म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, February 27, 2021

 कर्नाटकात असणारे आमचे समस्त नातेवाईक, ओळखीचे लोक, माझ्याकडे मदतीला येणारी कानडी ताई, हे सगळे व्यवस्थित मराठी बोलतात. भले आपल्याइतकं ओघवतं नसेल, पण तेवढं अपेक्षित नाहीच. कर्नाटक सहलीत अगदी होस्पेटपर्यंत तोडकंमोडकं का असेना, मराठी बोलणारे लोक भेटत गेले. ते तसे पार पुढेपर्यंत असतील खात्रीनं. पण ऐन सीमाभागात असूनही मला किंवा माझ्या भोवतालच्या बहुतेक मराठी भाषकांना दोन चार चुकार कानडी शब्द वा वाक्यं वगळता कानडीचा गंध नाही. महाराष्ट्रातल्या इतर सीमाभागातलं चित्र मला माहिती नाही. ह्याबद्दल प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. ह्या भागातलं हे चित्र पूर्वीच्या मुंबई इलाख्यामुळे असेल असं वाटतंय.

पुण्यातून कोल्हापुरात आल्यावर पहिल्या आठवड्यातच नील इथलं खास मराठी बोलायला लागला. शुद्ध मराठीबद्दल आवर्जून दक्ष असणा-या अनेक हितचिंतकांनी त्यावरून मला अनेकदा सावध केलं. खरोखरच कळकळीनं. खोटं कशाला बोलू, नीलच्या बोलण्यामुळं पहिल्यांदा माझ्याही कानाला खरचटलं होतंच! पण मला त्याचं ते खास बोलणं पटलं आणि म्हणून नंतर आवडलं. त्याची भाषा आता माझ्यापेक्षा समृद्ध आहे आणि तशी कायम होत रहाणार आहे. मी त्यामानाने कुढलेलं, संकोचलेलं आणि ठराविक साच्यातलं मराठी बोलते. त्याच्या माझ्या बोलण्यातल्या फरकाचं जरा वाईटही वाटलंच. मी इथेच वाढले असूनही कोल्हापुरी बोलत नसल्याचं एवढ्या वर्षात कधीही वाईट असं वाटलं नव्हतं. पण नीलमुळे लक्षात आलं की तुमची परिसर भाषा तुमच्या बोलण्यात प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. तुम्ही तोंड उघडल्याबरोबर तुमचा प्रदेश कळला पाहिजे, त्यात तर खरी मजा. सगळे एकसारखंच बोलायला लागले तर संपलंच मग. परिसर भाषा बोलणं म्हणजे भवतालात मिसळून जाणं आहे, स्विकारणं, आपलंसं करणं, प्रवाही होणं, वाहत रहाणं, असं बरंच काही आहे. शुद्ध, प्रमाण, अशुद्ध, चूक, बरोबर, अलाहिदा.
आज खूप खवचट पोस्टससुद्धा दिसतायत. त्या वाचताना गंमत वाटतेय. त्यावरून मनातलं इथं भिंतीवर डकवलं इतकंच. हे केवळ एक निरीक्षण नोंदवलं आहे. #मराठीभाषादिवस

Thursday, February 18, 2021

 वर्गशिक्षिका: आपापले छंद सांगा.

नील: मला रेंगाळायला आवडतं.
बाईंसकट वर्गात हास्याचा स्फोट.

Saturday, February 13, 2021

 World Radio Day today and I am an avid radio listener. Friend of all for pretty 110 years.

