ऋषीची भाजी
#ऋषीपंचमी #वृषभपंचमी
काल पहिल्यांदाच ऋषीची भाजी केली. सगळे प्रकार मिळून साधारण वीसेक भाज्या घेतल्या. दिनेशनी Dinesh Shinde लिहिलेल्या पद्धतीत उपलब्धतेनुसार आणि चवीनुसार थोडेसे बदल केले.
काळे पोलीस आणि पांढऱ्या घेवड्याच्या शेंगांचे दाणे, ऊसावरच्या शेंगा, श्रावण घेवडा, तांबडा माठ आणि देठं, भाजीचा अळू आणि देठं, राजगिरा, आंबट चुका (अर्धी जुडी), आर्वीचे कंद, सुरण, कच्ची केळी, रताळी, मक्याची कणसं, तांबडा भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, घोसावळं, जाड काकडी या भाज्या आणि वाटीभर कच्चे शेंगदाणे घेतले. यापैकी शेंगांचे तुकडे आणि दाणे काढणं हे आधल्या दिवशी केलं. मीठ, काळ्या आणि पाणीदार दोन्ही मिळून ओल्या मिरच्या, ओलं खोबरं वाटून घेतलं. त्याशिवाय थोडी नुसती ओली मिरची मीठाशी वेगळी खरडून ठेवली.
सुरणाचे तुकडे, अळू आणि चुका हे चिंच घालून वेगळे शिजवून मग अळू चुका घोटून घेतले, चिंच काढून टाकली. तांबडा भोपळा मायक्रोवेव्हमध्ये वाफवला. आर्वी, रताळी आणि कणसं मीठ घालून वेगळी उकडली. हिरव्या शेंगांचे तुकडे, कच्चे शेंगदाणे, निवडलेले कोवळे दाणे, पालेभाज्या आणि सगळ्या फळभाज्या थोडं मीठ घालून एकत्र शिजवल्या.
सगळ्यात शेवटी एका मोठ्या भांड्यात हे सगळं एकत्र केलं. चिंच घातली, मिरची खोबऱ्याचा वाटलेला गोळा लावला आणि मीठाचा अंदाज घेऊन चव सारखी केली. आधणाचं पाणी घालून कंसिस्टंसी सरसरीत ठेवून भरपूर रटरटवली. घरात भरपूर ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे चव फार झणझणीत ठेवली नाही. तिखट हवं असलेल्यांनी मीठाशी खरडलेली ओली मिरची लागेल तशी घ्यावी म्हणून वेगळी वाटून ठेवली. वाढून घेताना वरून तूप आणि लिंबू पिळून घेतलं.
थोडेसे जे बदल केले ते म्हणजे उकळी येऊन काही वेळानं चव सेट झाल्यावर भाजीची दोन व्हर्जन्स केली. एक भाग बेसिक भाजी. दुसरा भाग कंटेंपररी भाजीचा केला. थोडी धणेपूड, जिरेपूड, थोडा गूळ घालून तिला तुपजिरेहिंगाची उभी फोडणी दिली. रात्री काकूनं पुन्हा थोड्या भाजीला नुसत्या तांबड्या तिखटाचीही फोडणी दिली, तर माझ्या मुलानं खाताना बेसिक भाजीत सोलापुरी शेंगा चटणी घालून भाजी खाल्ली, चांगली लागली. नुसती खाताना लोणच्याचा खार किंवा लोणच्याचं तेल, मोहरीचं तेल, जवसाची किंवा कारळ्याची चटणी वगैरे अनेक चवींची भर घालता येईल.
भाजी चांगली झाली असं घरच्यांनी, मुख्य म्हणजे मुलानं सांगितलं. काका आणि आत्या तर एवढी भाजी बघून चिंतेत पडले की ही संपणार कशी. प्रत्यक्षात मात्र सगळ्यांना थोडी थोडी देताना आमच्यासाठी राखून ठेवायची वेळ आली.
चार वर्षांपूर्वी दिनेश आणि आम्ही कोल्हापुरात शेजारी राहत असताना त्यांनी केलेली भलीमोठी ऋषीची भाजी आम्ही चार दिवस चापत होतो. जसजशी ती मुरत गेली तशी अधिक चवदार होत गेली. त्यांनी पारंपरिक पद्धतीनं सगळं एकत्र शिजवत घातल्यामुळे ती अर्थातच जास्त चविष्ट होती. मी सगळं वेगवेगळं उकडून घेतल्यामुळे चवीत फरक पडला हे माझं वैयक्तिक निरीक्षण, बाकी सगळ्यांनी पहिल्यांदा खाल्ल्यामुळे त्यांना चांगली वाटली.
त्याआधी आणि नंतर कुणी कुणी केलेली वाटीभर चमचाभर अशीच चाखली होती, आमच्या घरी कधी कुणी केली नव्हती. पंचमीला रविवार आल्यामुळे as a family exercise सगळ्यांनी मिळून करू, असं मी घरच्या ग्रुपवर जाहीर केलं. पण बरेचसे शिलेदार आडवे असल्यामुळे फक्त धाकट्या काकूनं हिरवा कंदील दाखवला आणि तीही सुरसुरत होती तरी गोळी घेऊन माझ्या हौसेसाठी बरोबरीनं तिनं सगळं केलं. एकटी करत बसले असते तर खात्रीनं एखाद्या टप्प्यावर माझा उत्साह मावळला असता कारण मला खटाटोप नको असतो. पण काकूमुळं कंटाळा आला नाही.
याउलट दिनेशना जात्याच आवड, उत्साह आणि उरक आहे. ते एकहाती करतात सगळं. भाज्या गोळा करताना कोल्हापुरातले सगळे भाजी बाजार आणि उपनगरी भाजी विक्रेते त्यांनी पालथे घातले होते. मला भाजी आणणे आणि निवडणे अशी आधल्या दिवशीची तयारी आणि दुसऱ्या दिवशी दोघींनी मिळून चिराचिरी, प्रत्यक्ष रांधणे एवढा वेळ लागला. फुले मंडईत भाज्या एकत्र मिळत असतील तर कल्पना नाही, कारण या दिवसांत त्या भागात कधी जाणं होत नाही. जेवताना उंधियोची आठवण आली सगळ्यांना. उंधियो जसा सगळे मिळून करतात, तशी ऋषीची भाजीही एका परिसरातले मित्रमैत्रिणी किंवा शेजारी मिळून करायला हवी.
No comments:
Post a Comment