आवडत्या कवीची आवडत्या संगितकारानं सजवलेली अत्यंत लाडकी रचना. कित्येक वर्षं मी हे शब्द माऊलींचे आहेत असंच समजत होते, फुलांचे केसरा, अमॄताचा चंद्रमा वगैरे शब्दयोजनांमुळे. पण हे मंगुआजोबा आहेत हे कळल्यावर प्रचंड आदर वाटला. तेव्हापासून माझ्यासाठी तरी ते 'द पाडगावकर' झाले. उषाताई भलत्या मधाळ गायल्यायत. त्यांच्याकडून असं ऑफबीट मीना खडीकर, मानस मुखर्जी, विश्वनाथ मोरे आणि अर्थातच खळेकाकांनी अप्रतिम गाऊन घेतलंय. पाडगावकरांना आठवताना नेहमी प्रथम हे गीत येतं मनात, म्हणून आज ह्याच गीतानं त्यांना अभिवादन. ~~~आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी~~~~
म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...
Monday, December 30, 2019
Friday, December 27, 2019
वेदशास्त्रसंपन्न डॉ. चिं. ग. काशीकर
काशीकर आजोबांचा आज स्मॄतीदिन. सकाळी दिनवैशिष्ट्यात आकाशवाणीवर ऐकलं आणि आजोबांची खूप आठवण आली. आम्ही १९९३ ते ९८ ऐन सदाशिव पेठेत रहात होतो. पुण्याच्या नावाने खपवले जाणारे कोणतेही अनुभव ह्या सहा वर्षांच्या कालावधीत एकदाही आले नाहीत, उलट पुण्याबद्दल आधीच असलेलं प्रेम ह्या काळात घट्ट झालं. शेवटची अडिच वर्षं पिल्ल्यांच्या शाळेच्या गल्लीत डॉ. काशीकरांचा मौल्यवान शेजार लाभला होता. ते मोठे पंडित आहेत हे जाणवायचं, पण आजोबा गेल्यावर बातम्यांमध्ये त्यांची महती ऐकल्यानंतर ते मोठेपण प्रकर्षाने लक्षात आलं.
काशीकर आजोबा आमच्या खालच्या मजल्यावर रहायचे. घराचा दरवाजा कायम उघडा. जिन्यावरुन जाता येताना बाहेरच्या खोलीतच एका कोप-यातल्या टेबलवर ते लिहित वाचत बसलेले दिसायचे. भरपूर लेखन-संशोधन केलेल्या आजोबांची आतल्या खोलीतही एखादी अभ्यासिका असेल कदाचित, आम्ही आत घरात क्वचितच जायचो, कारण ते बाहेरच असायचे.
आजोबा मुलखाचे प्रेमळ, हसरे, मऊ आवाजात आणि मुख्य म्हणजे आमच्या पातळीवर येऊन आपुलकीनं बोलणारे. सावळा वर्ण आणि चष्म्यातूनही हसणारे डोळे. स्वच्छ धोतर आणि सुती बंडी किंवा सदरा हा घरातला वेश आणि बाहेर जाताना वर खादीचा बंद गळ्याचा कोट चढवायचे, हातात काठी असायची. इतकं पांडित्य त्यांचं, पण आम्ही दिसलो की प्रत्येक वेळी जिव्हाळ्याने विचारपूस करणारच. त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं हा समॄद्ध करणारा अनुभव होता. आम्हा दोघी बहिणींना ते फार आवडत. आमचे आजोबा आयुर्वेदाचार्य आणि स्वातंत्रसैनिक होते, गांधीजींचा सहवास लाभलेले. त्यांच्याविषयी आम्ही खूपदा बोलल्याचं आठवतंय, म्हणजे तेच चौकशी करायचे, तेव्हाच्या वातावरणाबद्दल सांगायचे. कारण आमच्यामध्ये सामायिक असे विषय फार कमी होते, पण आजोबांशी संवाद साधताना तो अडथळा कधी आलाच नाही. कोल्हापूरहून आमचे बाबा आले की आवर्जून त्यांना भेटायचे, तेव्हा बाबांशी बोलतानाही तीच सहजता. काशीकरआजोबा गेले तेव्हा आम्ही तिथे रहात नव्हतो, तेव्हाही बाबांचाच कोल्हापूरहून फोन आला कारण दूरदर्शनला बातम्यांमध्ये ते गेल्याचं सांगितलं गेलं. आजोबांकडे सातत्याने माणूस असे, त्यांची मित्रमंडळी आलेली असायची, विद्यार्थी यायचे, मोठमोठ्याने संस्कॄतमध्ये संभाषण, हास्यविनोद चालायचे. अचंबा वाटायचा. टिमवीत ते फार मोठ्या पदावर आहेत इतकंच त्रोटक माहिती होतं, कारण ना आजोबा कधी त्यांचं मोठेपण जाणवून देत ना आम्ही तितके चौकस होतो.
