म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, August 9, 2024

 कसं लाख मोलाचं बोलतोय!

अशी पिढी तयार करणं ही आपली जबाबदारी आहे.
सध्या गाळ साचून आटत चाललेल्या विहिरी उपसून खाली दबल्या गेलेल्या सामंजस्य, सांभाळून घेणं, दुसऱ्याच्या मतांबद्दल आदर या मूलभूत गोष्टींच्या तुरट्या पुन्हा पुन्हा फिरवत पाणी निवळशंख करून वापरायला काढणं अत्यावश्यक आहे.
https://www.facebook.com/reel/1795367257677279

 केभोना.

भीषण. भडका उडालेल्या ज्वाळा बघून पोटात तुटलं.
कोल्हापूरकर आणि कलाप्रेमी म्हणून दु:ख झालं.
सर्वार्थानं वैभवशाली ऐतिहासिक इमारतीचं अतोनात नुकसान झालंय.
आयुष्यात पहिल्यांदा रंगमंचावर, पूर्ण लांबीच्या संगीत नाटकात, तेही लीड रोलमध्ये आणि नाट्यपदांसह, 'केभोना'त उभं राहायला मिळालं ही भाग्याची गोष्ट. हा बंध वैयक्तिक आहे. अशा वाईट घटना घडल्यावर त्या आठवणी आणखी मोलाच्या होऊन बसतात.
नाट्यगृहाचे सगळे फोटो इंटरनेटवरून साभार.











Thursday, August 8, 2024

 उलटे लटकणारे सख्खे शेजारी

दारातच मोठा उंबर आहे. दारात म्हणजे, वाढलेला पसारा तिसऱ्या मजल्यावर दहा फुटांवर आहे. हाच उंबर बघून चोवीस वर्षांपूर्वी पहिल्या स्लॅबच्या टप्प्यावर घर बुक केलं होतं. उंबर आहे म्हणजे जमिनीत पाणी असणार या होऱ्यानं. तेव्हा पिटुकला होता, आता आसमंतात पसरलाय.
तर, यावर दहा वीस वटवाघळं कायमस्वरूपी मुक्कामी असतात. उंबर लगडलेलं असतं त्यामुळं अन्न मुबलक. किड्यांना कमतरता नाही. आणि घरच थाटलंय म्हणजे दिवसा झोप काढणं आणि रात्री जागत बसणं आणि एकमेकांशी यथेच्छ गप्पा मारणं आलंच. नाही तर जागत राहून दुसरं काम काय!
साधारणपणे पुरा काळोख झाला, की किचकिचाटाची गप्पाष्टकं चालू होतात. एवढा कोलाहल, की 'अरे, गपा' म्हणून खरोखरच दम भरावा लागतो कधी कधी. कारण खालून वाहणारा हमरस्ता आवाजाच्या चढाओढीत मागं पडतो. पण दिवसभर मात्र चिडीचूप. खाली डोकं वर पाय, या फांदीवरून त्या फांदीवर, आई बाबा पोरं पोरी सगळे उनाडत असतात, पण डोळे मात्र टक्क उघडे. की ते आमच्या हालचाली बघून उघडतात तेच जाणे. मी एरवी तशी भित्री भागुबाई आहे. 'बार्डोवी'वरच्या एका लेखात कुणीतरी काल केलेला 'हा खेळ सावल्यांचा' मधल्या नरसूचा आणि पार्श्वभूमीवर वाजवलेल्या आशाच्या आवाजाचा नुसता उल्लेख वाचूनही मला हुडहुडी भरलेली. सिनेमा बघून कैक वर्षं झाली तरी. पण या शेजाऱ्यांची कशी कोण जाणे भिती वाटत नाही. तीच बिचारी मला घाबरत असणार खात्रीनं. हा जरासा अतीपरिचयात अवज्ञेचाही प्रकार असेल.
अलीकडे एकदा दुपारी वाळलेले कपडे घ्यायला नील गच्चीत गेला आणि जाम दचकला. समोरच्या फांदीवरचे एक बाबा स्थिर नजरेनं त्याच्याकडंच बघत होते. मला हाक मारून दाखवलं तर जणू काही झापडं बंदच होत नसल्यासारखी आमच्याकडे टक लावली होती बाबांनी. दोन्ही हातांनी फांदी धरलेली आणि उलट्या डोक्याच्या डोळ्यांनी स्तब्ध नजरेनं आम्हाला बघणारं ध्यान आपण बेसावध असताना बघितल्यावर भीतीदायकच.
आत्ता हे लिहितानाही बाहेर किचकिच आणि विशिष्ट गुरगुर चालू आहे. उजाडलंय ना त्यांना!



Friday, August 2, 2024

 तू टाळलंस तरी ऐकू येतंय अरे सद्गृहस्था.

