अलीकडेच हे वाचलं. मला अजूनही ठरवता येत नाहीये की ते मला आवडलं की नाही. एवढा गोंधळ आजवर कधीही उडालेला नाही.
पूर्वार्ध वाचताना विचित्र भावना होती. अघोचरपणा, बेजबाबदारपणा, का ही अवदसा आठवावी इथपर्यंत पुष्कळ विचार मनात येऊन गेले.
उत्तरार्धात ही भावना थोडी उणावली. पुरती गेली असं म्हणता येणार नाही. लेखिकेच्या अनुभवांनी एक कंफर्ट येत जातो, मी घटनांना सरावत गेले म्हणूनही असेल, पण वाचताना बरं वाटायला लागलं. काही घटनांमध्ये छानही वाटलं.
तरीही संपूर्ण पुस्तकभर एक वरवरची व्हाईब जाणवत राहिली. वास्तविक विषय अतोनात गंभीर. प्रवास अत्यंत जोखमीचा, त्यातून एकल आणि स्त्रीचा. ज्या ज्या संवेदनशील संवेदनशील म्हणून गोष्टींशी आपली एरवी निरनिराळ्या स्वरूपात गाठ पडत राहते, त्या एकजात सगळ्या या पुस्तकात एकत्र आलेल्या आहेत. पण..! पुस्तक पूर्ण करून हातातून ठेवलं तरी मी या सबंध खटाटोपानं अजिबातच कंव्हिन्स झाले नाही, अपेक्षित गांभीर्य कुठं जाणवलंच नाही. ते अपेक्षित नको होतं का, हेही ठरवता येईना मला.
तसं बघायला गेलं तर मी संकुचित विचारांची नाही. एकल प्रवासाच आता नवा उरला नाही. पण तरीही हा प्रवास पटला नाही. बेफिकीरी वाटली. एवढं करून लहानपणचा एक प्रसंग रिव्हिजीट केल्याला स्वप्नपूर्ती म्हटलंय, जो संपूर्ण खटाटोपाचा मूळ अजेंडा नव्हताच. एलओसीवर जाणे आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे या जोरदार ऊर्मीतून संपूर्ण प्रवास केला गेला. जी माझ्या मते क्षणिक म्हटली पाहिजे, कारण आधी तिचा काही मागमूस नव्हताच. आपण जेव्हा संसार मांडतो आणि स्वखुशीनं मुलं जन्माला घालतो, तेव्हा भारतीय समाजापुरतं बोलायचं झाल्यास ती संपूर्ण स्वावलंबी झाल्याशिवाय संसारावर निव्वळ स्वतःच्या लहरीखातर बोळा फिरवू शकेल अशी जोखीम पत्करणे कितपत व्यवहार्य होतं हा प्रश्न पडला आहे. वारीला पूर्वी लोक घरावर तुळशीपत्र ठेवून निघायचे, असं ऐकलंय, एका अर्थाने तो प्रकार. पासपोर्टादी कागदपत्रे अनोळखी लोकांच्या हातात कोण देतं, देईल का कल्पना नाही. मी फक्त हतबुद्ध होऊन वाचत गेले. काही विपरीत घडलं असतं, आणि ते घडण्याची शक्यता पुष्कळ होती, तर काय, या विचारानं मीच घरच्यांच्या भुमिकेत शिरले होते. त्यांची म्हणजे इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती होती.
लेखिका सुखरूप परतली म्हणून या सगळ्या मुद्द्यांचं महत्त्व कमी होत नाही. चांगल्या विचारानं निघालीये तर चांगलीच माणसं भेटतील हा भाबडेपणा अगदीच पचनी पडला नाही, प्रत्यक्षात खरोखरच चांगली माणसं भेटत गेली, तरीसुद्धा. वाचताना प्रत्येक प्रसंगात केवळ घरातल्या प्रेमळ माणसांचाच विचार येत राहिला.
No comments:
Post a Comment