ते अखंड कामात व्यग्र असायचे. तब्येत उत्तम राखून होते. नीटनेटकं, प्रसन्न व्यक्तिमत्व. कामात असले तरी त्यांच्याशी बेधडक केव्हाही बोलता यायचं, किंबहुना जिन्यात कुणाचीही पावलं वाजली तरी ते दाराकडे बघायचे, जाणा-या येणा-याशी दोन शब्द बोलायचे. पीजी म्हणून रहाणा-या विद्यार्थी विद्यार्थिनींबद्दल ज्येष्ठ नागरीकांचे सहसा काही पूर्वग्रह असतात आणि ते मनाते ठेवूनच त्यांच्याशी बोललं जातं, तशी वागणूक आजोबांकडून आम्हाला कधीच मिळाली नाही. त्याउलट आजींचंच जरा दडपण यायचं.
आजी सुरेख रंगांच्या काठा पदराच्या जरीच्या नऊवारीत, काचेच्या बांगड्या, साधंसं मंगळसूत्र आणि ठळक कुंकवाच्या टिळ्यात अगदी मूर्तीमंत सवाष्ण असायच्या. वर्ण लख्ख गोरा. आजोबांना अगदी शोभेशा होत्या. मुद्रा जरा त्रासिक, कपाळावर कायम आठी आणि बोलणं थोडं तुसडं. त्यामागे तब्येतीच्या तक्रारी, संसारातले कडूगोड अनुभव, आजोबांची व्यवधानं सांभाळणं, अशी अनेक कारणं असू शकतील. घरचा स्वयंपाक, आलंगेलं सगळं स्वत: सांभाळायच्या. आमच्याशी ब-या बोलायच्या, पण एकंदरीत स्वभाव खाष्ट असावा. अर्थात तेव्हा त्यांचं वयही पुष्कळच होतं, आजोबाच नव्वदीकडे झुकलेले होते. लहर असेल तर गप्पा मारायच्या, एखादा पदार्थ वर पाठवायच्या किंवा वाटीत लाडू वगैरे हातावर ठेवायच्या. पण हे नियमित नाही. संसार मात्र समर्थपणे सांभाळला असावा त्यांनी, तो सूर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत जाणवायचा, हे आज आठवताना कळतंय.
आजोबांचं तसं नव्हतं. त्यांचं काम केवढं महत्त्वाचं आणि एकाग्रतेनं करण्याचं होतं, पण कधीही त्याचं त्यांनी अवडंबर माजवलेलं आठवत नाही. ते पहिल्याच मजल्यावर, खरंतर स्टिल्ट मजला होता तो, रहायचे. तीन मजली इमारतीत अखंड वर्दळ, मधे चौक आणि चारी बाजूंनी फ्लॅट्स, पुढे चाळीसारख्या कॉमन गॅल-या अशी रचना असल्यामुळे बायका आपापल्या दारात उभ्या राहून समोर, खाली, वर अशा कशाही कोणत्याही वेळी गप्पा मारायच्या, त्यात आम्हीही आलो. तळमजल्यावरच्या मोठ्या चौकात मुलं खेळत असायची. त्यात आजोबांची गोडुली, चुणचुणीत आणि हुशार आजोबांना शोभणारी नात अमरजाही असायची. एक छोटी इमारत सोडून पलिकडेच अगदी लागून वाहता टिळक रोड आणि टिळक स्मारक चौक. त्यामुळे गाड्यांचे मोठे हॉर्न्स, मिरवणुका वगैरे आत ऐकू यायचं. हे सगळे आवाज सर्व मजल्यांपर्यंत घुमत पोचायचे. पण आजोबांना कधीही त्या दंग्याने कलकल झालीये, त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आलाय असं झालेलं आम्ही होतो तेवढ्या काळात तरी आठवत नाही. कारण ती मुळात वॄत्तीच नव्हती त्यांची. समाधानी, तॄप्त, शांत मनाचे होते. इतके दिवस शेजारी राहूनही त्यांनी त्यांचं मोठेपण, पद जाणवू दिलं नाही, ह्यातच खरंतर सगळं काही आलं. माणसं मोठी कशी होतात, असतात, ते त्यांच्याकडून समजावं. त्यांची मुलगी आमच्या मजल्यावर समोरच रहायची, तीही हुशार आणि कर्तबगार असावी, मात्र तिचाही चेहरा सदोदित दुर्मुखलेला असायचा. नात मात्र आजोबांवर गेली होती. अगदी प्रसन्न. अमरजा आता काय करते ह्याबद्दल उत्सुकता आहे, काही संपर्क नसल्याने कल्पना नाही.
शोभनाताईंशी बोलताना आजोबांचे टिमवीतले अनुभव, त्यांचे इतर पैलूही कळले. आदर द्विगुणित झाला. पण ताईंशी ओळख होईपर्यंत आजोबा गेले होते, नाही तर भेटता आलं असतं पुन्हा. शोभनाताईंनीच आजोबांच्या हुशार, कर्तॄत्ववान मुलावरही एक लेख लिहीला आहे. काशीकरआजोबा आठवले की पुलंनी रेखाटलेलं त्यांच्या आजोबांचं 'ॠग्वेदीं'चं व्यक्तिचित्र आठवतं. बरंच साधर्म्य होतं दोघांमध्ये. त्यांचा जवळून सहवास मिळाला हे आमचं भाग्य. आजोबांना आज सादर अभिवादन आणि आकाशवाणीचे मनापासून आभार.
