उष्टंशेण
तुमच्याकडे असायचं का?
माझी आई स्वच्छतेच्या बाबतीत फार काटेकोर होती. आमच्या घरी फरशी केव्हा घातली ते पक्कं आठवत नाही. पण जमीन होती तोपर्यंतचं रुटीन छान आठवतंय. शेजारपाजारी सगळ्यांकडेच तसं असायचं म्हणून ते चित्र डोक्यात घट्ट बसलंय. आम्ही ऐन शहरात राहत होतो तरी भोवती तसे चिक्कार गोठे होते. त्यामुळे शेणाचा तितका तुटवडा नव्हता. जवळपासच्या गोठ्यांमधून रितसर घमेल्यातून शेण आणून जमीन सारवणे किंवा अगदी शाळेत जाताना घरापाशीच कुठं रस्त्यात शेणाचा ताजा पो पडलेला दिसला तर लगेच तो जमेल तसा दोन्ही हातांनी उचलून घरी आणणे आणि हात धुऊन पुन्हा शाळेचा रस्ता धरणे हे सर्रास केलेलं आहे. मीच असं नाही, माझ्या वर्गातल्या पुष्कळ मुली हे करायच्या. शेणाचा, गोमूत्राचा, कडब्याचा किंवा एकंदरच गोठ्याचा गंध मला आवडतो, त्यामुळे घाण वाटण्याचा प्रश्न आला नाही. असता तरी आईनं खपवून घेतला असता का तीच जाणे. ती स्वतः कामात आकंठ बुडालेली असल्यामुळे आमची मदत घेणं भागच असायचं तिला.
महिन्यातून किंवा तीन आठवड्यातून एकदा जमीन सारवावी लागायची. वेगळी सवड काढलेली असायची त्यासाठी. मग शेणाची पाटी आणि पाण्याची छोटी बादली आपल्या शेजारी ठेवायचे. खोलीत जमिनीवर असलेल्या उचलून ठेवता येणाऱ्या वस्तू वर कुठेतरी ठेवून जमीन शक्य तितकी रिकामी करून घ्यायची. सारवणात लोळणार नाही अशा बेतानं आधी आपला फ्रॉक सगळ्या बाजूंनी सावरून तो घोळ पुढे पोटाशी एकत्र गोळा करून घ्यायचा. केस डोळ्यावर येणार नाहीत असे नीट बांधायचे. लांब बाह्यांचा फ्रॉक तर मुद्दलात घालायचाच नाही आणि जरा मोठ्या बाह्या असतील तर त्या कोपराच्या वरपर्यंत दुमडायच्या. मग उकीडवं बसायचं. (आता तेवढा वेळ सलग तसं बसण्याचा नुसता विचार सुद्धा करू शकत नाही मी!) खोलीच्या एका कोणत्या तरी कोपऱ्यातून सुरुवात करायची आणि क्रमाक्रमानं मागं मागं येत विरुद्ध कोपऱ्यात सारवण आणून टेकवायचं. शक्यतो बाहेर जायच्या दरवाजाकडेच. नाही तर चवडे जेमतेम टेकतील असं चालत ओल्या निसरड्या जमिनीवरून तोल सावरत सर्कस करत बाहेर पडायला लागणार आणि सारवणाची नक्षी बिघडणार ते निराळंच.
एकावेळी थोडंच शेण जमिनीवर घेत, त्यात लागेल तितकंच पाणी डाव्या हातानं घेत (म्हणजे तेवढीच बादली पाणी पुरतं आणि ते शेवटपर्यंत स्वच्छ राहतं) हळूहळू मिसळत शेणाच्या गोळ्याची सेमी लिक्विड कंसिस्टंसी करून एकाच हातानं (हो, दोन्ही हात बरबटवायचे नाहीत. भाकरी करतानाही हाच नियम होता. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.) ते पातळ शेण अर्धगोलाकार नीटस आकारात दंडाच्या खुब्यापासून संपूर्ण हात वापरून फिरवत, मधेमधे तळहात जागच्या जागी आपटून तळहाताला चिकटून बसलेलं शेण खाली पाडत जमीन एकसारखी सारवणं हे एकाग्र करणारं काम आहे. उत्तम दर्जाचं ध्यान लागण्याइतकं. मग त्या ताज्या सारवणावर, पायाखाली येणार नाही अशा एखाद्या कोपऱ्यात आई शुभ्र रांगोळी रेखायची आणि पांढरी रांगोळी तशीच ठेवायची नाही म्हणून त्यावर हळदकुकंवाची चिमूट टेकवायची. रांगोळी म्हणजे उभ्या उभ्या वाकून भराभर रेखलेली बहुतांश वेळा गोपद्मं, स्वस्तिक, दंडावरचा पृथ्वी गोल वगैरे चैत्रांगणातली शुभ चिन्हं असायची. १८० अंशातले, कोनमापकाच्या आकाराचे ते सारवणाचे फर्राटे सुकले की सुबक दिसतात. मेंदी रंगावरच्या त्या कोनमापकांवर कुठेतरी कोन साधून काढलेली ती रांगोळी फार देखणी दिसायची. का कोण जाणे, पण स्वच्छ, प्रसन्न, आनंदी वाटायचं. ताजं सारवण झालेल्या घरात मनभावन सुवास पसरलेला असतो.
