म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Monday, December 30, 2019

 आवडत्या कवीची आवडत्या संगितकारानं सजवलेली अत्यंत लाडकी रचना. कित्येक वर्षं मी हे शब्द माऊलींचे आहेत असंच समजत होते, फुलांचे केसरा, अमॄताचा चंद्रमा वगैरे शब्दयोजनांमुळे. पण हे मंगुआजोबा आहेत हे कळल्यावर प्रचंड आदर वाटला. तेव्हापासून माझ्यासाठी तरी ते 'द पाडगावकर' झाले. उषाताई भलत्या मधाळ गायल्यायत. त्यांच्याकडून असं ऑफबीट मीना खडीकर, मानस मुखर्जी, विश्वनाथ मोरे आणि अर्थातच खळेकाकांनी अप्रतिम गाऊन घेतलंय. पाडगावकरांना आठवताना नेहमी प्रथम हे गीत येतं मनात, म्हणून आज ह्याच गीतानं त्यांना अभिवादन. ~~~आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी~~~~

Friday, December 27, 2019

 वेदशास्त्रसंपन्न डॉ. चिं. ग. काशीकर

काशीकर आजोबांचा आज स्मॄतीदिन. सकाळी दिनवैशिष्ट्यात आकाशवाणीवर ऐकलं आणि आजोबांची खूप आठवण आली. आम्ही १९९३ ते ९८ ऐन सदाशिव पेठेत रहात होतो. पुण्याच्या नावाने खपवले जाणारे कोणतेही अनुभव ह्या सहा वर्षांच्या कालावधीत एकदाही आले नाहीत, उलट पुण्याबद्दल आधीच असलेलं प्रेम ह्या काळात घट्ट झालं. शेवटची अडिच वर्षं पिल्ल्यांच्या शाळेच्या गल्लीत डॉ. काशीकरांचा मौल्यवान शेजार लाभला होता. ते मोठे पंडित आहेत हे जाणवायचं, पण आजोबा गेल्यावर बातम्यांमध्ये त्यांची महती ऐकल्यानंतर ते मोठेपण प्रकर्षाने लक्षात आलं.
काशीकर आजोबा आमच्या खालच्या मजल्यावर रहायचे. घराचा दरवाजा कायम उघडा. जिन्यावरुन जाता येताना बाहेरच्या खोलीतच एका कोप-यातल्या टेबलवर ते लिहित वाचत बसलेले दिसायचे. भरपूर लेखन-संशोधन केलेल्या आजोबांची आतल्या खोलीतही एखादी अभ्यासिका असेल कदाचित, आम्ही आत घरात क्वचितच जायचो, कारण ते बाहेरच असायचे.
आजोबा मुलखाचे प्रेमळ, हसरे, मऊ आवाजात आणि मुख्य म्हणजे आमच्या पातळीवर येऊन आपुलकीनं बोलणारे. सावळा वर्ण आणि चष्म्यातूनही हसणारे डोळे. स्वच्छ धोतर आणि सुती बंडी किंवा सदरा हा घरातला वेश आणि बाहेर जाताना वर खादीचा बंद गळ्याचा कोट चढवायचे, हातात काठी असायची. इतकं पांडित्य त्यांचं, पण आम्ही दिसलो की प्रत्येक वेळी जिव्हाळ्याने विचारपूस करणारच. त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं हा समॄद्ध करणारा अनुभव होता. आम्हा दोघी बहिणींना ते फार आवडत. आमचे आजोबा आयुर्वेदाचार्य आणि स्वातंत्रसैनिक होते, गांधीजींचा सहवास लाभलेले. त्यांच्याविषयी आम्ही खूपदा बोलल्याचं आठवतंय, म्हणजे तेच चौकशी करायचे, तेव्हाच्या वातावरणाबद्दल सांगायचे. कारण आमच्यामध्ये सामायिक असे विषय फार कमी होते, पण आजोबांशी संवाद साधताना तो अडथळा कधी आलाच नाही. कोल्हापूरहून आमचे बाबा आले की आवर्जून त्यांना भेटायचे, तेव्हा बाबांशी बोलतानाही तीच सहजता. काशीकरआजोबा गेले तेव्हा आम्ही तिथे रहात नव्हतो, तेव्हाही बाबांचाच कोल्हापूरहून फोन आला कारण दूरदर्शनला बातम्यांमध्ये ते गेल्याचं सांगितलं गेलं. आजोबांकडे सातत्याने माणूस असे, त्यांची मित्रमंडळी आलेली असायची, विद्यार्थी यायचे, मोठमोठ्याने संस्कॄतमध्ये संभाषण, हास्यविनोद चालायचे. अचंबा वाटायचा. टिमवीत ते फार मोठ्या पदावर आहेत इतकंच त्रोटक माहिती होतं, कारण ना आजोबा कधी त्यांचं मोठेपण जाणवून देत ना आम्ही तितके चौकस होतो.
