शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे कितीतरी उपाय निघतील आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर.
ज्या ज्या सणा-जयंत्यांना डीजे लागतात, तेव्हा ते उपलब्ध होऊ दिले नाहीत तर? डीजे सप्लायर्सवर दबाव आणला तर? प्रत्येक दहीहंडीच्या खाली, गणपती-नवरात्र मंडपांच्या जागी सतरंज्या अंथरून बिट्ट्या, गजगे, सापशिडी, बुद्धीबळाचे डाव टाकून बसलो तर? घरातून डबे, पाणी आणून अंगतपंगती केल्या तर? पोरांना घेऊन गोष्टी सांगत गप्पा मारत गाणी म्हणत बसलो तर? भोवतीच्या सगळ्या इमारतींच्या रहिवाश्यांनी गच्चीवर उभं राहून खाली (हल्ली कुंड्यांमध्ये भरतात ते) गोटेफेक केली तर? अश्रुधूर केला तर? लाफिंग गॅस सोडला तर? अंगावर खाजकुयल्या टाकल्या तर? धामणीसारखे बिनविषारी साप १२-१५ सोडले तर? लांबून नेम धरून गोफणी फिरवून डीजेच्या जाळ्या फोडल्या तर? कार्यक्रम सुरू झाल्यावर अर्ध्या तासात युक्ती करून कार्यकर्त्यांना भांग पाजली तर? दहीहंडी आपणच दहा फुटांवर बांधून फक्त बाळगोपाळांकडूनच फार तर दोन ते तीन थर बांधून पारंपरिक तऱ्हेनं साजरी केली तर? कशाला हवीत मंडळं? मंडळांचं सद्य काळात प्रयोजन काय उरलंय? प्रत्येक मंडळाच्या संचालक मंडळाला घराबाहेर पडू दिलं नाही तर? कार्यकर्त्यांना दिशाच मिळू दिली नाही तर? बाऊन्सर्स नेमून मंडप उभारू दिले नाहीत तर?
अक्षरशः गळाठून बसलो चार ते दहा. भिंती, दारं, खिडक्या जोरदार हादरत होतं. हतबल वाटलं. एकादुकट्यानं काही केलं तर हकनाक जीव गमवावा लागेल. पोलीस आणि नेते काहीही करणार नाहीयेत कारण त्यांना करायचंच नाहीये.
जेमतेम १००-१५० रिकामे, डोकं बाजूला ठेवलेले लोक लाखो लोकांना वेठीला धरतात आणि ते लाखो लोक काहीही करू शकत नाहीत, ही भलती गंमत आहे लोकशाहीतली.
पण असं खरंच आहे का? आपण बुद्धी वापरू शकत नाही का? जीव धोक्यात न घालता गनिमी कावा वापरून या दडपशाहीला आळा घालता येण्याचे कोणकोणते मार्ग सुचतात तुम्हाला? आपणही दबावगट, दडपशाही करू शकतो की. चांगल्या पद्धतीनं करायची, एवढंच.
देवभोळ्या, सश्रद्ध, नास्तिक, दोन्हीकडे भोज्जे करणाऱ्या, कुंपणावर बसलेल्या, सगळ्यांनी सांगा. वृद्ध व्यक्ती, लहान बाळं, मुलं, परीक्षार्थी, आजारी माणसं, प्राणी, पक्षी, दवाखाने यापैकी काही ना काही घरी, दारी, भोवती असतंच. यातलं काही नसलं तरी त्रास प्रत्येकाला होतो.
No comments:
Post a Comment