खरंच! सध्या अनेक ताण आहेत. त्यामध्ये अलिकडेच बेकारीचीही भर पडली आहे. पण कोणतीही फेज कायम रहात नाही, एवढी खूणगाठ मनाशी प्रत्येकाने बांधायलाच हवी. असं म्हणणंही तितकंसं सोपं नाही. डॉक्टरांना नियमित भेटत, औषधं घेत, मित्रमंडळींशी सतत बोलतं राहून, कधी मनसोक्त हुंदडत, कधी पोटभर रडत, तर कधी स्वस्थ बसून आधी अनेक गोष्टी स्वत:शी स्विकारून मगच हे लिहू शकते आहे. मदत देण्यात आहे तसाच आनंद ती घेण्यातही आहे. आपल्याला जाणवत नसलं तरी, आपल्या अस्तित्वाला महत्त्व आहे, आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी, कुटुंबासाठी, जीवलग मित्रमंडळींसाठी. प्रत्येकाला, अगदी लहान मुलांनाही ताण आहेत आता, पण ताणाचे दिवसही जातात. आयुष्य खरंच सुंदर आहे ह्याबद्दल आपणही खात्री ठेवायला हवी आणि आजुबाजुच्यांना, मुलांनाही ती पटवून द्यायला हवी. असा कुणी धीर सोडला की वाईट वाटतं, भले ओळखपाळख नसेना.
Sunday, December 22, 2019
नील: कशाबद्दल चालल्या आहेत ह्या इतक्या दंगली? इतके का चिडलेत लोक?
मी: सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणतंय. आपल्या सर्वांना आपण भारतीयच आहोत हे कदाचित सिद्ध करावं लागेल. त्यामुळे लोकांना वाईट वाटतंय, म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांचा विरोध चालू आहे.
नील: मग करायचं ना सिद्ध, इतका दंगा का करतायत?
मी: बरं. समज, आज आजोबांनी आपल्याला सांगितलं, की कशावरून तुम्ही कोडोलीकर आहात? मला हे सिद्ध करून दाखवा, तर काय करशील?
नील: त्यात काय, मी शांतपणे सांगीन त्यांना, मी नील कोडोलीकर आहे असं.
मी: तू काहीही सांगशील रे, त्यावर ते असाच कसा विश्वास ठेवतील? तुझ्या म्हणण्याला काही पुरावा नको का? तुझा शेरलॉक कसा काम करतो? पुरेसे पुरावे हातात असल्याशिवाय काही बोलतो का?
नील: बरोबर. मी माझी कागदं दाखवीन आजोबांना. मग तर त्यांना मान्य करावंच लागेल मी कोडोलीकर असल्याचं.
मी: बरोबर. पण हे आत्ता बोलतोयस इतक्या शांतपणे खरंच बोलशील त्यांच्याशी?
नील: हो, म्हणजे काय?
मी: बरं. घराच्या पाटीवर तुझं नाव लिहीलं नव्हतं तेव्हा तू जो थयथयाट केला होतास, तो आठवतोय का रे तुला? मीही रहातो ह्या घरात, मग फक्त तुमची दोघांचीच नावं का पाटीवर? हे माझं पण घर आहे, माझे मित्र आल्यावर पाटीवर माझं नाव नाही, त्यांना कसं वाटेल, वगैरे रागावून किती दिवस काय काय बोलत होतास मला. अजूनही कधीतरी कशाचाही राग आला की ओरडत रडत म्हणतोसच की नाही, मी सांगितल्यावर माझं नाव घातलं, आधीपासून नव्हतं घातलं असं.
नील: (ओशाळत हसत) हो मग, मला किती वाईट वाटत होतं तेव्हा.
मी: तसंच लोकांनाही भयंकर वाईट वाटतंय आत्ता. आणि तू किती दिवस थयथयाट करत होतास, तसाच तेही हा वेगवेगळ्या मार्गांनी थयथयाटच करतायत. पण तू आधी म्हणालास तसं हे शांतपणे करता येऊ शकतं. मी चिडून ओरडून सांगितलेल्या गोष्टींपेक्षा गोड बोलून सहज जेव्हा काही तरी सांगते, तेव्हा तू वाद न घालता चुटकीसरशी ऐकतोस, बरोबर आहे का?
नील: होच मग! तू ओरडून बोललीस की तू मालकीण आहेस आणि मी तुझा नोकर असल्यासारखी मला वागवतेयस असं वाटतं, मग मला खूप राग येतो. म्हणून मी ऐकत नाही. एकीकडे म्हणायचं हे घर सगळ्यांचं आहे आणि दुसरीकडे फक्त तू सांगणार तेच होणार घरात, असं का? वा गं, हे बरंय की!