ते अखंड कामात व्यग्र असायचे. तब्येत उत्तम राखून होते. नीटनेटकं, प्रसन्न व्यक्तिमत्व. कामात असले तरी त्यांच्याशी बेधडक केव्हाही बोलता यायचं, किंबहुना जिन्यात कुणाचीही पावलं वाजली तरी ते दाराकडे बघायचे, जाणा-या येणा-याशी दोन शब्द बोलायचे. पीजी म्हणून रहाणा-या विद्यार्थी विद्यार्थिनींबद्दल ज्येष्ठ नागरीकांचे सहसा काही पूर्वग्रह असतात आणि ते मनाते ठेवूनच त्यांच्याशी बोललं जातं, तशी वागणूक आजोबांकडून आम्हाला कधीच मिळाली नाही. त्याउलट आजींचंच जरा दडपण यायचं.
आजी सुरेख रंगांच्या काठा पदराच्या जरीच्या नऊवारीत, काचेच्या बांगड्या, साधंसं मंगळसूत्र आणि ठळक कुंकवाच्या टिळ्यात अगदी मूर्तीमंत सवाष्ण असायच्या. वर्ण लख्ख गोरा. आजोबांना अगदी शोभेशा होत्या. मुद्रा जरा त्रासिक, कपाळावर कायम आठी आणि बोलणं थोडं तुसडं. त्यामागे तब्येतीच्या तक्रारी, संसारातले कडूगोड अनुभव, आजोबांची व्यवधानं सांभाळणं, अशी अनेक कारणं असू शकतील. घरचा स्वयंपाक, आलंगेलं सगळं स्वत: सांभाळायच्या. आमच्याशी ब-या बोलायच्या, पण एकंदरीत स्वभाव खाष्ट असावा. अर्थात तेव्हा त्यांचं वयही पुष्कळच होतं, आजोबाच नव्वदीकडे झुकलेले होते. लहर असेल तर गप्पा मारायच्या, एखादा पदार्थ वर पाठवायच्या किंवा वाटीत लाडू वगैरे हातावर ठेवायच्या. पण हे नियमित नाही. संसार मात्र समर्थपणे सांभाळला असावा त्यांनी, तो सूर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत जाणवायचा, हे आज आठवताना कळतंय.
आजोबांचं तसं नव्हतं. त्यांचं काम केवढं महत्त्वाचं आणि एकाग्रतेनं करण्याचं होतं, पण कधीही त्याचं त्यांनी अवडंबर माजवलेलं आठवत नाही. ते पहिल्याच मजल्यावर, खरंतर स्टिल्ट मजला होता तो, रहायचे. तीन मजली इमारतीत अखंड वर्दळ, मधे चौक आणि चारी बाजूंनी फ्लॅट्स, पुढे चाळीसारख्या कॉमन गॅल-या अशी रचना असल्यामुळे बायका आपापल्या दारात उभ्या राहून समोर, खाली, वर अशा कशाही कोणत्याही वेळी गप्पा मारायच्या, त्यात आम्हीही आलो. तळमजल्यावरच्या मोठ्या चौकात मुलं खेळत असायची. त्यात आजोबांची गोडुली, चुणचुणीत आणि हुशार आजोबांना शोभणारी नात अमरजाही असायची. एक छोटी इमारत सोडून पलिकडेच अगदी लागून वाहता टिळक रोड आणि टिळक स्मारक चौक. त्यामुळे गाड्यांचे मोठे हॉर्न्स, मिरवणुका वगैरे आत ऐकू यायचं. हे सगळे आवाज सर्व मजल्यांपर्यंत घुमत पोचायचे. पण आजोबांना कधीही त्या दंग्याने कलकल झालीये, त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आलाय असं झालेलं आम्ही होतो तेवढ्या काळात तरी आठवत नाही. कारण ती मुळात वॄत्तीच नव्हती त्यांची. समाधानी, तॄप्त, शांत मनाचे होते. इतके दिवस शेजारी राहूनही त्यांनी त्यांचं मोठेपण, पद जाणवू दिलं नाही, ह्यातच खरंतर सगळं काही आलं. माणसं मोठी कशी होतात, असतात, ते त्यांच्याकडून समजावं. त्यांची मुलगी आमच्या मजल्यावर समोरच रहायची, तीही हुशार आणि कर्तबगार असावी, मात्र तिचाही चेहरा सदोदित दुर्मुखलेला असायचा. नात मात्र आजोबांवर गेली होती. अगदी प्रसन्न. अमरजा आता काय करते ह्याबद्दल उत्सुकता आहे, काही संपर्क नसल्याने कल्पना नाही.
शोभनाताईंशी बोलताना आजोबांचे टिमवीतले अनुभव, त्यांचे इतर पैलूही कळले. आदर द्विगुणित झाला. पण ताईंशी ओळख होईपर्यंत आजोबा गेले होते, नाही तर भेटता आलं असतं पुन्हा. शोभनाताईंनीच आजोबांच्या हुशार, कर्तॄत्ववान मुलावरही एक लेख लिहीला आहे. काशीकरआजोबा आठवले की पुलंनी रेखाटलेलं त्यांच्या आजोबांचं 'ॠग्वेदीं'चं व्यक्तिचित्र आठवतं. बरंच साधर्म्य होतं दोघांमध्ये. त्यांचा जवळून सहवास मिळाला हे आमचं भाग्य. आजोबांना आज सादर अभिवादन आणि आकाशवाणीचे मनापासून आभार.

