तुलना सहसा करू नये असं म्हणतात. प्रसंग, घटनांनुरुप ते कधी पटतं, कधी नाही, तर कधी कधी आपल्याही नकळत ती होतेच.
जितेंद्र जोशीच्या 'दोन स्पेशल'मध्ये काल आणि आज सयाजी शिंदे आणि मकरंद अनासपुरे आले होते. समृद्ध बोलले. पाय जमिनीवर राखून आहेत, हे जाणवत होतं. समारोपाची सयाजी शिंदेंनी म्हणून दाखवलेली अरविंद जगतापांची कविता कळस होती. मात्र हे भाग बघताना, त्यांचं बोलणं ऐकताना उगीचच मधेमधे ह्याच कार्यक्रमाच्या पहिल्या दोन भागात आलेले सुबोध भावे आणि सुमीत राघवन आठवत राहिले. कलावंत आहेतच तेही चांगले, मुद्देही ते योग्य मांडत होते. पण त्यांचा, त्यातही विशेष करून सुबोधचा अहंगंड सातत्याने डोकावत होता, तो प्रकर्षाने जाणवत होता.
पंधरा दिवसांपूर्वी 'गद्धेपंचविशी'बद्दल अनुक्रमे वैभव मांगले आणि चंद्रकांत काळेंचे लेख सलग वाचले गेले. तिथेही तीच कथा. मांगलेंच्या लेखातला शब्दोशब्दी ठिबकणा-या अहंगंडासमोर, मीपणासमोर, चंद्रकांत काळेंचा टोकाचा विनम्र भाव अगदी ठळकपणे जाणवला. काळे पुण्यात वरचेवर कुठे ना कुठे दिसत रहातात. किंवा अगदी अलिकडेच त्यांना 'अपरिचित पुलं'च्या प्रयोगावेळी कोल्हापुरात पाहिलं. माणूस आणि कलाकार म्हणून वावरण्यातली सारखीच सहजता, अभिप्रायांचे नम्रतेने केलेले स्विकार उठून दिसतात. एक ग्लोरी असते त्या व्यक्तिमत्त्वाला.
हे असंच प्रत्यक्षात असेल, नसेल. पण वाचताना, ऐकताना जे अन्वयार्थ लागतात, ते सहसा चकवत नाहीत.
तुमच्या पोतडीत आहेत का अशी काही निरीक्षणे, अशा तुलना?
No comments:
Post a Comment