२००१च्या फेब्रुवारीत आम्ही शिवपुष्प चौकात, आजच्या सनसिटी रोडला रहायला आलो. हा रोड आज एक महत्त्वाचा लॅंडमार्क आहे. २००३ला मित्तलांचा सनसिटी प्रोजेक्ट लॉन्च झाला. रु. ७५१ पर स्क्वे फूट अशी मोठाली होर्डिंग्ज बऱ्याच ठिकाणी लागली होती. या प्रकल्पानं पश्चिम आनंद नगराचं सगळं चित्र बदलून टाकलं. राजाराम पूलही साधारण तेव्हाच आगेमागे सुरू झाला, त्यानं या बदलाला आणखी वेग आला. अर्थात तेव्हा या बदलाचा अंदाज येणं शक्य नव्हतं. मारुती मंदिराच्या पुढे शेतं सुरू व्हायची, जिथे आज बॉटलनेक आहे. अंधार पडल्यावर तिकडे वाटमाऱ्या चालू झाल्यावर सनसिटीतल्या नव्या रहिवाशांनी अनेक महिने रात्री गस्ती घातल्या आहेत. मित्तलांनी पुरवलेली बससेवा वर्षभरानंतर बंद झाल्यावर, या जेमतेम एखाद किमी अंतरासाठी रहिवाशांना शिवपुष्प चौकात किंवा संतोष हॉल चौकात रिक्षावाल्यांनी यथेच्छ नाडून घेतलंय. आता भरवस्तीत आल्यामुळे जाणवत नाही, पण तेव्हा ते अंतर खरोखरच फार वाटायचं. मुख्य करून मध्यम वर्गीयांचा भरणा. चारचाक्या अपवादात्मक होत्या. त्रस्त ज्ये ना, दप्तरं वागवत तंगडतोड करणारे विद्यार्थी, तान्ही किंवा पाचाच्या आतली मुलं नेणारे आईबाबा, तिकडे कोणतीच दुकानं नव्हती त्यामुळे ऑफिस उरकून मग सगळी ओझी वहात दमून चालत जाणारे मध्यमवयीन सर्रास दिसायचे. यथावकाश पीएमटी सुरू झाली, लोकांनी घरामागोमाग गाड्यांची जुळवाजुळव केली, एकेक टप्पे पार होत गेले. आजची त्या परिसरातली वस्ती बघताना ते मूळ सनसिटी वसवणारे लोक आठवतात.
आमच्यासारख्या त्यामानानं अलिकडे रहाणाऱ्या लोकांसाठी तेव्हापासून शांतता, स्वच्छ हवा, सुरक्षितता संपुष्टात आली ती कायमची, आणि हेच धनलक्ष्मी सोसायटीसाठी व्हायला आम्हीही कारणीभूत झालो होतो. हा रस्ता अखंड वहाता असतो. त्याला रात्री १२ ते पहाटे साडेचार एवढीच उसंत. साडेचारला वर्तमानपत्रे आणि दुधाच्या गाड्यांची लगबग, पाठोपाठ शाळेच्या बसेस आणि रिक्षांची धावपळ सुरू होते. आमचा चौक या धामधुमीचं केंद्र आहे. आमच्या इमारतीखालीच बसस्टॉप आणि दर पंधरा मिनिटांनी शहरातील महत्त्वाच्या सगळ्या भागांसाठी बससेवा आहे. एकही बाब अशी नाही, जी त्या रस्त्यावर मिळत नाही.
आम्हीही सनसिटी प्रोजेक्टला विरोध करायला हवा होता का? मग आम्ही रहायला आलो तेव्हा धनलक्ष्मी सोसायटीनं विरोध केला तोही योग्यच होता ना? विकास हा फारच मोठा शब्द झाला, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं या बेसिक सोयी आहेत. मी याच सिस्टीममध्ये राहून, तिचे मला हवे ते सर्व फायदे घेऊन एखाद्या सोयीला विरोध करते तो विरोध व्हॅलिड आहे का? त्या सोयी होणं चूक की बरोबर? हे चूक बरोबर कसं ठरवणार?
सिंहगड रोडवर पुलोद्यानासमोर होऊ घातलेल्या नव्या पुलाला विरोध होतोय. गेला आठवडाभर वातावरण तापलंय. त्यासाठीची प्रत्येकाची कारणं व्हॅलिड असतील, हे मान्य आहे. पण आपण जे इतर पूल आणि वाढीव रस्ते वापरतो, त्याचाही आधी कुणीतरी त्रास सहन केलाय, आजही करतायत. ते नसते तर होणारी गैरसोय आपल्यासाठी तेवढीच त्रासदायक झाली असती. थोडक्यात, शिवाजी शेजारच्या घरात जन्मावा, आमच्या नाही, असाच याचा अर्थ झाला. मित्रयादीतल्या माझ्या सगळ्या शेजाऱ्यांना आणि परिसरातल्या समस्त मित्रमंडळींना टॅग करायची इच्छा झाली. पण टॅगिंग मलाच पसंत नसल्यामुळे नाही केलं. एनीवे, हा पुलाचा प्रवास कसा होतोय याबद्दल उत्सुकता आहे. पूल झाला तर वापरणार. नाही झाला तरी पर्याय आत्ताही उपलब्ध आहेतच. त्यामुळे सध्या फुटपाथवर उभं राहून बघ्याच्या भूमिकेत. इथं प्रत्येकानं दुसऱ्याच्या छातीवर पाय दिलाय, त्यामुळे प्रतिक्रियेमध्ये तो दृष्टिकोन उमटल्यास भूमिका न्याय्य ठरेल.
No comments:
Post a Comment