 खरंच! सध्या अनेक ताण आहेत. त्यामध्ये अलिकडेच बेकारीचीही भर पडली आहे. पण कोणतीही फेज कायम रहात नाही, एवढी खूणगाठ मनाशी प्रत्येकाने बांधायलाच हवी. असं म्हणणंही तितकंसं सोपं नाही. डॉक्टरांना नियमित भेटत, औषधं घेत, मित्रमंडळींशी सतत बोलतं राहून, कधी मनसोक्त हुंदडत, कधी पोटभर रडत, तर कधी स्वस्थ बसून आधी अनेक गोष्टी स्वत:शी स्विकारून मगच हे लिहू शकते आहे. मदत देण्यात आहे तसाच आनंद ती घेण्यातही आहे. आपल्याला जाणवत नसलं तरी, आपल्या अस्तित्वाला महत्त्व आहे, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी, कुटुंबासाठी, जीवलग मित्रमंडळींसाठी. प्रत्येकाला, अगदी लहान मुलांनाही ताण आहेत आता, पण ताणाचे दिवसही जातात. आयुष्य खरंच सुंदर आहे ह्याबद्दल आपणही खात्री ठेवायला हवी आणि आजुबाजुच्यांना, मुलांनाही ती पटवून द्यायला हवी. असा कुणी धीर सोडला की वाईट वाटतं, भले ओळखपाळख नसेना.

Sunday, December 22, 2019

 नील: कशाबद्दल चालल्या आहेत ह्या इतक्या दंगली? इतके का चिडलेत लोक?

