गाण्याची, तक्रारींची केवढी संधी, पण वृत्ती प्रसन्न, प्रेमळ आणि हसरी. वाट्याला आलेलं सगळं उत्कृष्ट डिलिव्हर करायचं, एवढंच ध्येय. मग ती राम कदमांची लावणी असो, दादा कोंडकेंची अवखळ दंगेखोर गाणी असोत, खळ्यांचं मंजुळ भावगीत असो की भावाच्या अल्बमसाठी केलेलं गालिबचं पोर्ट्रेट. बाकी मी बरी आणि माझं घर बरं. अशी माणसं मग विशेष आवडतात.
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी, वेळ झाली भर माध्यान्ह, थांब रे घना, पालखी हाले डोले, माझी रेणुका माऊली, झाल्या तिन्हिसांजा, त्या तुझिया चिंतनात, केळीचे सुकले बाग, सख्या चला बागामधी, ना ना ना ना नाही नाही नाही रे, अशी काही अत्यंत आवडती गाणी आहेत.
No comments:
Post a Comment