मी: (ओशाळत हसत) हो की रे, माझ्या लक्षातच आली नाही ही गोष्ट. पण बघितलंस का, आत्ता आपल्या देशातही हेच सगळं घडतंय. त्यामुळे खूप नुकसान होतंय.
नीलला ह्यावर काही बोलता आलं नाही. ते अपेक्षितही नाही. हे सगळं जसं बोललं गेलं तसंच्या तसं लिहीलंय. काल सकाळी सव्वा सातला शाळेत जाताना तो पायात मोजे आणि बूट चढवत एकीकडे आकाशवाणीच्या ठळक बातम्या कानावर पडत असताना जिन्यात बसून झालेला निव्वळ दोन ते तीन मिनिटांचा हा ताजा संवाद. रोज वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरही हिंसाचाराच्या बातम्या तो वाचतोच आहे, पण त्यांचं गांभीर्य झिरपण्याइतकं अजून त्याचं वय नाही. ते समजावण्याइतका माझाही आवाका नाही. पण राहून राहून ९२ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या बातम्या वाचताना उडालेला माझा गोंधळ आठवतो. तरी मी बारावीत होते, म्हणजे काही लहान नव्हे. त्यामानाने ह्या मुलांना बरंच समजतंय. ते नीट मार्गाने पोचवण्याची जबाबदारी मात्र न पेलवणारी वाटते.
उघड स्वगत:
लहानपणी शाळेत जाताना येताना दोन्ही वेळेस गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेणारे आम्ही सगळे, जेव्हापासून देवळात सरसकट आमच्यासाठीही चौक्या पहारे बसले, नियम लागू झाले, तेव्हापासून एकाएकी उपरंच वाटायला लागलं. पण त्याला काही इलाज आहे का? पूर्वी लोकांकडे स्वतःची वाहनं इतकी नव्हती, सुट्ट्या वगळता सगळीकडचीच गर्दी आटोक्यात असे. आता सगळं सामाजिक चित्रच बदललं, जे होतंय ते सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अपरिहार्य आहे. पण हे बुद्धीला कितीही पटत असलं तरी अंबाबाईच्या देवळात गेल्यावर मनानं पचवताना जडच जातं. ह्या क्षुल्लक बाबीची ही कथा, तिथे भारतीयत्वाबद्दल काय बोलावं! ह्यानिमित्ताने फाळणीच्या वेळी सीमाभागातील लोकांची काय मनःस्थिती असेल ह्याची मात्र एक बारीकशी चुणूक जाणवून जातेय. किरण देसाईंची The Inheritance of Loss आणि अमिताभ घोषांची The Shadow Lines अभ्यासाला होत्या, त्या वाचतानाही असेच अनेक उलटेसुलटे, कधी विषण्ण तर कधी निरुत्तर करणारे प्रश्न पडलेले आठवतात. आणि अशा कादंब-या अभ्यासाला का, ही तेव्हा आकलन न झालेली बाब आज लक्षात येतेय, पटतेय!
Thursday, December 5, 2019
Saturday, November 16, 2019
ड्रायव्हरकाकांचा प्रवाशांना घेऊन एसटीचा प्रवास सुरु आहे. अकलुजच्या घोडेबाजारात अचानक मिळालेली धुळीत लोळलेली एसटी बसची खरीखुरी पाटी ही ह्या दिवाळीतली सर्वात मोठी गंमत आहे. पाटीवरच्या 'अकलुज इंदापूर पुणे' आणि 'पुणे इंदापूर अकलुज' ह्या दोन्ही बाजू व्यवस्थित शाबूत आहेत. अनेक दिवस जमवत आणलेली खरीखुरी तिकीटेसुद्धा आहेत. ड्रायव्हर काकांनी आधीच कधी तरी स्वतःच रेखाटलेला एसटीचा लोगोही त्यानिमित्ताने शोधून बाहेर काढला गेला. वाहक मागे तिकिटे देत आहे.
चला, बसा, निघू या! टीण टीण!!
Tuesday, November 12, 2019
असंही पर्यटन
एरवी वेळेची फार टंचाई असते असं नाही, पण ठरवलेल्या वेळापत्रकातली मधलीअधली कामं रद्द झाली किंवा लवकर संपली, तर तो मिळालेला वेळ लॉटरीसारखा वाटतो. घरी असाल तर लोळायला, बाहेर असाल तर निर्हेतुक भटकायला निमित्त. पुण्यात तर ही दुग्धशर्करा पर्वणी. त्यामुळे शुक्रवारी ही पर्वणी ऐन उन्हाची वेळ असूनही साधली. अचानक दीडेक तासाचा वेळ हाताशी आयता सापडला. जेमतेम तीनेक किमीच अंतर, पण रमतगमत, रद्दीच्या दुकानात रेंंगाळत, बुचाचं आजवर लपून राहिलेलं झाड शोधून फुलं वेचत, रोजच्या जाययायच्या वाटांवर वर्षभरात झालेले बदल टिपत, नव्यानं उगम पावलेल्या कशाकशांचे फोटो काढत सुशेगाद फिरत सत्कारणी लावलं.
