आपल्या हेकेखोरपणाबद्दल फक्त घरच्यांकडून ऐकून भागत नसतं, स्वतःचे स्वतःलाही वरचेवर दाखले मिळत असतातच. अलिकडचीच गोष्ट.
लॉस्ट रेसिपीजचा कोल्हापूर एपिसोड बघताना डॉ. कुरुष दलालांकडून कोल्हापूरबद्दल ऐकताना कारण नसताना मला उपऱ्यासारखं वाटलं. अगदी तेवढी टोकाची नसली, तरी थोडीशी तीच गत सई कोरान्ने-खांडेकरांना ऐकताना झाली. कारण, मला हव्या होत्या मोहसिना मुकादम! आहे की नाही, गंमत? दोघंही उत्तम आणि बरोबर सांगत होते बरं का, पण मोहसिना मुकादम असत्या तर मला जास्त बरं वाटलं असतं ही खरी गोष्ट. उगीच आपलं काहीतरी. एरवी बऱ्याचदा असतात, मात्र नेमक्या ह्या भागात नव्हत्या. आपल्याही नकळत मनात किती गाठी, निरगाठी दबा धरून बसलेल्या असतात आणि त्या कधी उसळी मारून वर येतील, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. मजाच वाटली मला.
आदित्य बाळचं तोंड त्या ताज्या झणझणीत कांदा लसूण चटणीनं पोळलं, पण पठ्ठ्या मान्य करेल तर शपथ. कॅमेऱ्याला जाणवणार नाही असं हायहुई करत 'थोडा तिखा है, पर बहुत अच्छा है, टेस्टी है' म्हणत राहिला बापडा. ती कोल्हापुरी चटणी बिनकांद्याची होती. रोजच्या ओळखीतल्या पदार्थांची अशी वेगवेगळी व्हर्जन्स बघणं इंटरेस्टिंग असतं. ह्याच भागात उडदाचं माडगं दाखवलं, जे मी अजून कधीच चाखलेलं नाही. भलतंच पौष्टिक. भाजलेल्या काळ्या उडदाचं पीठ खळखळ उकळणाऱ्या गुळाच्या पाण्याला लावून, स्वादापुरती वेलदोड्याची पूड भुरभुरलेली किंचित दाटसर लापशी असते, जी खास करून पैलवान पितात. चुलीवर माडगं रांधणाऱ्या त्या हसऱ्या बाई फार देखण्या आहेत, शिवाय चुलीच्या आचेनं त्यांना डोळे उघडे ठेवणं मुश्किल झाल्यामुळे त्यांचे अर्धोन्मिलीत डोळे सुरेखशा लालसर छटेचं आयशॅडो लावल्यासारखे वाटले. कोल्हापुरातच कुठेतरी रहात असणारेत त्या. आपल्यातलं कुणी ओळखत असेल तर माझा अभिप्राय अवश्य पोचवा त्यांना.
हेक्यावरून कुठल्या कुठे आले! पण मोहसिना मुकादमांच्या ऋजू बोलण्यातून तांबड्या-पांढऱ्या रश्शाबद्दल किंवा केशरी मटनाबद्दल ऐकणं कानांना जास्त चविष्ट लागलं असतं, हा माझा अडेलतट्टूपणा, एपिसोड जुना व्हायला आला तरी अजून जसाच्या तसाच आहे. असं गोल घुमत ये रे माझ्या मागल्या आणि ताककण्या चांगल्या करण्यालाच कोल्हापुरात इरून फिरून गंगावेश म्हणतात, हे वेगळं सांगायला नकोच.
No comments:
Post a Comment