म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, April 30, 2021

 आज रात्री १०.०० वाजता कोल्हापूर आकाशवाणीवर रजनीगंधा या कार्यक्रमात मी सहभागी असणार आहे. माझ्या आवडीची सिनेगीतं आणि सोबतच माझ्या निवेदनातून त्या गाण्यांबद्दल तुमच्याशी गप्पाही.

ऐकायला विसरू नका - आज रात्री १०.०० वाजता कोल्हापूर आकाशवाणीवर रजनीगंधा.
Akashwani Kolhapur 102.7 FM
Please download AIR Vividhbharati and Akashwani App - Select Maharashtra - Select Kolhapur Kendra. Very easy. You can directly listen a live program.



Wednesday, April 28, 2021

 कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर १ मे २०२१ रोजी मी १ तास सादर केलेला रजनीगंधा कार्यक्रम, त्याची आकाशवाणीनं केलेली जाहिरात


Tuesday, April 27, 2021

 लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी सुरू असलेली तारांबळ बघताना कोणत्याही समारंभात लागणा-या बुफे/बफेच्या रांगा आठवतायत.

पहिलं वाढप घेऊन ते संपवून दुसऱ्या वाढपासाठी जावं तर पहिल्यांदा वाढून घेण्यासाठी रांगेत उभे असलेले समारंभार्थी सहज घुसू देत नाहीत. एकदा घेऊन झालंय ना, मग जरा थांबा की, अशी साधारणपणे नजर असते. बरं, रांग तर संपणार नसते पण रांगेचा आणि आपला काही संबंधही नसतो. चार लोकांच्यात हातात खरकटं, अर्धवट संपवलेल्या अन्नाचं ताट घेऊन ताटकळत किती वेळ थांबावं ते समजत नाही. रांगेत उभ्या असलेल्यांच्या मधे घुसणं पटत नाही आणि खरंतर बरंही दिसत नाही. एकाच वेळी वाढून घेणं सोयीचं असतंच असं नाही. आधी सगळं चवीपुरतं थोडंसं वाढून घेऊन आवडलेला पदार्थ पुन्हा वाढून घेण्याची मनसोक्त चैन खूप गर्दी असेल तर करता येत नाही, पण तेवढंच संपवून उठावं म्हटलं तर पोट धड भरलेलं नसतं. (हाच तो क्षण असतो, जेव्हा आयतं सुग्रास जेवायला मिळण्याच्या सुखाचा केलेला नसता लोभ आणि घरातला थंड मुदपाकखाना, दोन्ही हमखास आठवतात) एकंदरीत पंचाईत मुलखाची होते.
कोणत्याही समारंभात जेवायला येणा-यांची गर्दी एकाच वेळी होऊ नये म्हणून अनेक काउंटर्स तयार ठेवलेले असतात, पण दुस-यांदा वाढून घेणा-यांसाठी कधीही कुठेही वेगळी सोय केलेली नसते. तद्वतच लसीचा दुसरा डोस घेणा-यांसाठी स्वतंत्र सोय आणि तजवीज उपलब्ध नाही. एकाच वेळी वाढून घेण्याच्या सोयीचा तर इथे प्रश्नच उद्भवत नाही. तस्मात् पहिल्यांदा वाढून घेणा-यांच्या आणि वयोगट क्रमशः खाली उतरलेला असल्याने नव्या मनुंतील नव्या दमाच्या शूर शिपायांच्या रांगेत घुसण्याची मानसिक तयारी ह्या खेपेला अधिकची करावी लागणार आहे.
तर गड्यांनो, सावध ऐका पुढल्या हाका.

Saturday, April 17, 2021

 प्रिय श्रोते हो, सप्रेम नमस्कार! माझं नाव सई कोडोलीकर. तुमच्याप्रमाणेच मीसुद्धा आकाशवाणीची एक निस्सिम श्रोती आणि चाहती आहे. आज माझ्या आवडीची हिंदी चित्रपटातली काही गाणी मी आपल्याला ऐकवणार आहे. ही संधी मला दिल्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची मी मन:पुर्वक आभारी आहे. खरंतर हिंदी चित्रपट संगीत म्हणजे अरबी समुद्र. ते का हो, प्रशांत महासागर म्हणायला हवं. त्यातल्या सोन्यामोत्यांच्या अनंत राशी उपसून ही काही निवडक रत्नं वेचून आणली आहेत. आशा आहे, तुम्हाला आवडतील.