बादशाहीतला नाश्ता ते नुतनीकरणासाठी बंद असल्यामुळे हुकला. मग कल्पना गाठलं. तिथून ठरवून वाट वाकडी करून खूप दिवसांनी 'कलाश्री'ला बाहेरून नमस्कार पावता केला. बरं वाटलं. सेनादत्त पेठेतच आतल्या शांत गल्लीत सुवासानं हाका मारणारं बुचाचं झाड दिसलं. तो एक खजिना गोळा केला. पुढच्या कोप-यावरच्या रद्दीच्या दुकानात जुन्या मुखपृष्ठाचं पडघवली मिळालं. माझ्याकडे आधीच आहे, पण हेही होईल कुणाला वाचायला द्यायला म्हणून उचललं. सत्संग सोसायटीच्या अलिकडे दोन चकचकीत नवे बंगले झालेले दिसताहेत. छान आहेत. अभिनव सोसायटीच्या दोन रोहाऊसेसना नवी नावं दिसली. वैकुंठातल्या आतल्या रस्त्यानं एस एम जोशी पुलावर निघायचं होतं खरंतर. अद्याप एकदाही वैकुंठच्या कमानीतून आत गेलेले नाही मी. पण कुणाची तरी महायात्रा नुकतीच पोहोचत होती, म्हणून वळसा घेऊन निवा-याकडून पुलावर आले. तर तिकडे सुबक ठळक चित्ररुप पुणे दर्शन घडलं. सगळी चित्रे चांगली काढली आहेत. अजून पाहिली नसतील तर जाऊन पाहून या एकदा मुद्दाम. कर्वे रस्त्यावर मेट्रोचं काम कुठवर आलं ते पाहिलं, वेगात आहे प्रगती. अर्थात, आता त्या गर्दीचा भाग नसताना फक्त अलिप्तपणेच असं म्हणणं सोपंय. तसंच पुढे सरकत प्रभात आणि भांडारकर रस्तेही पालथे घालायचे होते, पण सूर्य मी म्हणायला लागल्यावर इथवर पोचून भटकंती आटोपती घ्यावी लागली. मात्र एवढ्यानंही ऑक्सिजन टँक्स रिफील केल्यासारखी तरतरी आली एकदम.
हे असं शंख करत भटकणं पूर्वीही अनेकदा केलंय. केव्हाही कधीही वाटलं की उठायचं आणि सुटायचं. काही ठरवायचं नाही. भारी मजा येते. अशा पद्धतीनं पुण्याच्या हवेतच घाईगडबड भरलेली आहे, वगैरे प्रवादांना झकासपैकी खोटं ठरवता येतं. पुणंच असं नाही, कोणत्याही गावात, शहरात, खरंतर. तर अनपेक्षितपणे असा एखाददुसरा तास हातात मोकळा सापडतो आणि त्याचा सदुपयोग करण्याची बुद्धी सुचते, तेव्हा स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटते.
Monday, November 4, 2019
दोन मालिका बघणं चालू आहे सध्या. कलर्स मराठीवर स्वामिनी आणि युट्युबवर प्रपंच. प्रपंच लेकालाही प्रचंड आवडतेय. त्यामुळे पूर्वी घेतलेला आनंद द्विगुणित होतोय. खरोखर एव्हरग्रीन मालिका.
स्वामिनीतल्या ब-याच बाबी आवडतायत. ब-याच खटकतायतही. पण १००% बिनचूक असणार नाही, ही तयारी ठेवूनच बघायला घेतलीये. पात्रयोजनेसाठी उत्तम गुण द्यावे लागतील. पेशवाईत मुळातच भरपूर घडामोडी असूनही टिपीकल मालिकी राजकारण इथेही आणलंच आहे. पण अरुणा जोगळेकरांच्या चांगल्या संवादांमुळे सुसह्य होतंय.
आज नानासाहेब आणि सदाशिवरावांमध्ये झालेला छोटासा संवाद अर्थपूर्ण होता. पेशव्यांचा आवाका आणि भाऊंची तत्वनिष्ठता अधोरेखित करणारा. वेगवेगळ्या पुस्तकांमधून नानासाहेब पेशव्यांचं जे व्यक्तीचित्र उमटलंय, त्यापेक्षा ही व्यक्तीरेखा उजवी होतेय. गोपिकाबाई मात्र शक्य होईल तितक्या गडद दाखवतायत. हेमासपशेलवैम.
बादवे, पेशवाईत (खरोखरचे) चमचे महाराष्ट्रात पोचले होते का?
Thursday, October 31, 2019
निव्वळ सुमधुर. गत ऐकताना क्रमाने शिगेला पोहोचणारा आनंद अवर्णनीय आहे.
परफॉर्मन्सपूर्वीचं पं. रविशंकरांचं श्रोत्यांना आवाहन आणि जॉर्ज हरिसनांनी कलाकारांचा दिलेला जितक्यास तितका परिचयही ऐकण्याजोगा आहे. उगीच अनावश्यक शब्दांचा पसारा नाही. बांग्लादेशसंबंधित चित्रफिती मात्र अंगावर येणाऱ्या आहेत.
