माझे वडील नियमितपणे पण डोकं बाजूला ठेवून काही मालिका बघतात. नीट ऐकू येत असूनही वयोमानानुसार आवाज मोठा ठेवून बघणं त्यांना बरं वाटतं. घरं काही इतकी मोठी नसतात, मग इच्छा असो नसो, अख्ख्या मालिका इतर कुटुंबीयांच्या कानावर पडत रहातात. त्यामुळे तुम्ही कशाला बघता वगैरे तत्सम मुद्दे गैरलागू आहेत. शिवाय ८० वगैरे वयोगटाशी प्रबोधनात्मक वादविवाद करणं तारतम्याचं नाही. त्यामुळे प्रश्न तर पडतातच, ते उभे केलेच पाहिजेत. तुम्ही दर्जेदार माल आणा, असलं निकृष्ट बघतात तर सकसही बघतीलच. त्यासाठी हातपाय आपणच हलवले पाहिजेत.
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Friday, January 29, 2021
Tuesday, January 26, 2021
Sunday, January 24, 2021
Tuesday, January 19, 2021
मी फारशी फुडी नाही. त्यात सौम्य, घरगुती आणि नॉन ग्लॅमरस पदार्थ जरा जास्त आवडत असल्यामुळे मिसळ आवर्जून बाहेर जाऊन फार कमी वेळा खाल्ली जाते. पण आज एक चवदार मिसळ खाल्ली म्हणून मुद्दाम सांगायला आले.
'मिसळ MH09 कोल्हापुरी' हे उपाहारगृह कोल्हापुरात ताराबाई रोडवर नवीन सुरू झालं आहे. तिथं आज मी, पुण्याहून धावत्या दौऱ्यावर आलेली माझी मैत्रीण आणि आमचे बाबा नाश्त्यासाठी गेलो होतो. आम्ही मिसळ, पोहे आणि शिरा घेतला तर बाबांनी साबुदाण्याची खिचडी मागवली होती. टेराकोटाच्या सेटमध्ये वाढलेली मिसळ छान दिसत होती आणि तेवढीच चवही चांगली होती. मिसळीबरोबर सेंद्रिय गुळाचा खडा आणि भाजलेले दाणे पण देतात, ते जरा नवं काहीतरी. सगळे पदार्थ आवडले.
नंतर इथली खासियत ठरेल असा गुळाचा चहा घेतला. गुळामुळे चहाला एक विशिष्ट खमंग चव येते, ती नेहमीच्या चहापेक्षा खास लागते. इथे सेंद्रिय गुळाचे तीन प्रकारचे चहा मिळतात. आज आम्ही एकच प्रकार ट्राय केला.
इथे 'बॉयकॉट अजिनोमोटो' ह्या अभियानाबद्दल वाचलं. अजिनोमोटोच्या सेवनामुळे तब्येतीवर होणा-या घातक परिणामांची दखल घेऊन हे अभियान सुनीलनं स्वतः सुरू केलं आहे, त्याला आपण भरपूर पाठिंबा दिला पाहिजे. इथल्या पदार्थात कोणतेही कृत्रिम रंग वापरले जात नाहीत, सैंधव मीठ, घाण्यावरचं तेल वापरतात, अशा ब-याच बाबी लक्षात घेण्यासारख्या वाटल्या.
Wednesday, January 13, 2021
प्रसन्न बातमी. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखक मधू मंगेश कर्णिकांना जाहीर झाला आहे. फार आवडते लेखक.
साहित्य आणि कोमसाप दोन्हीसाठी मोठं योगदान असलेला माणूस आहे.
दहावीच्या सुट्टीत पोक्त करून टाकणारी दोन पुस्तकं अचानकपणे वाचली होती. पहिला पेंडशांचा तुंबाडचे दोन्ही खंड एकत्र असलेला ठोकळा आणि नंतर कर्णिकांचं माहिमची खाडी. त्या पुस्तकांनी माझ्यातला इनोसन्स मोठ्या प्रमाणात कमी केला. झटका बसला होता. फारच छोटं आणि कोप-यातलं जग होतं तोवर, ते एकदम बरंच विस्फारलं. तेव्हा तुंबाडचे खोत आवडीनं मानगुटीवर बसलं होतं, पण खाडी आवडलं नव्हतं. झेपलं नव्हतं म्हणणं जास्त बरोबर होईल.
पण कर्णिक आवडले. नंतर पाठोपाठ वाचत गेले म्हणूनही असेल. गंमत म्हणजे नंतर कोकणाच्या पार्श्वभूमीसकटचे लेखक आणि त्यांच्या शैली असा एक रंजक मागोवा घेत वाचत गेले. पेंडसे, दांडेकर, दळवी, कर्णिक, हे चटकन आठवणारे ठळक. एकजात सगळे वेगळे आणि खूप आवडते.
बातमी वाचल्यावर हे मजेदार वाचनही ओघानं आठवलं.
Subscribe to:
Comments (Atom)