म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Sunday, August 6, 2023

 मैत्री दिनानिमित्त.

आमचे बाबा आणि रमजानकाका हे लंगोटीयार. आता बाबांचं वय ८० आणि काका बाबांपेक्षा जरा लहान, ७६ असावेत. म्हणजे या मैत्रीला खरंतर जास्तच, पण किमान साधारण ५०-६० वर्षं तरी सहज उलटून गेलीच म्हणायची. बाबांचं एक घरगुती नाव सुभाष आहे, तर काका बाबांना सुभाष म्हणतात. दोघांनाही एकमेकांबद्दल अतिशय आत्मियता आहे.
आमचे आजोबा सरकारी डॉक्टर म्हणून नोकरीत असताना त्यांच्याकडे आजुबाजूच्या गावांच्या दवाखान्याची जबाबदारी असे. मु.पो. सांगरुळला असताना मणेर कुटुंबाशी परिचय झाला आणि दोन्ही कुटुंबातल्या समवयस्क मुलांमध्ये मैत्री झाली. रमजानकाका नंतर नोकरीसाठी कोल्हापुरात आले आणि बाबांची, त्यांची पहिली खाजगी नोकरी एके ठिकाणीच होती. नोकरीतल्या व्यावहारिक धोरणी बाबी काकांनी बाबांना शिकवल्या. पुढे ते वीज मंडळात चिकटले आणि बाबा न्यू एज्युकेशन सोसायटीत. रहायला मात्र समोरच्या गल्लीतच. त्यामुळे जाणं येणं खंडित झालं नाही.
रमजानकाका नमाजी मुस्लिम. दाढी, डोळ्यात सुरमा, चौकड्याची लुंगी, डोक्यावर क्रोशाची टोपी आणि पठाणी स्वच्छ पांढरा कुडता हा नेहमीचा वेश. ते दोन वेळा हाजला जाऊन आलेत. आम्ही देशस्थ ब्राह्मण. तेव्हाच्या काळाप्रमाणे आमच्याकडे सोवळंओवळं. देव्हाऱ्यात उजव्या सोंडेचा गणपती असल्यामुळे नेहमीपेक्षा जरा अधिकही असणार. पण या कोणत्याही गोष्टीचा मैत्रीवर काही परिणाम आजतागायत दिसलेला नाही. समोरासमोर रहात असताना बाबांची नियमित चक्कर व्हायची, ती आम्ही लांब रहायला गेल्यावर आठ-पंधरा दिवसातून व्हायला लागली, एवढंच.
आमचे आजोबा सक्रिय स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले होते. आजोबांना खुद्द गांधीजींनी स्वहस्ते पाठवलेलं पोस्टकार्ड आणि भेट दिलेला चरखा घरात होता. त्यांचे पंचक्रोशीतले पेशंटस् सगळ्या जातीधर्मांचे. उपचारांसाठी आल्यावर शहरात इतर कुठं रहाणार, आजोबा आपल्याकडंच ठेवून घ्यायचे त्यांना.
आजी फार लवकर गेली. पण आजोबांची सगळी नऊच्या नऊ मुलं समंजस, अत्यंत गुणी आणि आजीच्या माघारी आजही एकमेकांना घट्ट धरून असलेली. या सगळ्या भावंडांनी दोन खणांच्या मुलखाच्या गैरसोयीच्या घरात आपले अभ्यास आणि घरकामं सांभाळून आजोबांच्या पेशंटस्ची जेवणीखाणी आणि औषधांची बडदास्तही ठेवली. रमजानकाकांचा या भरलेल्या घरात सहज वावर असायचा. बाबा आणि काका भटकंती करायचे. सायकलवरून विशाळगडावर, ट्रकमधून बेंगलोरला अशा रोचक श्टोऱ्या बाबा खुलून सांगतात. असं भटकताना आजोबांनी कधीच त्यांना रोखलं नाही. काहीही निमित्त असलं की आजोबा म्हणायचे, 'त्या बामणाला बोलवा रे कुणीतरी', म्हणजे रमजानकाकांना!
आमच्या घरात तेव्हा तर सगळेच शाकाहारी. आजसुद्धा पुढच्या पिढीतले दोन चार जण वगळता फार कुणी सर्वाहारी नाहीत. पण या गोष्टींचा कधीच कुठं उल्लेखही नसतो. ईदला वेगळा पुलाव आणि खिरीची किटली घरपोच येणार आणि दिवाळीच्या फराळाला ते घरी येणार किंवा फराळ पोचता होणार.
