केवढं भरभरून लिहितायत सगळे मालिनीताईंबद्दल!
अजून जेमतेम काही वेळच झालाय बातमी येऊन.
केवळ श्रद्धांजली वाहिली जात नाहिये, मंडळी चार शब्द बोलतायत, दोन ओळी स्वतःच्या लिहितायत, हृद्य आठवणी शेअर करतायत. जवळपास हरेक रसिकानं ताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकलं असल्यामुळे प्रत्येकाकडे काही ना काही तरी सांगण्यासारखं आहे आणि त्या सांगण्यातून किंचितसा गहिवर पोचतोय. प्रत्येकाला किती मनापासून वाईट वाटलंय ते जाणवतंय.
खरोखरच एक वीज हरपली आज. आपण उपस्थित बहुतेकांनी प्रत्यक्ष तळपताना पाहिलेली. आपली आत्या, मावशी, काकू असावी तसा घरगुती आपुलकीचा वावर आणि तीच बाई घरचं कार्य उभं राहिल्यावर सळसळत्या विजेसारखी वावरावी तसं लखलखीत गाणं यांचं सुखद मिश्रचित्र अनुभवू शकलो, हे आपलं भाग्य. टप्पा म्हणजे तर आपली ऐकण्याची कुवत कमी पडावी अशी चपळाई. त्या सुहास्य मुद्रेनं येणार, बसणार, गायला सुरुवात, संगतकारांचं दिलखुलास कौतुक, ठरलेल्या वेळेत खणखणीत परफॉर्मन्स, गाऊन झालं की स्निग्ध हसून नमस्कार करून निरोप घेणार. एवढ्या वर्षात फरक एकच, मांडी घालून बसण्याऐवजी पाय खाली सोडून बसणं. बाकी सगळं जसंच्या तसं. निव्वळ गाणं एके गाणं. तेही कसं, तर सगळे खळखळाट शांत करत ठहराव आणणारं. पण प्रवाही. तयारी दाखवणारी मांडामांड नाही. श्रवणानंदाबरोबरच श्रोत्यांचं ग्रुमिंग करणारं गायन.
पी. जी. वुडहाऊस त्याच्या मुलीच्या मृत्युच्या वेळी म्हणाला होता, की ती अमर आहे असं त्याला वाटलं होतं. आपल्याही मनात कितीतरी माणसं अशी अमरच असतात. आणि असं कोण कोण आपल्या ठायी अमर आहे ते ती वेळ आल्यावरच उमगतं. देवाघरची माणसं ही.
No comments:
Post a Comment