एक किताबों पे खर्च करने में तुमको... (मौत आ जाती है!) पुढे सावरून घेतलंस.
हो की नाही?😄
पण असंच काही नसतं.
पुस्तकं खरेदी करून वाचायला हवीतच, ते अधिक चांगलं आहेच. पण पुस्तक वाचायला मागण्याची अनेक कारणं असू शकतात, त्याबद्दल एवढं जजमेंटल होण्याची आवश्यकता नाही.
जागेची अडचण, पैशांची अडचण, वाचनाची आवड नाही पण एखादं पुस्तक वाचावंसं वाटू शकतं, खूप पुस्तकं घेत असते पण एखादं संग्राह्य वाटत नाही मग निदान एकदा वाचून तरी होईल, एखाद्याला वाचायला सुरुवात करायची असेल आणि तो तुमच्याकडून आयुष्यात पहिल्यांदा वाचायला पुस्तक नेणार असेल आणि तुम्ही काही तरी चांगलं सुचवण्याची त्याला अपेक्षा असेल, समोरची अगदी भरभरून बोलत असते आणि ते पुस्तक अनायासे तिच्या जवळ असतं म्हणून मागितलं, असं कितीतरी निघेल.
अत्तरं, कपडे वगैरे आताच्या पांढरपेशा समाजात जरा बऱ्या वावरासाठी जवळपास गरज होऊन बसली आहे. पैसे कमी असले तरी आता त्यावर काही प्रमाणात तरी खर्च करणं भाग असतं. पुस्तक ही काही जीवनावश्यक बाब नाही. पण कपडे आणि दर्शनी व्यक्तीमत्व तरी नीटनेटकं असल्याशिवाय आपण ना नोकरी व्यवसाय मिळवू शकू ना तो देऊ शकू. दिवसभराच्या घामट धावपळीत अत्तरं, परफ्युम्स वातावरण जरा सुसह्य करतात. घामेजलेला, कसेतरी कपडे चढवलेला अवतार करून चालायचं नाही. कितीही नाकारलं आणि तत्वज्ञान झाडलं तरी पुस्तक हे कव्हरवरून जोखलं जाणारच, जातंच. प्रकाशक काय वेळ जात नाही म्हणून मुखपृष्ठावर वेगळा वेळ खर्च करतात का! रॅकवर चटकन लक्ष वेधून घेईल आणि उचलून उघडायचा मोह होईल, हाच तर पहिला कटाक्ष असतो. तीच बाब माणसांना लागू.
पुस्तकं न वाचणाऱ्या लोकांना कमी लेखूच नये मुळात. पुस्तकं न वाचणारे करतात त्या हजार गोष्टी पुस्तकात डोकं खुपसून बसलेल्यांना येत नसतात. शिवाय तुम्हाला पुस्तकांची आवड, तशी त्यांना अत्तरं, कपडे, हॉटेलिंगची. ताशेरे कशाला झाडायचे? मागितलं तर नका देऊ, वाटल्यास फणकारून देत नाही म्हणा, बाकी कशाला बोलावं!
स्वत:च्या संग्रहाचं कौतुक असावंच. का नसावं, वर्षानुवर्षे केलेली मेहनत असते, पायपीट असते, चिकाटी असते, खिशाला चाट लावून संग्रह उभे केलेले असतात. पण चॉकलेट गोळ्यांच्या पारदर्शक बरण्या मांडून ठेवायच्या आणि गोळी पाहिजे म्हटलं की तुम्ही नावं ठेवणार. असं कुठं असतं होय?
पुस्तक मागितलं तर उलट चांगली गोष्ट आहे की. त्या मागणाऱ्यासाठी आणखी एक आनंदाचं दार उघडून देताय तुम्ही. बिनधास्त मागावं वाचायला, काही लाज वाटण्याचं कारण नाही. जबाबदारीनं परत करणं महत्त्वाचं, पण ते उसन्या घेतलेल्या कोणत्याही वस्तूला, पैशाला लागू आहे, नुसत्या पुस्तकालाच नव्हे. मी पुस्तकं मागते, वाचते, व्यवस्थित वेळेवर सुस्थितीत परत करते. माझीही इतरांना देते, कितींदा शिफ्टिंग केलं तेव्हा शेकडो वाटून टाकली. कित्येक हरवली, कित्येकांनी नेतो म्हणून परत आणून दिली नाहीत, कितीतरी जणांनी वाईट अवस्थेत परत केली. एकदा तर एकांनी 'तांबडफुटी'चं मुखपृष्ठच टरकावून वर वर्तमानपत्र गुंडाळून न सांगता परत केलं होतं. ते आहेत इथं मित्र यादीत. हे वाईटच आहे, पण सगळेच असं करत नाहीत हेही खरं आहे. उडदामाजी काळे गोरे असायचेच. आणि त्यांनी असं केलं म्हणून त्यांच्या बाकी गोष्टींवर फुली मारावी, असंही गरजेचं नाही. काही वेळा अपघातानं, अनवधानानंही नुकसान होतं. चालायचंच.
माणसांना जोखणं नो नो!
काही म्हणा, पुस्तकांचा संग्रह करणाऱ्यांना जसा आदर मिळतो समाजात, तेवढा ते स्वतः मात्र बाकी जगाला फार कमी वेळा देताना दिसतात. खरंतर ते वाचनामुळे प्रगल्भ दृष्टीकोनाचे असणं अपेक्षित असतं आणि बाकी जगही तसं मानत असतं. असं असताना बरा वाटत नाही असा कद्रूपणा.
https://www.facebook.com/reel/3704006099864191