आज जागतिक रेडिओ दिन आहे.
आकाशवाणी हा एक आवडीचा विषय आहे. ऐकण्याचे आणि काही चांगलं ऐकण्याचे संस्कार, अनेक विषयांची ओळख तिथून झाली. त्यामुळे आजपर्यंत जे काही बरं ऐकलंय, त्यात आधी सांगली, मग पुणे, आता कोल्हापूर केंद्र आणि अर्थात विविध भारतीचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यात औचित्यपूर्ण कारणांनी इतर आकाशवाणी केंद्रांचं सहप्रसारणही आलं. शहर बदलताना सर्वात मोठी हळहळ पुणे आकाशवाणी सहजी ऐकता येणार नाही, ही होती! पण कोल्हापूर आकाशवाणी ऐकताना ती वृथा होती हे जाणवतंय.
घरातलं सकाळचं वेळापत्रक कळायला लागल्यापासून ते आजपर्यंत, म्हणजे किमान चार तरी दशके आकाशवाणीच्या कार्यक्रमांसोबतच चालत आलं आहे. मोबाईल कानामागून येऊन तिखट झाला तरी माझ्या रुटीनमधली रेडिओची जागा तो अजून तरी घेऊ शकलेला नाही. रेडिओ आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कोणतीही बातमी एआयआरवर ऐकल्याशिवाय मी तिच्यावर सहसा विश्वास ठेवत नाही. नभोनाट्यं, प्रासंगिक कार्यक्रम, आपली आवड, लोकसंगीत, माझं घर माझं शेत, स्त्रिया आणि मुलांसाठीचे कार्यक्रम, रुपकं, चिंतन, अनेक अभिवाचनं, उत्तमोत्तम मुलाखती, श्रोत्यांना पत्रोत्तरं, प्रबोधनात्मक प्रसारणे, असे अनेक कार्यक्रम कित्येक वर्षे ऐकणं सुरू आहे. सर्व वाहिन्यांच्या सर्व आवडत्या कार्यक्रमांचा उल्लेख करायचा म्हटलं तर फार लांबड लागेल. निवेदनातलं मार्दव, जाहिरातींचे संयमित प्रमाण, सर्व क्षेत्रांची घेतली जाणारी नैमित्तिक दखल, वेळोवेळी पुरवली जाणारी आवश्यक ती सर्व शासकीय बाबींची माहिती, उल्लेखनीय शीर्षकसंगीत आणि पार्श्वसंगीत, ह्या कारणांमुळे आकाशवाणी ऐकणं हे खाजगी वाहिन्यांच्या तुलनेत सुसह्य असतं.
खरंतर रेडिओ म्हणजे खाजगी वाहिन्यांचाही उल्लेख हवा. मात्र क्वचित एखाददुस-या वाहिनीवरचा कार्यक्रम वगळता मी फारसं ऐकत नसल्यामुळे त्यासंदर्भात बोलण्यासारखं काही विशेष नाही. दर्जा, कंटेंट, मांडणी, विषयासाठी दिला जाणारा पुरेसा वेळ, उत्तम निवेदने, श्रवणात येणारे किमान अडथळे, अशी अनेक वैशिष्ट्ये आजही बाळगून असलेल्या 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहु जनकल्याणी' आकाशवाणीला तोड नाही.
No comments:
Post a Comment