काणेबुवांच्या ह्या सुरेख स्मरणमालिकेतला आज मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या मनोगताचा पहिला आणि अतिशय मनोज्ञ भाग प्रसारीत झाला. फार आवडला. मंजुषाचे गाणे अत्यंत देखणे, शास्त्रशुद्ध आणि तडफदार. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकेच प्रसन्न. त्या तशा गाण्यामागचे सगळे अंतरंग उलगडताना मंजुषांना आपल्या ह्या आदरणीय गुरुंबद्दल किती सांगू, किती बोलू असे होते आहे, इतक्या त्या भरभरून आणि खुलून बोलतायत. त्यात ओतप्रोत कृतज्ञता, त्यांच्या महत्तेची जाणीव, मिळालेल्या ठेव्याबद्दलची जबाबदारी आकंठ आहे. गुरुकुल पद्धतीने, तांत्रिक आणि प्रदर्शनीय अशा दोन्ही अंगांनी, शिष्याच्या खुबी लक्षात घेऊन, वादक साथीदारांना संधी देत गाणं हे टीम वर्क आहे हा दृष्टीकोन आणि सरतेशेवटी गाणं हे स्वत:च्या आनंदाइतकंच श्रोत्यांसाठीही आहे हा कधीही न विसरण्याचा मंत्र. हे काही ठळक मुद्दे गाण्याइतक्याच रसाळ भाषेत, सुंदर मराठीत आणि अधेमधे खळखळून हसत त्यांनी असे सांगितले, की त्या बोलण्यालाही मनमुराद दाद द्यावी. मुलाखतीच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे, तो येत्या गुरुवारी प्रसारीत होणार आहे.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Saturday, October 24, 2020
मी आणि मंजुषा तशा समवयस्क आहोत. माझ्या आठवणीप्रमाणे ८८ साली कोल्हापुरात शाहू स्मारकात 'अभिरुची' संगीत स्पर्धेत त्यांना शालेय उपशास्त्रीय गटात प्रथम आणि त्याच गटात मला उत्तेजनार्थ पारितोषिक होते, तेव्हा त्यांचे गाणे मी प्रथम ऐकले आणि ते तेव्हाही लक्षवेधी होते. ज्येष्ठ गायक पं. आनंदबुवा लिमयेंच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला होता. त्यांची तयारी जबरदस्त होती. हे आवर्जून जाणवण्याचं कारण मी गायलेलं 'स्वकुलतारक सुता' मी केवळ गाऊन टाकलं होतं. कोणत्या तरी स्पर्धेसाठी आणि स्टेजवरही प्रथमच गात होते. शाळेत 'स्वयंवर'च्या कडक तालमी सुरू होत्या आणि देवल क्लबात डीआर कुलकर्णीसर पहिल्या परीक्षेसाठी भीमपलासची तयारी करून घेत होते. स्पर्धेसाठी अशी खास तयारी केलीच नव्हती. त्यामुळेच मंजुषाचे गाणे ऐकताना जवळपास सारख्याच वयाच्या असूनही आपण किती ढिसाळ गायलो किंवा मुळात गाणं किती गांभिर्याने घ्यायचं असतं, ही जाणीव प्रकर्षाने झाली. तेव्हापासून आजपर्यंत संधी मिळेल तेव्हा मी त्यांचे गाणे ऐकत आले आहे आणि त्यातून त्यांचा आजवरचा प्रवास, चिकाटी आणि कष्टसुद्धा दिसत आलेत. त्याउलट माझं गाणं वाटेतच कुठेतरी हरवलं आणि ते हरवलंय हेदेखील लवकर लक्षात आलं नाही, इतका उठून दिसणारा माझा हलगर्जीपणा. त्यांना तेव्हाही स्पष्ट माहिती होतं ध्येय आणि कुठे पोहोचायचं आहे. आज त्या त्या स्थानावर पोचल्या आहेत आणि अजूनही प्रवास सुरू आहे असा नम्र भाव बाळगून स्वत:चा स्वतंत्र शिष्यपरिवारही आता त्या तयार करतायत.
त्यांचं गाणं ऐकताना मला नेहमी वाटतं की त्यांना का नाही कौशिकी चक्रवर्तीइतकं राष्ट्रीय स्तरावरचं ग्लॅमर मिळालं अजून! चोखंदळ श्रोते आवर्जून ऐकतातच, पण अशा ग्लॅमरचा सर्वसामान्य लोकांपर्यंत कोणतीही उत्तम चीज पोहोचण्यासाठी उपयोग नक्की थोडा अधिक असतो.
ज्येष्ठ गायक हृषिकेश बोडस, मंगला जोशी, सुखदा काणे अशा आणि आता मंजुषा, अशा सर्व वयोगटातील शिष्यांनी सांगितलेल्या आठवणी ऐकताना काणेबुवांबद्दल खूप मोलाची माहिती मिळते आहे आणि त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित होतो आहे. नीनाताई फार ओघवते प्रश्न विचारत सर्वांना बोलतं करते आणि त्यांनाच बोलू देते. कार्यक्रम चढत्या भाजणीने रंगतो आहे. ह्या कार्यक्रममालिकेसाठी तिला शतशः धन्यवाद आणि तिच्यासकट कोल्हापूर आकाशवाणीचेही खूप आभार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment