म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, April 19, 2024

 #आकाशवाणीपुणेपरिवार #आकाशवाणी #स्वमदतगट #parkinsonssupport #parkinsonsawareness #पार्किन्सन्समित्रमंडळ

आज सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावरून पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या स्व-मदत गटाच्या कामासंदर्भात मंडळाच्या अध्यक्ष शामलाताई, उपाध्यक्ष डॉ शोभनाताई आणि कार्यवाह मृदुला कर्णींची उत्तम मुलाखत प्रसारित झाली. या मंडळाचं काम कित्येक वर्षं चालू आहे आणि कोरोनोत्तर काळानंतर तर सर्व प्रकारच्या माध्यमांचा अतिशय कल्पक मार्गांनी, फार प्रभावीपणे वापर करत मंडळ अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोचत आहे. या प्रचंड कामाचा आवाका जेमतेम अर्ध्या तासात मांडणं ही अवघड गोष्ट आहे. तरीही शामलाताई आणि शोभनाताईंनी शक्य होईल तितकी माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अर्थात त्यांच्यासारख्या झोकून देऊन काम करणाऱ्या लोकांनी तेही कौशल्य आत्मसात केलेलं असतं, म्हणून ते जमतं. मात्र असं जाणवलं की अशा प्रकारच्या मुलाखतींसाठी निदान दोन भाग तरी ठेवले जावेत. अर्ध्या तासात काही वर्षांचा आढावा माववणं का करायला लावायचं, एकवेळ मानधन नाही दिलं तरी चालेल, पण ते काम जास्तीत जास्त पोचलं तर त्या माध्यमाचा खऱ्या अर्थाने त्या कामासाठी लाभ होईल.
अगदीच कल्पना आहे की सरकारी प्रसारमाध्यमांचे नियम, कार्यक्रमांची स्वरुपं, परवानग्या, मानधन वगैरे सगळं काटेकोर असतं. पण जेव्हा सेलिब्रिटी लोकांच्या मुलाखतींचे चार चार सहा सहा भाग प्रसारित होतात, तेव्हा त्याला श्रोतृवर्ग जास्त असतो म्हणून निराळे निकष असतात का, तेव्हा मानधनाचं वगैरे कसं करतात ते समजत नाही.
आकाशवाणीवर खरंतर सर्वच प्रकारच्या मुलाखती मोठ्या प्रमाणावर होतात. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, शहरी-ग्रामीण समस्या, सरकारी योजना, अनंत जीवनावश्यक विषय केवळ आकाशवाणीवरच ऐकायला मिळतात. पण तरीही सेलिब्रिटींना जरा अधिक स्लॉट्स मिळतात. मनोरंजन दिलं पाहिजे लोकांना, हे बरोबरच. पण अनेकदा स्पष्टपणे समजतं की हे लोक पुरेशी तयारी सुद्धा करून आलेले नसतात. तेच तेच घोळत सांगतात किंवा त्यांचं काम किंवा अनुभवच अजून एवढा तोकडा आहे, की वायफळ बडबडत बसलेत. निव्वळ खूप वर्षं कामं केली म्हणजे सांगण्यासारखं काही साठतंच असं मुळीच नाही. गाण्यांची निवडही फार श्रवणीय नसते. एकंदरीत उजेड असतो. आणि हे खात्रीनं माझ्यापेक्षा आकाशवाणीच्या मुलाखतकर्त्यांना तर फारच खटकत असेल. पण नावं लोकांना सुपरिचित असतात, त्यांचाही इलाज चालत नसेल. तेव्हा असा प्रश्न हमखास पडतो, यांना का म्हणून इतका प्रचंड वेळ अलॉट होतो? की करमणूक क्षेत्रात काम करणारे लोकच सगळीकडे भाव खाऊन जाणार? अशानं इतर महत्त्वाची कामं तपशीलवार स्वरूपात लोकांपर्यंत पोचणार कशी? त्यातही ही अपेक्षा सरकारी प्रसारमाध्यमांकडूनच करता येणं शक्य आहे. खाजगी रेडिओ स्टेशन्स तर करमणुकीचे कार्यक्रम सुद्धा सलग पाच मिनिटं वाजवू शकत नाहीत, काय त्यांच्या अडचणी असतील त्या असोत.
आकाशवाणीवर अलीकडे गायक, कवी, अभिनेत्यांच्या आई-मुलगी, बहिणी-बहिणी, मैत्रिणी-मैत्रिणी अशा जोड्या बोलावतात. त्यातल्या त्यात जरा नाविन्य म्हणून काही हरकत नाही. पण किती भाग असावेत? अनिता दाते आणि तिची मैत्रीण यांचे चार भाग झाले. एक सेलिब्रिटी जोडपं आलं होतं काही महिन्यांपूर्वी. त्यांचे तर सहा भाग तरी नक्की एअर झाले! अर्थात त्यात गाणी असतात, आणि त्यांनी कामही केलेलं आहे, नाही असं नाही, पण सहा भाग अतीच वाटले. हेच उदाहरण ठळक देण्याचं कारण म्हणजे त्या बाईच जादा आणि चांगलं ठाशीव बोलत होत्या, पण काम बुवांनी जास्त केलंय हे माहीत असल्यामुळे मी वैतागून दोन तीनदा रेडिओच बंद करून टाकला.
त्या पार्श्वभूमीमुळे आज शामलाताई आणि शोभनाताई ज्या प्रकारे एकमेकींना अगदी पूरक बोलत, माहिती उलगडून सांगत होत्या, आजारपणाशी संबंधित विषय असूनही त्याचा जो एक सहज आणि आश्वस्त टोन त्यांनी पोचवला, ते ऐकताना यांना आणखी वेळ मिळायला पाहिजे होता असं फारच प्रकर्षानं वाटलं. आधीच्या भागात जी माहिती आली ती सोडून राहिलेले मुद्दे घेता येतात, कामा संबंधीचे अनुभव आणि स्व-मदत मिळाल्यामुळे गरजूंच्या आयुष्यात झालेले बदल आणि परिणाम, मिळालेले अभिप्राय आणि पावत्या, असं पुष्कळ कव्हर करता येऊ शकतं. आणि समाजोपयोगी कामांच्या बाबतीत त्या संबंधित सर्व पैलू व्यवस्थित चर्चिले जाणं, हे महत्त्वाचं आहे. बराच काळ जाणवत राहिलेली ही गोष्ट पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या निमित्ताने आज मला व्यक्त करावीशी वाटली. आकाशवाणीला पत्र लिहून हे सुचवायचा विचारही आला. मी आधी म्हणाले तसं, वाटल्यास मानधन नका देऊ. पण कामाच्या विस्तारानुसार पुरेसा वेळ द्या. वीस वीस वर्षांचं सर्वदूर पसरलेलं कंस्ट्रक्टिव्ह काम अर्ध्या तासात कोंबणं हे काही बरोबर नाही, गड्या हो. आकाशवाणीची चाहती म्हणून इतना तो कहना बनता है, बॉस!

No comments:

Post a Comment