सध्या आपण सगळेच फार मोठ्या संकटातून जात आहोत. हा अवघड काळातून सुखरूप पार होण्यासाठी बळ आणि सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करू या. आपला साहिर म्हणतो आहे,
इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलकेगा,
जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगा, जब धरती नज़्में गायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ॥
गीतकार शैलेंद्रनं घातलेल्या साकड्यात आपलाही सूर मिसळू या,
ओ सारे जग के रखवाले, निर्बल को बल देनेवाले,
सब को मिले सुख का वरदान..
केवढं बरं वाटलं ना ऐकून! संगितकार जयदेवांनी आपल्या सुरांमधूनही अगदी आर्त हाक घातली आहे. आपल्या लतादिदींच्या आवाजात एक उपजतच जिताजागता दिलासा आहे. त्यांचं गाणं किंवा गायिका म्हणून त्यांची महत्ता ह्याबद्दल बोलण्याची माझी कुवत आणि पात्रता दोन्ही नाही. पण आपल्या सर्वांच्या आयुष्याचा त्या अविभाज्य घटक आहेत हे मात्र नक्की. सुख, दु:ख, प्रेम, करुणा, आशा, निराशा, कोणतीही भावना असो, दिदींचा आवाज आपल्याला सोबत करतो. आनंदाची तीव्रता वाढवतो तर दु:खाची धार बोथट करतो. आता हेच बघा ना, निसर्गाच्या रुपकाला शब्दात गुंफून मनातल्या आशा पल्लवित करणा-या साहिरच्या ह्या काव्याला लतादिदींनी आपल्या आवाजाच्या परिसानं कसं अगदी एव्हरग्रीन करून ठेवलं आहे. सुरावटही सचिनदेव बर्मनांनी अशी काही बांधली आहे, की 'झुला धनक का धीरे धीरे हम झुले, अंबर तो क्या है तारों के भी लब तू लें' ऐकताना आपणही जमिनीवरून आभाळात झेप घेणाऱ्या झोपाळ्यावर हिंदोळतो आहोत अशी भावना होते!
मला प्रसन्न मूडची गाणी ऐकायला, बघायला जरा जास्त आवडतात. गाणं ऐकलं की कसं तरतरीत, ताजंतवानं वाटलं पाहिजे. मनाला उत्साह आला पाहिजे, मरगळ झटकली गेली पाहिजे. अभिनेत्री नूतनला पडद्यावर बघताना अगदी अशी तरतरी येते. देखणं आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व, समर्थ अभिनय आणि मोकळं, स्वच्छ हसू आपलं मन मोहून टाकतं. तिनं साकारलेली दु:खी गाणीसुद्धा उगीच खांदे पाडून येत नाहीत, मग आनंदी गाण्यांबद्दल तर बोलायलाच नको. आता हेच उदाहरण घ्या ना, आधी नायकाची चांगली फिरकी घेऊन मग प्रेम व्यक्त करणारी ही 'तेरे घर के सामने' मधली नूतन आपल्यालाही तहेदिलसे खुश करते!
रात्रीची नीरव शांतता. दिवसभराच्या धकाधकीनं दमून निजेला आलेलं एक चिमुकलं टुमदार गाव. वाद्याच्या साथीनं हळूवार गुणगुणणारी उमद्या वयातली कुणी देखणी तरुणी. गावाला लपेटून घेणारा डेरेदार झाडांनी झाकलेला वळणदार रस्ता, लंबीसी एक डगर. सगळ्या आसमंतावर शुभ्र पांघरूण घातलेलं लख्ख चांदणं. आणि त्या टिपूर चांदण्यांनी सावल्यांची नक्षी रेखलेल्या त्या रस्त्यावरून आपल्या मनालाच एखादी गोष्ट सांगायची आर्जवं करत मोकळ्या गळ्यानं गात निघालेला एक उमदा तरूण. वर्णन ओळखलंत ना? होय, हा किशोरकुमार आणि चित्रपट झुमरू. बाह्यरंग खोडकर असल्याचा देखावा करणारा हा मनस्वी कलाकार अंतरंगात केवढं गांभिर्य बाळगून होता, ते त्याच्या अशा संगितरचनांमधून, त्यानं निर्माण केलेल्या काही चित्रपटांमधून आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. मजरुह सुलतानपुरींच्या सहजसुंदर शब्दांना किशोरनं तितकीच सहजसुंदर, मनात रुंजी घालत रहाणारी चाल बांधली आहे. फार आवडतं. पुन्हा पुन्हा ऐकायला आणि बघायलासुद्धा.
ऐसे में चल रहा हूं पेडों की छांव में
जैसे कोई सितारा बादल के गांव में
परवाच एका मैत्रिणीबरोबर कवी आणि गीतकार ह्या दोघांमध्ये फरक काय अशी चर्चा झाली. निष्कर्ष निघाला तो असा, की कवी हा स्वांत सुखाय लिहितो, जे तुलनेनं सोपं असावं. तर गीतकाराला श्रोत्यांना आवडेल, झेपेलसं लिहावं लागतं, जे फार अवघड आहे. गीताचा विषयसुद्धा स्वतः निवडण्याची मुभा नसते, दिग्दर्शक समोर ठेवेल ती कल्पना शब्दात मांडायची. अनेकदा तर संगितकारानं त्या कल्पनेसाठी धूनही आधीच बांधलेली असते. अशावेळेस केवढी तारेवरची कसरत करावी लागत असेल गीतकार मंडळींना! गीतकार इंदिवर ह्यांनी लिहिलेलं आणि संगितकार रोशन ह्यांनी चपखल सुरांनी सजवलेलं अनोखी रातमधलं हे प्रभावी गाणं ऐकताना नेहमी माझ्या मनात हेच विचार येत असतात. काही म्हणा, आयुष्याचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत आणि सुरेल चालीत सर्वसामान्यांपुढे मांडणं म्हणजे खायचं काम नाही गड्या!
हिंदी चित्रपट संगीत आणि हसरा, ताजातवाना मूड असं समीकरण असेल तर शम्मी कपूर आणि महंमद रफी ह्या दोघांना वगळून पुढे जाताच येणार नाही आपल्याला. पण रात्रीची वेळ आहे म्हटल्यावर दंगा तर टाळायला हवा, नाही का? हरकत नाही, आपल्यासाठी त्या दोघांनी भरपूर प्रकारची मेवा मिठाई ठेवली आहे, त्यातली एखादी लज्जतदार चीज चाखू या का? शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, महंमद रफी आणि शम्मी कपूर ह्या सदाबहार चमूनं तयार करून वाढलेलं हे लाजवाब गाणं ऐकताना आपल्या काही ठेवणीतल्या आठवणी मनाच्या पृष्ठभागावर आल्या नाहीत तरच नवल. देखणा नायक आणि त्याचा भारदस्त आवाज आपल्यावर जादू करतो.
माझ्या वडिलांना आवडणारं एक गाणं आहे. रमैय्या वस्तावैय्या. आपले कान तयार करण्याचं पहिलं काम आई-वडील करत असतात. ते जे काही ऐकतात, त्याचा साहजिकच खूप मोठा प्रभाव आपल्यावर असतो. आपल्या पुढच्या आयुष्यात हा ठेवा पदोपदी आपल्याला सोबत करतो. मग अर्थातच नकळत आपली आवडही त्या ऐकण्याशी सुसंगत होत पुढे जात रहाते. हे असे आई-वडिलांचे आपल्यावर असलेले पडसाद आणि त्यांचे मागोवे घेणं फार रंजक असतं. रफी-मुकेशचे आवाज, शैलैंद्रचे काळजाला हमखास हात घालणारे शब्द, शंकर जयकिशनचं सुमधुर संगीत आणि खूप अप्रतिम कोरस.
रमैय्या वस्तावैय्या
मैनें दिल तुझको दिया
केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर राष्ट्राचंही भूषण असणा-या आशाताई हे एक विलक्षण रसायन आहे. त्यांचं गाणं, त्यांचा स्वयंपाक, वाचन, माणसं जोडण्याची कला सगळं कसं रसरसून असतं. आयुष्यात अनेक संकटं आली, खूप दुःख सहन करावं लागलं, पण आपलं अवखळ मन त्यांनी कधी कोमेजू दिलं नाही. 'अब के बरस भेजो भय्या को बाबूल' असो, की 'कतरा कतरा मिलती है' असो किंवा 'बेचारा दिल क्या करें' असो. मूळच्या शंभर नंबरी गाण्यावर एक प्रसन्न भावनेचा तजेला कायम लखलखत असतो. उस्ताद विलायत खॉंच्या स्वरांनी सजलेले हे कवयित्री लेखिका अमृता प्रीतम ह्यांचे देखणे शब्द ऐका. आशाताईंच्या आवाजानं जणू चारचांद लावलेलं हे कादंबरी चित्रपटातलं गाणं. ऐकायला मंजुळ पण गायला अतिशय अवघड. अशाच गाण्यांना बहुतेक अनवट असंही म्हणतात, हो ना?
अंबर की एक पाक सुराही
बादल का एक जाम उठाकर
घुंट चांदनी पी है हमनें
बात कुफ्र की की है हमनें

Saturday, April 10, 2021

 आभासी जग आणि चांगुलपणा

सातवीत शिकणाऱ्या माझ्या मुलाच्या वर्गमित्राचे आई आणि बाबा दोघेही काही महिन्यांपूर्वी तीन आठवड्यांच्या अंतराने कोरोनाने हिरावून घेतले. घरी त्याचा धाकटा भाऊ आणि म्हातारे आजी आजोबा असतात. झोपडपट्टीत रहाणा-या आणि आजोबा व्यसनाधीन असलेल्या ह्या कुटुंबाचा चरितार्थ आता आजी घरकामं करून चालवते आहे. ह्या दोघा भावांच्या शिक्षणासाठी यथाशक्ती मदतीचं आवाहन मी अगदी मोजक्या मित्रमंडळींना केलं होतं. आणि तशी मदत कोणत्याही विलंबाशिवाय चटकन जमा होत आहे. उमेद वाढवणारं, आशा टिकवून ठेवणारं मला माहिती असणारं काही तरी सगळ्यांपर्यंत पोचवावं असं वाटलं.
ही बातमी कळल्यापासून अस्वस्थ होते. मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाशी बोलून काय करता येईल ह्याबद्दल एकत्रित विचार केला. समंजस मित्रमंडळींची मतं घेतली. आर्थिक मदत उभी करणं आवश्यक होतं. रोख रक्कम कुटुंबाकडे सुपुर्द करणं अव्यवहार्य होतं. म्हणून ही मदत शाळेच्या ऑडिटेबल अकाऊंटमध्ये जमा केली जात आहे. आता जमा होणा-या रकमेचा विनिमय शिक्षकवर्ग गरजेनुसार मुलांसाठी करणार आहे. संपूर्ण शिक्षकवर्ग विश्वासार्ह आणि अतिशय चांगल्या वर्तणुकीचा आहे. लागेल तिथे आम्ही काही पालकही सहभागी होत राहू.
जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे शिक्षणाचा खर्च अत्यल्प आहे. पण मुले दहावी होईपर्यंत दरमहा पुरेसे किराणा सामान, भाजीपाला आणि दूध, अधेमधे कपडे एवढी सोय होऊ शकेल अशा रकमेची तजवीज करत आहोत. मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी तर शिक्षकांनी घेतली आहेच, शिवाय पुढे चरितार्थासाठी त्यांनी योग्य तो अभ्यासक्रम घेणे आणि एकंदरीत सक्षम होण्याकडेसुद्धा शिक्षक लक्ष देतील.
मी ज्या मित्रमंडळींना विचारलं त्यातल्या काही जणांना मी एकदाही भेटले नाहीये. ओळख म्हणावी तर तीही फारशी नाही. सगळं इंटरनेट मैत्र. तरीही त्यांनी सढळ मदतीचा हात पुढे केला आणि त्याबद्दल कुठेही वाच्यता नसावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या भावनेबद्दल आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर, कौतुक वाटलं. म्हणून ही एक छोटीशी पोच ह्या पोस्टद्वारे देत आहे. निराश करणा-या कितीही घटना घडत असल्या तरी जगाचा समतोल ह्या अशा लोकांमुळे टिकून रहातो. मनाला आश्वस्त वाटत रहातं.
मनापासून आभार, मंडळी🙂
ता. क. - मंडळी, पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे ही निव्वळ पोच आहे. आणखी काही मदत लागणार असेल तर त्याबद्दल मुख्याध्यापकांकडून अंदाज घेऊन ज्याला त्याला कळवेन. तूर्तास मदत देऊ करणा-या हितचिंतकांना मनापासून धन्यवाद🙂

Sunday, April 4, 2021

 मार्चमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. तोवर फक्त सरकारी जाहिराती आणि सरकारी वाहिन्यांवरच्या बातम्यांमधून ऐकूनच माहिती होतं हे प्रकरण. 'मध्यम मध्यमवर्गीय' ह्या त्रिशंकू वर्गात मोडणा-या माझी ही कथा काही जगावेगळी नसावी. पण तिथे गेल्यावर ही काय चीज आहे ते बघून थक्क झाले आणि कौतुक वाटलं.

बाबांची आणि माझी असे दोन्ही लसग्रहण कार्यक्रम झाल्यावर हे लिहितेय. दोन्ही अनुभव उत्तम. दोन्ही वेळा तास सव्वा तासात घरी परतलो. बाबांसाठी आधी नंबर लावून आले होते तर माझ्यावेळी सकाळी पावणेनवालाच जाऊन हजर झाले. आरोग्य सेतू वर नोंदणी केल्यानंतर योग्य ती सगळी माहिती मिळाली आणि लस घेतल्यानंतर तशी पोचही आली. मी केंद्रातच स्वॅब देऊन ऐच्छिक टेस्ट करून घेतली, तिथे सांगितले गेल्याप्रमाणे दोन दिवसांनी मोबाईलवर रिपोर्ट आला. कसलीही यातायात करावी लागली नाही. इंजेक्शन्स नंतर प्रत्येकाला खबरदारी म्हणून प्रत्येकी दोन पॅरासिटॅमॉल्स आणि आवश्यक सूचना मिळाल्या. लसीकरणानंतर कोणकोणते त्रास होण्याची शक्यता आणि त्यावरच्या उपाययोजनांचे फलक केंद्रात ठळक लावले आहेत, शिवाय तोंडी सांगितलं जात आहे. प्रत्येक नागरीक चार जणांच्या साखळीतून योग्य त्या नोंदी होऊन पुढे जात रहातो. प्रत्येकाचे काम ठरवून दिलेल्या पद्धतीने नेटके होत आहे. दोन्ही वेळा कर्मचारी संयम पाळताना दिसले.
ह्याच रणधुमाळीत बाकीची नेहमीची कामेसुद्धा केली जात आहेत. उदा. जवळच्या ठिकाणी दुसरी तितकीच सक्षम व्यवस्था करून बालकांसाठी आरोग्य योजना आणि नियमित लसीकरण, गर्भधारणा आणि प्रसुतीसंदर्भात वैद्यकीय मार्गदर्शन, जनतेसाठी इतर आजारपणांबद्दल माहिती, औषधोपचार व योजनांचे प्रसारण वगैरे. बाबांचे लसीकरण झाले तो दिवस जागतिक क्षयरोग दिन होता, त्यादिवशी आरोग्य सेविकेने आम्हां सगळ्यांना संपूर्ण माहिती देऊन मिळणाऱ्या सरकारी मदतीबद्दल विस्तारानं सांगितलं. ते सगळे फलक त्यादिवशी ठळक अक्षरात लावले होते.
माझ्या ओळखीतल्या आणि नात्यातल्या जवळपास सगळ्यांनी - कोल्हापूर आणि पुणे - प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली आहे. सर्वांचे अनुभव समाधानकारक आहेत. भरपूर गर्दी आणि अशक्य कोटीतला ताण असूनही तिथे अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू आहे. सरकारी यंत्रणेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पण लोक तिथेही कर्मचा-यांशी भांडण-तंटे करत असतात. रांग आणि नियम पाळायचे नाहीत, लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबायचं नाही, मास्कचा तर आनंदीआनंद. लस घेतोय म्हणजे कुणावर उपकार करतोय असाही एक भाव सर्रास दिसला. लस घेणार नसलेल्यांची पण तिथे येऊन अंदाज घेणारीही एक श्रेणी दिसली. लस घेऊन कोरोना होणार नाही ह्याची खात्री काय असं विचारणारे हे लोक धोकादायक आहेत. आरोग्य सेतू वगैरे वट्टात माहिती नसलेले, अति माहिती असलेले, फोनवरून नंबर लावून घ्या म्हणणारे, ऐंशीनव्वदीच्या पुढचे निम्नस्तरातले, स्वत:ला सर्वज्ञ समजणारे मध्यमवर्गीय अतिशहाणे अशा सगळ्या प्रकारच्या शेकडो लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातले कर्मचारी रोज हाताळतायत. कोणताही गोंधळ न माजवता, प्रपोगंडा न करता, जास्तीत जास्त बिनचूक काम करत रहाणे ही चेष्टा नाही. हे काम अखंड चालू आहे आणि कोरोना संपला तरी चालू राहिल.
ही यंत्रणा आधीपासून अस्तित्वात होतीच, आता फ्रंटवर आली. सरकार कोणतेही असो, त्यांच्या कार्यक्रमात, दिनक्रमात बदल नाही. खाजगी क्षेत्रात आपल्याला नेहमीपेक्षा थोडं जास्त काम केलं की स्पॉट इंसेंटीव्हज्, सर्व्हिस/ परफॉर्मन्स अवॉर्ड्स् मिळत असतात. इथे तशा काय सुविधा असतात, कल्पना नाही.
कोणत्याही प्रकारची तयारी करण्यासाठी फारशी संधी न मिळताही हे काम आरोग्य विभाग आज पूर्ण क्षमतेने आणि समर्थपणे पेलतो आहे, ह्याची दखल घेऊ या. संपूर्ण आरोग्य खाते आणि विभागाच्या सर्व कर्मचा-यांचे मनापासून अभिनंदन आणि खूप आभार.