गेल्या वर्षी आणि यंदाही, खास करून मागच्या मुसळधार आठवड्यात, दृष्टद्युम्न प्रजापती धुमकेतू वगैरे बारीशकराला हाक मारावी आणि तुझी पोतडी उघडून पावसाला बोलवण्यासाठी जसा मंत्र घालतोस, तसा विश्रांती घेण्यासाठीही छडी फिरवून अल्लामंतर कोल्लामंतर छू कर बाबा म्हणायची फार इच्छा झाली होती. पाऊस तसा व्यक्तीश: लाडका असला तरी विराम घेणारं, दूर जाऊन जवळ येणारं, क्वचित अधेमधे अंतर्धान पावणारंही नातं असेल तर गोडी राहते, त्यातली गत होते पावसाबरोबरही. सारखं अंगचटीला येणं नकोसंच होतं, अगदी पाऊस असला म्हणून काय झालं! पण मुद्दा तो नाही. त्या दोन्ही आठवणींच्या वेळी थोडासा रुमानी बघून घेतला.
मागच्या आठवड्यात 'सुमित्रा भावेंच्या संहितेतलं मानसशास्त्र' ऐकताना सुखांताबद्दलचं त्यांचं तत्त्वज्ञान ऐकल्यावर आठवलेल्या अनेक सुखांतांतही थोडासा रुमानी तो होनाही था. सुखांत येईतोवर तो पाऊस तेवढ्या दोन तासांत साचलेल्या कितीतरी तगमगींवर शिंपड घालतो तो सगळा एकत्र परिणाम जाणवतो आपल्याला. हल्ली आत्मचरित्रं वाचण्यात फारसं स्वारस्य नसतं मला, पण ऐवज आणि तर..अशी सारी गंमत, निव्वळ थोडासा रुमानीची निर्मितीकथा वाचण्यासाठी चाळायलाच हवीत हे सिनेमा बघताना एकदम लक्षात आलं. थोडासा रुमानीतलं पालेकर दांपत्याचं सिंक्रोनायझेशन हेवा वाटावं असं आहे. पटकथेवरचं काव्यात्म संवादांचं नक्षीकाम, भूमिकांमधले चपखल चेहरे आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण जसे सहज लकेर घेत किंवा अर्धवट गुणगुणत असतो तशा हवेतच लाटा आल्यासारख्या चाली. एकातून पुढचीत शिरणाऱ्या. चंदावरकर नेहमीप्रमाणेच खुश करून टाकतात. टायटल सॉंगची छाया गांगुलींची सुरावट विनोद राठोंडाच्या व्हर्जनपेक्षा अधिक खेळकर आणि फिरती असण्यामागेही मला हसरी, खुश, उमेदी स्त्री दिसते.
दोन्ही वेळेस समोर स्क्रीनवर ती शुष्कता, उकाडा दाखवणारे विशिष्ट नमुन्यात भिजलेले कपडे, गळ्यांवरचे ओघळ, कपाळांवरचे घामाचे थेंब बघताना माझ्या मागे पावसाचा जोराचा तडतडबाजा चालू होता. पडद्यावर हिवाळा, पावसाळा हे ऋतू दाखवणं त्यातल्या त्यात सोपं पडत असेल, पण उन्हाळा कठीण असावा. वाळवंट किंवा दुष्काळी भाग असेल तर रखरख शक्य आहे, बनगरवाडीतली रखरख तर विशेष आठवते. पण उकाडा, काहिली कशी दाखवणार? तेही पचमढीसारख्या सदाहरित ठिकाणी. पण कळते ती.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बघावा थोडासा रुमानी. भुरळ आहे. कोट म्हणून एखादं वाक्य, ओळ उचलावी म्हणलं तर अख्खी संहिताच चिमटीत धरून ठेवावी लागेल. प्रेम, उमेद, विश्वास, आनंद, आंतरीक सौंदर्य, स्वतःचा जसाच्या तसा स्वीकार, खळखळून हसणं, निखळ निकोप दृष्टिकोन, भान, यांच्या व्याख्या आणि गरज, दोन्हींची उजळणी करून घेतात पालेकर्स. पूर्वग्रह, आढ्यता, अहंकार अशी तणं छाटा म्हणतात. स्त्रीत्व म्हणजे काय हे तर बारीशकरच्या तोंडून ऐकावं. त्या पात्राचं प्रयोजन आणि नाना पाटेकरांची अभिव्यक्ती यावर बोलण्याएवढी माझी कुवत नाही. पण बिन्नीबरोबरचे संवाद, खास करून भग्न इमारतीतले, आणि चेहरा तादात्म्य दाखवतात. युट्यूबवर कुणीतरी त्यांना या भूमिकेसाठी सबलाईम म्हटलंय, ते सार्थ आहे. स्वतःला सापडलेल्या बिन्नीचं सोसाट्याच्या वाऱ्यानं रसपानाला बोलावल्यासारखं झालेलं भिरभिरं अनिता कंवर सॉलिड दाखवतात.
पारायणं करण्याची चीज आहे ही माझ्यासाठी. त्यावर बोलत किंवा लिहित बसणं फोल आहे. कालातीत गोष्टींवर काही लिहिणं-बोलणं तसंही अनावश्यक. तस्मात्, ते न करणं हितकर.
No comments:
Post a Comment