काल अनुष्का शंकरचीही एक सुरेख क्लिप ऐकण्यात आली. पंडितजींची नोडू सतार कायमची ब्रिटिश म्युझियममध्ये संग्रहासाठी देण्यापूर्वी भावूक होऊन तिनं वडिलांच्या सतारीवर थोडा हात फिरवून घेतला, ती क्लिप. इतके अवघड वारसे यशस्वीरीत्या पुढे चालवणा-या मुलांचं अतोनात कौतुक वाटतं.
Pandit Ravi Shankar and Ustad Ali Akbar Khan Duet Performance
Tabla- Ustad Alla Rakhha Khan
Tanpura- Kamala Chakravart
Tuesday, October 29, 2019
आर्य बणिक मंत्रमुग्ध करतो. आजपर्यंत फक्त त्याच्या रियाजाच्या क्लिप्स पाहिल्या होत्या, जाहीर परफॉर्मन्स आजच ऐकला.
भीमण्णांचे काही न कळलेले उच्चार ह्या बछड्यामुळे कळले 
उगीचच काहीतरी जाता जाता - तो जो हार्मोनियमवर साथीला बसलेला कलाकार आहे, तो उत्तम संगत करतोय, पण त्याच्याकडून आर्यच्या एकाही जागेला रेषभरही दाद आली नाही, ह्याची गंमत वाटली.
https://youtu.be/4ueG9E4Hf9Q
The divine #raag_bhairavi
By the little ustad master #aryaa_Banik
Sunday, October 20, 2019
Saturday, October 19, 2019
Friday, October 18, 2019
नक्की महिना वगैरे आठवत नाही, पण २००१ की २००२ सालातली केव्हातरीची गोष्ट आहे. नुकतीच कधीतरी मायबोलीची सदस्य झाले होते. तेव्हा नेटवरचं सगळं गप्पांचं जग, मित्रमंडळी नवी नवी होती. मायबोली हा निव्वळ नेटवरचं उपलब्ध मराठी साहित्य शोधण्याच्या नादात केलेल्या खोदकामातला तेव्हा मौल्यवान असणारा खजिना सापडला होता. तिथे सदस्यांपैकी कुणीही ओळखीचे नव्हते, किंबहुना बरेचसे लिहितेबोलते सदस्य भारताबाहेरचे दिसत होते. मी ऐन पुण्यात रहात असल्यामुळे काही मराठीला पारखी नव्हते. नेटबद्दलही फार वेड नव्हतं. पण मला ऑफिसमध्ये बराच वेळ मोकळा असायचा. अडीच हजार स्क्वे फुटांच्या जागेत आम्ही एकूण पाच माणसं काम करायचो. कुणाचंही प्रोफाइल एकमेकांशी संबंधित नव्हतं. आम्ही पाचही जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होतो. चहा, जेवण, अधेमधे प्रासंगिक सेलिब्रेशन्स, खाली तळमजल्यावर कलानिकेतनच्या शोरूममध्ये उगीचच रेंगाळत निवांत टाईमपास (तिथे पहिल्यांदाच इतक्या अल्टिमेट साड्या आणि किंमतीही तितक्याच अल्टिमेट पाहिल्या), मुंबईच्या हेड ऑफिसला एकत्रित भेटी आणि स्वतःचं काम, एवढ्या सगळ्यातूनही उरलेल्या भरपूर वेळात तेव्हा मोबाईल्स फोफावले नसल्याने चक्क पुस्तक वाचन आणि नेटसर्फिंग जोरात चालायचं. त्यामुळे मायबोली सापडल्यावर मी लवकरच तिथली पडीक सदस्य होणं क्रमप्राप्त होतं. तेव्हाची माबो, तिथले सदस्य आणि तिथलं लेखन, गप्पा, दंगा, सगळंच बहारदार होतं. त्यातून मुंबईपुण्यातल्या, कोल्हापूरच्या काही मंडळींचीही गाठ पडली, ओळखी झाल्या, बोलणं चालणं सुरु झालं आणि एकंदरीतच मजा वाढला. मायबोलीनं आयुष्य कायमचं श्रीमंत करून टाकलेले मित्रमैत्रिणी दिले. हे क्लिशेड वाक्य वाटेल, पण तीच आनंदाची वस्तुस्थिती आहे. नंतर अनेक संस्थळांवर उनाडक्या सुरू झाल्या, पण माबोच जिव्हाळ्याचा भाग राहिला.
तर त्या सुरुवातीच्या काही महिन्यांत एका दुपारी - बहुतेक रविवारी - घरचा लँडलाईन वाजला. मी उचलल्यावर पलिकडून आत्मविश्वास भरलेल्या आवाजात, "सई, अंबर बोलतोय" हे कानावर पडलं. आपण पहिल्यांदाच बोलतोय, समोरच्याला आवडेल न आवडेल अशा शंकेचा मागमूसही नव्हता त्याच्या आवाजात. कारण तेव्हा नेटवरची मैत्री ही काही सर्रास बाब नव्हती. सुदैवाने मीही खुल्या वातावरणात वाढले असल्याने मलाही त्याच्याशी बोलताना छान वाटलं. मग बरीच माहिती, घरचे पत्ते वगैरे देवाणघेवाण झाली, खूप मनमोकळ्या गप्पाही झाल्या. अंबर तेव्हा गणेशमळ्यात रहायला होता आणि त्याच्या बाबांबरोबर माणिकबागेतल्या कारखान्यात यायचा. थोडक्यात सिंहगड रोडचा आदिम रहिवासी
मी तेव्हा अस्तित्वातही नसलेल्या आत्ताच्या सनसिटी रोडला. त्यामुळे नेटवर एकदम शेजारी भेटल्यासारखंच होतं. मग नियमित भेटीगाठी सुरू झाल्या, माझ्या नव-याचंही अंबरशी चांगलं सूत जुळलं आणि अंबरशी दाट मैत्री झाली.
हा एक निरंतर उद्योगी, चुकूनही स्वस्थ म्हणून न बसणारा प्राणी आहे. त्याच्या डोक्यात सतत काही तरी शिजत असतं. मग ते शिजणारं प्रकरण प्रत्यक्षात उतरवण्याचे बेत तयार होत असतात. त्यासाठी आजवर गोळा केलेले सर्व अनुभव तो वापरतो. आडाखे बांधतो. काही बिनचूक ठरतात, काही चुकतात. पण हा प्राणी थांबत म्हणून नाही. तोवर हा पुढे चालू पडलेला असतो. आणि ती वाट तिस-याच कशाची तरी असते. मी मुद्दामच त्याच्या खवय्येगिरीबद्दल जास्त बोलत नाहीये, कारण अंबर म्हणजे पट्टीचा खवय्या एवढीच त्याची मर्यादित ओळख असावी, हे मला पटत नाही. तो एक धडपड्या आणि असंतुष्ट व्यावसायिक आहे. कितीही उपद्व्याप केले तरी तो समाधानी नसतो. हे असमाधान माणसाला जिवंत ठेवतं. तो सकस वाचक आहे, उत्तम कानसेन आहे, त्याचा गळाही तसा बरा आहे. तो उत्तम लिहीतो. त्याचा फूड ब्लॉग यशस्वी होण्यात तो समोर आणत असलेली कानाकोपऱ्यात लपलेली अस्सल खाद्यस्थळं आणि त्याची वर्णनाची शैली ह्या दोन्हीचा वाटा आहे. त्याचप्रमाणे तो मिनी शरद पवार आहे. पुण्यातले क्वचितच काही लोक त्याला माहिती नसतील. त्यानं धुंडाळले नाहीत असे कमी व्यवसाय उरले असतील आता. शिवाय मधुरा आणि त्याची केमिस्ट्री पहाता तो एक चांगला नवराही असावा असं म्हणायला नक्की वाव आहे.
तो काहीही नवं खूळ (कौतुकानं रे!) काढो, मधुरा तिथे जातीनं पदर खोचून उभी असलेली दिसणारच. अंबरचा एकंदरीत बाज बघता तो त्याच्या चिरंजीवांवरही बाबागिरी करत असेलसं वाटत तरी नाही, ते खातं मधुराकडेच असावं. आणि मित्र म्हणून तर तो जातीवंत आहेच. कधीही अचानक त्याचा फोन येतो. सहज बोलायला. गप्पा मारायला. केव्हाही आपण फोन केला तरी सुरुवात "बोल की सई" अशी हमखास बोलायला (वेळ आहे की नाही ते आपल्याला माहिती नसलं तरी) तयार असल्याची खात्री पटवणारी असते. "अंबर, उत्तम पावभाजी माझ्या घराजवळ कुठे मिळेल", ह्या असल्या फोनलाही तो प्रामाणिकपणे तत्पर उत्तर देतो. मी त्याच्या जागी असते तर नखरे, आढ्यता, सात्विक संताप, शिष्टपणा हे सगळं संमिश्र विचारणा-याच्या टाळक्यावर आदळलं असतं. पण अंबर मात्र उत्साहाने माहिती देतो. त्याच्यामुळे मला माझ्या परिसराची नवी खाद्य ओळख झाली. त्यामुळे पुण्याबाहेरच्या मित्रमंडळींना कुठे कुठे काय काय खिलवून त्यांच्याकडून आयजीच्या जीवावर बायजी उदार ह्या न्यायाने आयते दुवेही कित्येकदा घेऊन झाले.