आत्या अडनिड्या वयाच्या होत्या, आजोबा सतत फिरतीवर. बाकी घरात मोठं माणूस कुणी नाही. भोवती सगळा अठरापगड मोहल्ला. पण मोठ्या भावांच्या बरोबरीनं काकांचंही लक्ष असायचं. हे आज रमजानकाका सांगतात म्हणून आम्हाला माहित. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मामांनी (आजोबांना सगळे मामा म्हणत) ज्या विश्वासानं वागवलं त्यानं मी आयुष्यात उभा राहिलो. त्यांनी खूप आपुलकीनं मायेनं वागवलं, मला त्यांच्या मुलांतलाच एक समजलं. तुमच्या घरी येऊन येऊन माझी भाषा बदलली, गावंढळपणा निवळला, आहाराच्या सवयी, राहणीमानही बदललं. तिखटजाळ जेवण आणि मांसाहाराचं प्रमाण अगदीच कमी झालं. मामांमुळं बऱ्याच रीतीभाती कळल्या, मी जवळजवळ बामणच झालो.
रझियाकाकी मला सांगतात की काकांना जास्त करून शाकाहारी जेवण पाहिजे असतं, पण काकींना मांसाहार आवडतो म्हणून त्यांना कंपनी देतात.
आमच्या घरातली सगळी स्थित्यंतरं, भावंडांची शिक्षणं, लग्नकार्यं, पुढं मुलंबाळं सगळं त्यांच्यासमोर झालं. बाबा सांगतात, की तुमच्या आईबरोबर कधी कुरबुर झाली की मी घरी न थांबता समोर रमजाकडं जाऊन जेवायचो आणि शाळेत जायचो. मी जेवायला थांबलो की त्या नवरा बायकोला समजायचं आमचं काही तरी बिनसलंय. आम्ही दोघीही शाळेतून येताना किंवा जाताना वरचेवर काकांकडे डोकावायचो. ते घर परकं कधी वाटलंच नाही. आत्ताही कधी गेलो की जे असेल ते खाऊन येतो आम्ही. लखलखीत स्वच्छता आणि केव्हाही गेलं तरी प्रेमानं स्वागत करणारे हसरे प्रसन्न चेहरे हे त्यांच्या घराचं वैशिष्ट्य. मुलांना व्यवसाय सुरू करून देऊन लग्नं झाल्यावर त्यांची त्यांची स्वतंत्र सोय लावून दिली त्यांनी. आता त्यांची नातवंडंही लग्नाला आली आहेत.
बाबा आणि काकांच्या जशा अनेक एकत्र आठवणी आहेत, तशा आत्या आणि काकांच्या पण आहेत. कोल्हापुरात गेल्यावर आत्या रमजानकाकांना आठवणीनं भेटून येतात. रमजानकाकांना डोळ्याला अनेक वर्षं सोडावॉटर काचांचा चष्मा होता. दृष्टी हळूहळू अधू होत काही वर्षांपूर्वी संपूर्ण गेलीये, त्यामुळे बाहेर पडणं जवळपास बंद झालंय. पूर्वी बाहेरगावी जायचे तेव्हा एकदा पुण्यात आल्यावर पोस्टात नोकरी करणाऱ्या धाकट्या आत्याला अचानक ऑफिसात जाऊन भेटले. बाईंना भेटायला हे कोण गृहस्थ आलेत आणि बाई त्यांच्याशी निवांत बोलतायत हे बघून ऑफिसमधले लोक चकित झाले आणि ते बघून आत्याची जाम करमणूक झाली.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या घराची वास्तूशांत केली तेव्हा माझी बहिण रमजानकाकांना गाडीत घालून घेऊन आली. त्यांच्या पद्धतीप्रमाणे काकांनी उंबऱ्यात थांबून दारात एक पाऊल ठेवून कुराणातला घरशांतीचा कलमा म्हटला. तेव्हा आतल्या खोलीत बाबा गृहपुजेला बसले होते आणि साग्रसंगीत यज्ञ आणि उच्चरवात मंत्रोच्चार सुरू होते. दोघांच्या पाया पडल्यावर आम्हाला दोघींनाही तोंड भरून आशीर्वाद दिले. आम्हाला लहानपणापासून बघितलं असल्यामुळे आम्ही दोघी भेटलो की काका काकी दोघंही सद्गदित होतात.
वर्ष दीड वर्षापूर्वी बाबांचं कायमचं पुण्याला यायचं ठरल्यावर बाबांनी सगळ्यात आधी रमजानकाकांना सांगितलं. आणि काका काकी दोघंही रडायला लागले. दृष्टी गेल्यापासून काका जरा हळवे झालेत, त्यांची सख्खी भावंडं बहुतेक कुणी उरलेली नाहीत. बाबांना निरोप देणं फार जड गेलं त्यांना. आता फोन वगैरे असतो, बाबा किंवा मी गेले की न विसरता भेटून येतो. पण जग जवळ आलंय असं आपण कितीही म्हटलं तरी या वयस्करांसाठी ते अंतर फार उरतंच.
मैत्री दिन आहे तर काकांना फोन करायची बाबांना आठवण केली. त्यावेळी विचार आला, या मैत्रीबद्दल आपणही दोन शब्द लिहायला हवेत.








No comments:

Post a Comment