म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Saturday, August 28, 2021

 आज तात्यांचा स्मृतिदिन. मला अगदी जवळच्या माणसांनासुद्धा अशी सलगीनं हाक मारायची सवय नाही. पण काही आपापले म्हणून अपवाद असतातच. व्यंकटेश माडगूळकर त्या अपवादांपैकी एक. तात्यांवरचा खुद्द तात्यांचा सहभाग असलेला आणि पुणे आकाशवाणीनं केलेला एक सुंदर कार्यक्रम सकाळी रेडिओवर ऐकला आणि मन प्रसन्न झालं.

माझी बहिण, बाबा, आत्या, सगळ्यांचे हे लाडके लेखक. १८साली कोल्हापुरात येताना जवळची बहुतेक जवळपास सगळीच पुस्तकं वाटून टाकली. त्याआधी दोन वर्षं पुस्तकं विकत घेणं बंद केलं होतं, ते आता अलिकडे थोडं पुन्हा सुरू केलंय. त्यामुळे घरी आता मुदलात फार पुस्तकंच नाहीत. मात्र जेवढी आहेत त्यात पुलं आणि गोनिदांबरोबरीनं तात्या माडगुळकरांची सापडतील. शिवाय कुणाला भेट द्यायलासुद्धा तात्यांची पुस्तकं फार आवडतात.
मला बाळबोध, रोजच्या जगण्याशी निगडित, सुलभ साहित्य मानवतं. गंभीर, डोकं तासणारी किंवा तर्काला कामाला लावणारी पुस्तकंच काय, आता तर माणसं पण नको असतात. आपापला पिंड. कधीकाळी योगिनी जोगळेकर, शैलजा राजे, ज्योत्स्ना देवधर वगैरेंच्या कादंब-यांचा सलग फडशा पाडलेला आहे. आजही खूप ताण किंवा चिंताजनक मन:स्थितीत अशी पुस्तकं माझी स्ट्रेसबस्टर्स असतात. तात्यांच्या साहित्याला ह्या पंगतीत बसवता येणार नाही, पण माझ्यासाठी बसल्या जागी टोटली पळून जाण्याचा ते हमखास मार्ग आहेत एवढं खरं. केव्हाही काहीही उघडावं आणि स्वत:बरोबरच रोजच्या आयुष्यालाही थोडा वेळ सुखानं होल्डवर टाकावं.
करुणाष्टकं मी तात्यांमुळं वाचायला, म्हणायला सुरुवात केली. त्यांनी केलेलं आईचं वर्णन वाचताना मला गुंगी येते. त्यांचे दिघंचीचे काका म्हणजे बरंचसं आमच्या मोठ्या प्रभाकरकाकांचंच रुप आहे. माणदेशी माणसं आमचं आवडतं बेडटाईम वाचन आहे. जंगल वाचायला चितमपल्लींच्या कितीतरी आधी तात्यांनी शिकवलं. त्यांचं बालपण वाचताना त्या घटना आपल्याच कुणाकुणाच्या आयुष्यातला वाटतात. हाल आणि झट्या भरपूर, पण त्यांची मांडणी रिलेटेबल आहे. अलिकडेच सोलापूर कोल्हापूर एस टी प्रवासात तात्यांनी वारंवार उल्लेख केलेली आटपाडी, दिघंची, खटाव ही गावं, माण परिसराचा मैलोनमैल सपाट आणि रखरखीत प्रदेश, कोपरी-मुंडाशातली माणसं, सावळ्या तरतरीत चटचट लवलवणा-या बायका वगैरे बघून जुन्या ओळखीची भावना झाली. हा कनेक्टच तर तुमच्या आवडींचे कप्पे व्यापत असतो.
ब-याच वर्षांपूर्वी एकदा किशोर मासिकाच्या काही कामासंदर्भात राजु पंडितबरोबर ज्ञानदा नाईकांकडे गेले होते. अक्षर बंगल्यात. तेव्हा त्यांना विचारून भक्तीभावानं तात्यांच्या खोलीत गेले. त्यांचं लिखाणाचं टेबल, त्यांचा पुस्तकांचा संग्रह, भिंतीवर लावलेली त्यांची चित्रं आणि रेखाटनं, टेबलासमोरची खिडकी आणि त्यातून दिसणा-या गुलमोहराची जागा असं सगळं थांबून बघितलं. आता तो बंगला नाही. पण माझं मात्र एक तीर्थाटन झालं हे समाधान आहे. तेव्हा फोटोंची चलती नव्हती ही एक चांगली गोष्ट घडली. कारण एरवी क्षीण असणा-या माझ्या स्मरणात त्या खोलीचं तेव्हा उमटलेलं चित्र आजही जसंच्या तसं इंटॅक्ट आहे. फोटो घेतला असता तर कदाचित तसं झालं नसतं.
तात्यांना सादर अभिवादन.




No comments:

Post a Comment