फार वाईट वाटलं. धोधोंना मनापासून आदरांजली.
मी पूर्णपणे शहरातच वाढले आणि राहिलेय. काही ना काही कारणांनी गावांशी, झाडांशी, निसर्गाशी, मातीशी, शेतांशी संबंध येत राहिला असला, तरी त्या सगळ्याची ओळख खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी शाळेच्या पुस्तकातून चक्क अभ्यास करून, कवीला काय म्हणायचंय ते लिहित शिकलेल्या आणि नंतर आपणहून वाचलेल्या धोधोंच्या कवितांनीच करून दिली. ती गोडी कायमचीच लागली. धोधोंच्याच शब्दांत म्हणायचं तर पिसं लागलं, तशातलाच प्रकार. माझं तरी हे फार कमी कवींच्या बाबत झालंय. शाळेपासून आवड लागण्याचं प्रमाण तर आणखी थोडं. त्यांची पुण्यात एकदा भेट झाली, तेव्हा त्यांना आठवणीनं आणि कृतज्ञतेनं तसं सांगता आलं, हे माझं भाग्य. त्यांच्या कविता तर वाचल्या ऐकल्याच, पण अनेक वर्षांपूर्वी पहिली म्युझिक सिस्टीम विकत घेतली तेव्हा आवाज पूर्ण सोडून त्यांची गाणीही जोरदार ऐकली, अक्षरशः पारायणं केली. ती कायम होत राहतील.
या काही लोकांना आपण आपल्या आयुष्यातून वेगळं काढू शकत नाही, हे वापरून घासून बोथट झालेलं वाक्य असलं तरी १०००% तथ्य आहे त्यात.
https://www.youtube.com/watch?v=605oiN46vO8
No comments:
Post a Comment