मी: सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणतंय. आपल्या सर्वांना आपण भारतीयच आहोत हे कदाचित सिद्ध करावं लागेल. त्यामुळे लोकांना वाईट वाटतंय, म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांचा विरोध चालू आहे.
नील: मग करायचं ना सिद्ध, इतका दंगा का करतायत?
मी: बरं. समज, आज आजोबांनी आपल्याला सांगितलं, की कशावरून तुम्ही कोडोलीकर आहात? मला हे सिद्ध करून दाखवा, तर काय करशील?
नील: त्यात काय, मी शांतपणे सांगीन त्यांना, मी नील कोडोलीकर आहे असं.
मी: तू काहीही सांगशील रे, त्यावर ते असाच कसा विश्वास ठेवतील? तुझ्या म्हणण्याला काही पुरावा नको का? तुझा शेरलॉक कसा काम करतो? पुरेसे पुरावे हातात असल्याशिवाय काही बोलतो का?
नील: बरोबर. मी माझी कागदं दाखवीन आजोबांना. मग तर त्यांना मान्य करावंच लागेल मी कोडोलीकर असल्याचं.
मी: बरोबर. पण हे आत्ता बोलतोयस इतक्या शांतपणे खरंच बोलशील त्यांच्याशी?
नील: हो, म्हणजे काय?
मी: बरं. घराच्या पाटीवर तुझं नाव लिहीलं नव्हतं तेव्हा तू जो थयथयाट केला होतास, तो आठवतोय का रे तुला? मीही रहातो ह्या घरात, मग फक्त तुमची दोघांचीच नावं का पाटीवर? हे माझं पण घर आहे, माझे मित्र आल्यावर पाटीवर माझं नाव नाही, त्यांना कसं वाटेल, वगैरे रागावून किती दिवस काय काय बोलत होतास मला. अजूनही कधीतरी कशाचाही राग आला की ओरडत रडत म्हणतोसच की नाही, मी सांगितल्यावर माझं नाव घातलं, आधीपासून नव्हतं घातलं असं.
नील: (ओशाळत हसत) हो मग, मला किती वाईट वाटत होतं तेव्हा.
मी: तसंच लोकांनाही भयंकर वाईट वाटतंय आत्ता. आणि तू किती दिवस थयथयाट करत होतास, तसाच तेही हा वेगवेगळ्या मार्गांनी थयथयाटच करतायत. पण तू आधी म्हणालास तसं हे शांतपणे करता येऊ शकतं. मी चिडून ओरडून सांगितलेल्या गोष्टींपेक्षा गोड बोलून सहज जेव्हा काही तरी सांगते, तेव्हा तू वाद न घालता चुटकीसरशी ऐकतोस, बरोबर आहे का?
नील: होच मग! तू ओरडून बोललीस की तू मालकीण आहेस आणि मी तुझा नोकर असल्यासारखी मला वागवतेयस असं वाटतं, मग मला खूप राग येतो. म्हणून मी ऐकत नाही. एकीकडे म्हणायचं हे घर सगळ्यांचं आहे आणि दुसरीकडे फक्त तू सांगणार तेच होणार घरात, असं का? वा गं, हे बरंय की!
मी: (ओशाळत हसत) हो की रे, माझ्या लक्षातच आली नाही ही गोष्ट. पण बघितलंस का, आत्ता आपल्या देशातही हेच सगळं घडतंय. त्यामुळे खूप नुकसान होतंय.
नीलला ह्यावर काही बोलता आलं नाही. ते अपेक्षितही नाही. हे सगळं जसं बोललं गेलं तसंच्या तसं लिहीलंय. काल सकाळी सव्वा सातला शाळेत जाताना तो पायात मोजे आणि बूट चढवत एकीकडे आकाशवाणीच्या ठळक बातम्या कानावर पडत असताना जिन्यात बसून झालेला निव्वळ दोन ते तीन मिनिटांचा हा ताजा संवाद. रोज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरही हिंसाचाराच्या बातम्या तो वाचतोच आहे, पण त्यांचं गांभीर्य झिरपण्याइतकं अजून त्याचं वय नाही. ते समजावण्याइतका माझाही आवाका नाही. पण राहून राहून ९२ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या बातम्या वाचताना उडालेला माझा गोंधळ आठवतो. तरी मी बारावीत होते, म्हणजे काही लहान नव्हे. त्यामानाने ह्या मुलांना बरंच समजतंय. ते नीट मार्गाने पोचवण्याची जबाबदारी मात्र न पेलवणारी वाटते.
उघड स्वगत:
लहानपणी शाळेत जाताना येताना दोन्ही वेळेस गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेणारे आम्ही सगळे, जेव्हापासून देवळात सरसकट आमच्यासाठीही चौक्या पहारे बसले, नियम लागू झाले, तेव्हापासून एकाएकी उपरंच वाटायला लागलं. पण त्याला काही इलाज आहे का? पूर्वी लोकांकडे स्वतःची वाहनं इतकी नव्हती, सुट्ट्या वगळता सगळीकडचीच गर्दी आटोक्यात असे. आता सगळं सामाजिक चित्रच बदललं, जे होतंय ते सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अपरिहार्य आहे. पण हे बुद्धीला कितीही पटत असलं तरी अंबाबाईच्या देवळात गेल्यावर मनानं पचवताना जडच जातं. ह्या क्षुल्लक बाबीची ही कथा, तिथे भारतीयत्वाबद्दल काय बोलावं! ह्यानिमित्ताने फाळणीच्या वेळी सीमाभागातील लोकांची काय मनःस्थिती असेल ह्याची मात्र एक बारीकशी चुणूक जाणवून जातेय. किरण देसाईंची The Inheritance of Loss आणि अमिताभ घोषांची The Shadow Lines अभ्यासाला होत्या, त्या वाचतानाही असेच अनेक उलटेसुलटे, कधी विषण्ण तर कधी निरुत्तर करणारे प्रश्न पडलेले आठवतात. आणि अशा कादंब-या अभ्यासाला का, ही तेव्हा आकलन न झालेली बाब आज लक्षात येतेय, पटतेय!

Thursday, December 12, 2019

 चिरंजीवांचं ब्लूटूथ


Thursday, December 5, 2019

 व्हिटॅमिन 'डी'युक्त गाजर मटार उपमा आणि जायफळाची कॉफी. सोबत उगीच लिंबाचं गोड लोणचं.

पुण्यातल्या एखाद्या नाट्यगृहातलं रात्रीच्या प्रयोगातलं मध्यंतर किंवा घरचं एखादं कार्य चाललेली मंगल कार्यालयातली लगबगीची सकाळ आठवली❤️