माबोच्या त्या उमलत्या काळात पुण्या किंवा भारताबाहेरून येणाऱ्या सदस्यांसाठी पुण्यात एक बिनघोषित/स्वघोषित स्वागत समिती तयार झाली होती. येणा-या/रीची चर्चा माबोवर व्हायचीच. अंबर त्या समितीचा बिनविरोध अध्यक्ष होता. मग त्याच्या बेताप्रमाणे आम्ही तेव्हा पोरंबाळं नसलेले सडे लोक सारखी गटग ठरवायचो आणि टोळी करून पाहुण्यांना भेटायला जायचो. माबोच्या सहलीसुद्धा ठरवायचा अंबर. आणि इतक्या प्रकारच्या लोकांना नेऊन आणून ते यशस्वी करायचा. मजेचे दिवस होते ते. अगदी खुद्द अंबरचं लग्नही एक माबो गटगच होतं आणि खुद्द अंबरच यजमान असल्याने आम्हा उपस्थितांना उत्कृष्ट खाद्यास्वाद मिळण्याची पुरेपूर काळजी त्याने जातीने घेतली होती.
यथावकाश आम्ही सगळेच सांसारिक व्याप, नोकरीधंदे आणि मुलंबाळंवाले झाल्यावर आणि पर्यायाने माबोवरचा वावरही आटल्यामुळे नियमित भेटीगाठी कमी होत गेल्या. त्यातले कित्येक मित्र वाटा बदलून गेले, काही हरवले, काही आणखी घट्ट जवळ आले. अंबरशी संपर्क आणि बोलणंभेटणं मात्र आजतागायत विनाखंड चालू आहे आणि त्या भेटण्याबोलण्यात तोच प्रथमपासूनचा ताजेपणाही कायम शिल्लक आहे. त्याचे नवनवे उपक्रम तो न विसरता कळवतो आणि मी (फूडी नसूनही) सवड काढून त्या उपक्रमांना प्रतिसाद देण्याचा यथोचित प्रयत्न करते. हे अगदी आताच्या फक्कडच्या उपाहारगृहापर्यंत नेमानं चालत आलेलं आहे. त्याच्याकडून एखाद्या ठिकाणची विशेष शिफारस आली की तिकडे जाणं होतं. तो स्वतःही अचानक कुठे तरी भेटतो. गप्पा मारतानाही आपण सांगतोय ते समोरच्याला पसंत पडेल अथवा नाही, ही फिकीर न करता तो त्याला योग्य वाटणारे मुद्दे मांडतो. तसा तो फटकळ आणि व्यावहारिक आहे. हा चवीला इतका चोखंदळ माणूस माझ्या हातचं कधीतरी किरकोळ काहीतरी चाखल्यावर चक्क दाद देऊन गेला, तेव्हा माझ्या स्वैपाकघरातल्या पराकोटीच्या नावडीला आणि उरकाउरकीला गांभीर्यानं घ्यावं असं वाटून गेलं होतं. पण एकंदरीत खाणं हाच विषय मी फारसा मनावर घेत नसल्याने मित्र मंडळ बचावले, असं म्हणता येईल. अलिकडे नीलला त्याची गलमिशी फारच आवडली होती, ती आता त्याने काढून टाकलेली दिसतेय.
अंबरला बरीच वर्षं ओळखताना मला दिसलेला माणूस असा आहे. स्वागतशील, प्रयोगशील, लोकसंग्राहक वगैरे. वैगुण्यही काही असेल, पण माझ्या अनुभवाला अजून तरी आलेलं नाही. नाही तर त्याचाही स्पष्ट उल्लेख नक्की केला असता, कारण माणूस कधीच नुसता साखरेचा पाक असू शकत नाही. थोडं तिखट, थोडं कडवट, तुरट, खारट, आंबट ह्या सर्व चवी हव्यात माणसात. तर तो माणूस. तर अंबरला त्याच्या नवनव्या धडपडींमध्ये उदंड यश लाभो आणि उत्तरोत्तर अशाच प्रगतीच्या पाय-या तो चढत राहो, ही त्याला मनःपूर्वक शुभेच्छा 

Tuesday, October 8, 2019
Saturday, September 28, 2019
तालवाद्य नाहीच ह्यात. ऐकताना तो दिवा जणू कानातही तेवत रहातो. परिपूर्ण शांतरस आहे. साधना त्या वातावरणाला साजेशी वावरते. सांजवाती उजळवतानाचं गांभीर्य, पण दिलासादायक, आशादायक, असा काहीतरी विशिष्ट भाव स्वरांमधून तंतोतंत आपल्यापर्यंत पोचतो. त्यात अंधाराशी संघर्ष, झगडा नाही, अलगद त्याचा हात सोडून प्रकाशाचा हात पकडणं आहे. सलिल चौधुरी+लता हे कमालीचं अद्भुत रसायन आहे.
मेरे मन के दिए - परख
Thursday, September 5, 2019
सकाळी सातच्या बातम्यात किरण नगरकर गेल्याचं कळल्यावर पाठोपाठ अविनाशची आठवण आपसुकच येणार होती, Avinash Chavan. ही नगरकरांच्या स्वाक्षरीसह असलेली 'सात सक्कं'ची खास प्रत तर जणू मौल्यवान चीज होती त्याच्या खजिन्यातली. नगरकरांची माझी ओळख त्याच्यामुळेच. त्या ओळखीमुळे माझं वाचन वरच्या इयत्तेत गेलं. सो मेनी थँक्स!
Subscribe to:
Comments (Atom)