म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, November 13, 2021

 एसटीचा संप अपेक्षेपेक्षा लांबला आहे. काय आणि कसा तोडगा निघतोय, ह्याबद्दल उत्सुकता आहे. काय होतंय ह्याकडे सुरुवातीपासून आम्ही घरचे लक्ष ठेवून आहोत. मी कुणी अभ्यासक नाही, पण एसटीची अगदी नियमित प्रवासी आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गाबद्दल सहानुभूती आहे. तुटपुंजे पगार आणि पुरेशा सोयी-सवलती नाहीत, भरती पुरेशी नसल्यामुळे सणावाराला दोन-तीन दिवस सलग प्रवास करावे लागतात. प्रवाशांच्या गैरसोयीची जाणीव आणि निलंबनाची भिती असूनही ऐन मौसमात हा संप त्यांनी सुरू ठेवला आहे. मात्र शासनाच्याही काही अडचणी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या असलेल्या इतर सुविधा समान हक्क न्यायानुसार सरसकट सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देणे शासनाला परवडणारे नाही आणि डिपार्टमेंटवाईज नियम बदलले जात नसतात. ह्या सगळ्या पलिकडे खाजगीकरण करून हा लोण्याचा गोळा खायला टपलेले एसटीचे हितशत्रू आहेतच. पण एसटीचे खाजगीकरण सर्वसामान्यांसाठी कदापीही हिताचे होणार नाही. आज ज्याप्रमाणे एसटी खेडोपाडी, राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासीसंख्येचा विचार न करता सेवेत असते, तशी सेवा खाजगीकरणानंतर उपलब्ध होणार नाही. एकंदर सर्व प्रकारच्या उलाढालींवर आणि सामाजिक प्रगतीवर ह्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, इतकी एसटी सेवा ग्रामीण भागात रोजच्या जीवनाशी निगडित आहे.

मी अभ्यासक नसल्याने हे फार मोघम आणि वरवरचे मुद्दे मांडलेत. फेसबुकीय अभ्यासकांचं लक्ष वेधून घेण्याइतका हा संप महत्त्वाचा नाही असं दिसतंय. इतक्या दिवसात ह्या संपासंदर्भात एकही पोस्ट वाचनात आली नाही. परिणामी कुणाची मतमतांतरंही कळली नाहीत. ऐन सुट्टीचा कालावधी होऊन गेला. इथे सगळेजण खाजगी बसेस किंवा स्वतःच्या चारचाकी वापरणारेच असतील असं नक्कीच नाही.
आपला फारसा किंवा काहीही संबंध नसलेल्या विषयांवर केवढं बोललं जातं, पण एसटी ह्या ब-यापैकी सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेल्या विषयाबद्दल कुणाला काहीच स्वारस्य का असू नये, हा प्रश्न पडला.


No comments:

Post a Comment