म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Tuesday, October 20, 2020

 ललिता पंचमी

ललिता पंचमीला कोल्हापुरात टेंबलाईची यात्रा असते. अंबाबाई आणि टेंबलाई सख्ख्या बहिणी, दोघींच्यात काहीतरी चकमक झाली आणि टेंबलाई रुसून गावाबाहेरच्या टेकाडावर जाऊन बसली. ललिता पंचमी दिवशी अंबाबाई पालखीतून ह्या बहिणीला भेटायला जाते, त्यांच्या गप्पागोष्टी, आहेरमाहेर होतात आणि त्या आनंदाप्रित्यर्थ ही यात्रा भरते.
ही यात्रा म्हणजे आम्हां शहरातच लहानाचे मोठं झालेल्यांसाठी रम्य आठवणी आहेत. टेंबलाईचा हा गावाबाहेरचा भाग अगदी खरोखरचा आणि तेव्हा लांब असलेला ओसाड माळ होता. हे एवढं एक आणि एरवी शुकशुकाट असणारं एकच देऊळ त्या टेकाडावर. माझ्या आठवणीप्रमाणे झाडंही फारशी नव्हती तिकडे. यात्रेसाठी पालिकेने खास जादा डबल डेकर्स सोडलेल्या असत, त्या बिंदू चौकातून सुटत. आत्ताच बाबांनी सांगितले की कोल्हापूर महानगरपालिका खास यात्रेनिमित्त सात-आठ नव्या डबल डेकर्स विकत घेत असे आणि त्या नव्या बसेस यात्रेला आधी लावत असे. बसेससाठी प्रचंड लांबच लांब रांगा असायच्या. कारण खाजगी वाहनं तेव्हा फार कुणाकडे नसत आणि असली तरी सहकुटुंब सहपरिवार गर्दीबरोबर यात्रेला जाणं हा आनंद मोठाच असणार. दुपारपासून लोक ताटकळत रांगेत थांबायचे. आम्ही दोघी आणि बाबा असे जायचो. अनेकदा आमच्याबरोबर दोघं चुलतभाऊ, काकु, तिच्या मैत्रिणी आणि त्यांची मुलंही असायची. शिवाय रांगेत असताना, नंतर यात्रेतही सगळे ओळखीचे लोक, नातेवाईक, शेजारी पाजारी, शाळेतल्या मैत्रिणी भेटायच्या. थोडक्यात अख्खं कोल्हापूर यात्रेला लोटायचं, ह्यावरून गर्दीची कल्पना येईल. ह्या गोंधळातून जर डबल डेकरच्या वरच्या मजल्यावर पुढे बसायला मिळालं तर होणारा आनंद आभाळाएवढा असायचा. आम्ही रांगेतली पोरंटोरं त्यासाठी आसुसलेले असायचो आणि मागची बस भरल्यावर रांग कुठे तुटली, त्यावरून आपण वर की खाली, पुढे की मागे हे अंदाज चालायचे. काय काय गंमती!
कोणत्याही यात्रेत असतात तसे टेंबलाईला पण फिरत्या दुकानांचे नाना त-हेच्या वस्तूंनी भरलेले ठेले असायचे. नजर जाईल तिथवर माळ आणि टेकाडाची देवळापर्यंतची चढण गच्च भरलेली दिसायची. आणि कशी कोण जाणे, तेव्हा ती टेकडी उंचही भासायची, जी प्रत्यक्षात बुटकी आहे. पिपाण्या, मातीची चित्रं, पळत जाताना हातात धरायची वा-यानं फिरणारी कागदी चक्रं, पिसाच्या उंच टोप्या, गडद पिवळे दागिने, हवेतले आणि जमिनीवरचे पाळणे, इकडे तिकडे फिरणा-या पेरीना आईस्क्रिमच्या भरपूर पांढ-या हातगाड्या, शेवखंडासारखे सहसा घरी न होणारे एरवी फिरत्या गाडीवरून घ्यायला बंदी असणारे म्हणून खूप खावेसे वाटणारे आणि यात्रेत खायला मिळणारे खाऊ, वडे-भजीच्या गाड्यांवरच्या तेलांचे वास, संध्याकाळी प्रत्येक ठेल्यावर लागणारे पेट्रोमॅक्सचे दिवे. ह्या सगळ्यात पार्श्वभूमीला भयंकर कलकलाट आणि कोलाहल. सारखं सटरफटर काही तरी खात आमची तोंडंही चालू असायची. खरेदी फारशी नसायचीच, पण बाबा कोणत्याही गोष्टी घ्यायला कधी नाही म्हणाल्याचंही आठवत नाही. तसंच आम्ही किंवा बाबांनीही रांगेत उभे राहून टेंबलाईचं दर्शनही घेतल्याचं आठवत नाही. अगदी वरपर्यंत जायचो, पण ते फिरत फिरत यात्रेच्या आनंदासाठीच.
यात्रेत बाबांचे मित्र वसंत कुंभारकाकांचं मातीच्या चित्रांचं दुकान असायचं. मग चालून चालून पाय दुखायला लागले की थोडा वेळ तिथं त्यांच्यामागे जाऊन बसायचं आणि आजुबाजूची मजा निरखायची. परत येताना पुन्हा रांगेत थांबून डबल डेकरनंच यायचं. पण येताना अंगात त्राण नसायचं. बिंदू चौकापासून घर दोन मिनिटंही नाही, पण ते अंतर चालणंही रात्री जीवावर यायचं इतके पाय बोलायचे. मग दुसऱ्या दिवशी शाळेत दिवसभर हाच विषय आणि चर्चा चाललेली असे.
पंचवीसेक वर्षं कोल्हापूरबाहेर असल्याने यात्रा घडली नाही आणि आता इकडे आल्यापासून यात्राच होऊ शकलेली नाही. कसे योग असतात! पुढच्या वर्षापर्यंत नव्हे, तर लवकरात लवकर सगळं आलबेल होऊन यात्राच काय, अख्खं जगच सुरळीत नांदायला लागू दे, ही अंबाबाई आणि टेंबलाई ह्या दोघींच्या चरणी मनापासून प्रार्थना. ही यात्रा आमच्यासाठी एक अविस्मरणीय आनंदाची दुपार ते उशिरा संध्याकाळ असायची, एवढं मात्र खरं😊❤️

No comments:

Post a Comment