❤️🌼
रेडिओबद्दल मी इतक्या वरवर काही बोलू शकणार नाही आणि बोलायला बसले तर थोडक्यात आटोपणार नाही. आकाशवाणी ही माझ्यासाठी मर्मबंधातल्या काही मोजक्या ठेवींपैकी एक आहे. समजायला लागल्यापासून आजतागायत रेडिओ सोबत आहे आणि राहिलही.
कुणाचं काय तर कुणाचं काय असं वाटू शकेल, पण पुण्यातून कोल्हापुरात स्थलांतरित होताना माझ्यासाठी एक महत्त्वाचा कन्सर्न आकाशवाणीचा होता. कारण आजपर्यंत रोजच्या जीवनातला हा अविभाज्य भाग आहे. एआयआर अॅपचा पर्याय जरी उपलब्ध असला तरी चटकन बटण ऑन ऑफ करण्याची सोय केव्हाही जास्त वापरली जाते. कोल्हापूर आकाशवाणीनं अर्थात निराश केलं नाही. कारण मुळात आकाशवाणी कंटेंट आणि दर्जाचीच फार काळजी घेते. हे विशेष करून प्रत्येक आकाशवाणी केंद्र, विविध भारती आणि अस्मितासारख्या काही एफ एम वाहिन्यांबद्दल मी जास्त म्हणेन. खाजगी एफ एम वाहिन्यांवरही काही मोजकी उत्तम प्रसारणे होतात, मात्र सर्व्हायव्हलसाठी त्यांना जाहिरातींचा जो भडीमार करावा लागतो त्यानं श्रोते हैराण होतात. कार्यक्रम नको पण जाहिरात आवर अशी परिस्थिती होते.
आकाशवाणीवर प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून वैविध्य आणि सर्व स्तरातल्या, वयोगटातल्या श्रोत्यांचा विचार असतो. जाहिराती असल्या तरी चालू कार्यक्रमात कोणताही व्यत्यय न आणता लावल्या जातात. स्वतंत्र प्रायोजित कार्यक्रम लावल्यामुळे तेवढे टाळता येण्याचं श्रोत्यांनाही स्वातंत्र्य मिळतं. गोंगाट नसतो. कोणतंही निवेदन संयमित असतं. आकाशवाणी ऐकताना कधी डोकं उठलंय असं होत नाही. भाषा उत्तम असते. उत्कृष्ट निर्मितीमुल्यं असलेले अनेक कार्यक्रम इतर केंद्रांबरोबर सहप्रसारीत केले जातात. जीवनावश्यक सर्व विषयांचे, संगिताचे, साहित्याचे, माहिती-तंत्रज्ञानाचे सर्व प्रकार तज्ज्ञांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांकडून ऐकायला मिळतात. कोणतीही आपत्ती असो, आकाशवाणी तत्परतेने सेवेला हजर असते.
गेली तीन ते चार वर्षे मी वर्तमानपत्र बातम्यांसाठी वाचत नाही. फक्त साप्ताहिक पुरवण्या वाचते. किंवा टिव्हीच्या बातम्याही बघत नाही. कोणतीही बातमी आकाशवाणीवर सांगितली तर ती आणि जेवढ्या प्रमाणात सांगितली जाते तितकीच विश्वासार्हता माझ्यासाठी पुरेशी होते. आकाशवाणीवर उल्लेख न झाल्यास ती बातमी आवश्यक नाही. विषय संपला. बाकीही सोशल मिडियावरच्या कोणत्याही बातम्यांकडे लक्ष देत नाही. हे अर्थातच माझ्यापुरतं मी ठरवलेलं आहे. ह्याबाबतीत प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतील. पण ह्या नेमामुळे अगदी आपत्तीकाळातही योग्य ती माहिती वेळच्या वेळी मिळत राहिली आणि भयंकर काळातही मन:स्वास्थ्य टिकून राहिलं. हे सगळं श्रेय आकाशवाणी आणि तिथल्या सर्व कर्मचा-यांना आहे. रोजच्या ऐकण्यामुळे सगळे निवेदक कुटुंबातल्या सदस्यांइतके जवळचे वाटतात. आजसुद्धा ठराविक कार्यक्रमांच्या वेळांनुसार रोजचा दिनक्रम पार पडतो. समाजात अमुलाग्र बदल होत आहेत, जे अटळ आहेत. पण आकाशवाणीचा दर्जा बदललेला नाही, हा माझ्यासारख्या आकाशवाणीवर मनापासून प्रेम असणाऱ्या श्रोत्यांसाठी मोठा दिलासा आहे. अनेक समयोचित, खास किंवा माझे आवडते कार्यक्रम, विशिष्ट निवेदक आणि त्यांची शैली, त्यांच्यासाठी अनेकदा मी अॅडजस्ट करत असलेल्या वेळा असं आणखी लिहायचं होतं. पण विस्तारभयास्तव बळंबळं आवरतं घेतेय.
आकाशवाणी, सर्व कर्मचारी वर्ग आणि जगभरातील श्रोत्यांनाही जागतिक आकाशवाणी दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!


❤️🌼

 किती प्रचंड टीका, मत्सर, द्वेष सहन केलाय ह्या स्त्रीनं. केवढी मानसिक ताकद वापरत आली असेल ती आजवर. गाणं, कर्तृत्व, स्वर्गीय देणगी, प्रतिभा वगैरे बाजूला ठेवून माणूस म्हणून तिच्याकडे बघितल्यावर प्रत्येक वेळी मी अचंबित झाले आहे आणि तो अचंबा वाटतच रहाणार आहे मला. दोन्ही खांद्यांवरचा पदर सावरणं आणि मोकळं हसू ह्या दोन गोष्टीत कोणताही अभिनिवेश कधीही दिसलेला नाही. तिच्या असंख्य मुलाखतींची पारायणं करते मी पण तिचं दोन्ही खांद्यांमध्ये मान मुरवून हसणं तिच्या वयाच्या सगळ्या टप्प्यांवर सारखंच आहे. आदब, दरारा, डिग्निटी हे शब्द लता, दुर्गाबाई, सुनिताबाई वगैरे स्त्रियांकडे बघितल्यावर जरा जास्त समजलेत मला. सेल्फ मेड असणं, स्वतःच्या महत्तेची यथार्थ जाणीव बाळगणं, हरेक ठिकाणी स्वतःचा स्टॅंड ठेवणं, आवश्यक तिथे जगाला सपशेल फाट्यावर मारणं, दर्जा आणि मेहनतीशी नो तडजोड. कायमच अगणित दंडवत आहेत. #LataMangeshkar

Wednesday, February 3, 2021

 बजेटमध्ये मटणाचे दर मर्यादित ठेवा अशी कुण्या कोल्हापूरकराची निर्मलाताईंना केलेली विनंती फिरतेय व्हॉट्स अप वर. आपण कोल्हापुरातल्या रस्त्यांबद्दल अशी कळकळ केव्हा दाखवणार आहोत? मटणासाठी हायकोर्टात धावू शकतो, तर कित्येक वर्षे गाड्यांइतकीच हाडंही खिळखिळी करणा-या रस्त्यांसाठीही नको का जायला? फक्त मटणप्रेमी एवढीच मर्यादित ओळख नाही ना कोल्हापूरची, ह्या इतर जीवनावश्यक गोष्टीही महत्त्वाच्या आहेत ना?