म्हटले तर माझे विचार , म्हटले तर माझे अनुभव ...

Friday, October 25, 2024

 पुण्यानं बोलीभाषा संकलनाच्या उपक्रमात सर्वात मोठा भ्रमनिरास केला.

अर्थात पुण्यानं जरी कोणत्याही गोष्टींचा मक्ता घेतला नसला, तरी अगदी दिडशे लोक जमवण्यासाठी घाम फुटणं सुद्धा अपेक्षित नव्हतं. सगळ्या कमी जास्त मुद्द्यांसकटही इथं मराठी विषयी थोडी अधिक आस्था आहे, हे एक, आणि अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनंत मराठी बोलीभाषक इथे आताशा मोठ्या प्रमाणावर एकवटतायत, हे दुसरं.
या उपक्रमासाठी स्वतंत्र जाहिरात करावी, एवढी ऐपत या कामासाठी मिळणाऱ्या निधीत नाही. जरी हे काम खुद्द केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयासाठीच चालू असलं तरी. उलट या स्वरूपामुळे अनेक बंधनंच वाटेत येतात. त्यामुळे भिस्त संपूर्णपणे आपापल्या व्यक्तीगत आवाहनांवर, ओळखींवरच. पण त्याही ओळखींची, मैत्री संबंधांची क्वचितच मदत झाली, हे नमूद करायला हवं. खास करून मराठी संदर्भात विविध स्तरावर होणाऱ्या गफलती आणि चुका रोजच्या रोज, कर्तव्य असल्यासारखे दाखवून देणारे लोक, मराठी विषयी चिंतेत असणारे अनेक जण त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्यापर्यंत पुन्हा पुन्हा पोहोचूनही साधी पोहोचही देण्याचं सौजन्य दाखवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी ते करावंच असं गरजेचं नाही, हेसुद्धा खरंच. व्याप असतात, अडचणी असतात, हे काही नसेल तरी यावंसं वाटलं नाही, हेही माझ्या मते पुरेसं सबळ कारण आहे. पण सरसकट दखलच न घेणं हा अनुभव आश्चर्यकारक आहे. जे स्नेही सहभागी झाले त्यांच्याविषयी आदर आहे.
कौतुक आणि त्याचा चमू फार प्रामाणिकपणे, मेहनतीनं आणि अक्षरशः वाट्टेल त्या परिस्थितीत नाउमेद न होता नेटानं हे काम पुढे नेत आहेत. त्यामागे मातृभाषेबद्दलचा जिव्हाळा जास्त आहे. कारण अपुऱ्या निधीमुळे या कामासाठी त्यांना दिडक्याही जेमतेमच मिळतायत. त्यामुळे त्यांच्या चिकाटीचं कौतुक आहे. निदान पुढच्या जिल्ह्यांमध्ये तरी त्यांच्या कष्टांचं चीज व्हावं आणि या उपक्रमाला समाधानकारक प्रतिसाद मिळावा अशी रास्त अपेक्षा आहे.
#Kautuk Shirodkar's Facebook Post dated 26/10/24.

No comments:

Post a Comment