आनंद यादवांच्या आत्मचरित्राच्या एका भागाचं नाव काचवेल आहे. फुटलेल्या बांगड्यांचे रंगीबेरंगी तुकडे आडवे आडवे जोडून जमिनीवर केलेल्या नक्षीला काचवेल म्हणतात. त्यावरून चालताना पायाला लागणार नाहीत अशा बेतानं ते तुकडे जमिनीत रुतवून लावतात. सारवणाच्या जमिनी असणाऱ्या घरांमध्ये अशा काचवेली भरपूर दिसायच्या आणि त्या नक्षीमधून त्या घरातल्या बायकांची कल्पकताही. आमच्या घरी कधी काचवेल केली नव्हती. बहुतेक ती पद्धत शेतकरी कुटुंबांमध्ये आहे.
तर मुख्य मुद्दा आहे उष्टंशेण.
त्या सारवणाच्या शेणातलं थोडं बाजूला काढून ठेवायचं आणि ते उष्टंशेण करायला थोडं थोडं वापरायचं.
जेवायला तर आपण सगळेच पूर्वी एकत्र जमिनीवर बसायचो. मधे अन्नाची भांडी घेऊन त्याभोवती गोल करून. वाढताना आणि जेवताना अन्न खाली सांडतं. बाबा तेव्हा चित्रावळ घालायचे. आता पानाभोवती नुसतं पाणी फिरवतात. तर तो चित्रावळीचा चिमखडा घास असायचा. दररोज जेवणं झाली की पानं उचलून उरलेलं अन्न काढून ठेवून जेवण्याची जागा रिकामी करायची. जेवलेल्या सगळ्या जागेवर हात फिरवून अन्नाचे ते सांडलवंड झालेले कण एकत्र गोळा करून उचलायचे आणि मग पाणी शिंपडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. हे झालं नेहमीचं रुटीन. पण असं करताना अन्नाचे सगळे कण निघतीलच असं नाही. म्हणून थोड्याशा शेणाचा, म्हणजे किती तर अगदी अर्ध्या वाटीभर वगैरे, एक लांबट गोळा करून त्या जेवलेल्या जागेवर व्यवस्थित घोळवून फिरवून घ्यायचा. म्हणजे डोळ्याला न दिसलेले अन्नकणही त्या गोळ्याला चिकटून उचलले जातील आणि ती जागा लख्ख होईल. अन्नाच्या वासानं किडा, मुंगी येणार नाही, एका अर्थानं ते निर्जंतुकीकरणच. शेण गोळा फिरवल्यावर मग पुसून घ्यायचं. उष्टं अन्न गोळा करणारं म्हणून ते उष्टंशेण असावं असा माझा कयास. तो बरोबर आहे की कसं ते सांगा कुणीतरी. हा सव्यापसव्य आमच्या मातोश्रींनी घरी फरशी बसवल्यावरही चालू ठेवला होता. तेव्हा फरशी पुसणं हे सोपं काम झालं होतं, पण उष्टंशेण करायचा मला जाम कंटाळा यायचा. पण करावं मात्र लागायचं. त्याशिवाय आईला शांत, समाधानी वाटायचं नाही.
आता जेवणं झाल्यावर टेबल मॅट्सवर सांडलेले अन्नकण गोळा करून ओल्या फडक्यानं पुसताना हे उष्टंशेण आठवून गंमत वाटते. त्याचवेळी आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या ट्रान्स्फॉर्मेशन्सच्या अद्भुत टप्प्यांनी थक्क व्हायला होतं.
तुमच्या घरी केलं जायचं का हे उष्टंशेण? तुमच्याही आठवणी असतील तर नक्की सांगा.
No comments:
Post a Comment