८८ वर्षांच्या कर्तबगार बंधूराजांनी लाडक्या ऋषितुल्य बहिणीच्या आठवणी सांगितल्या, तिची गाणी गाऊन घेतली, तिच्या आवडीचे स्वादिष्ट पदार्थ जेवू घातले आणि तिचा ९५ वा वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमात संजीवनी भेलांडे लक्षवेधक होती. विभावरी जोशी आणि मनिषा निश्चल सुरेख गायल्या. अजीत परबांनी गाणी आणि लय चुकीची निवडून अनपेक्षितपणे निराशा केली. मात्र संजीवनीनं अर्धा कार्यक्रम एकटीनं पेलला, जवळपास उचलून धरला. थोडंफार निवेदनही तिनं स्वतःच केलं, पण सलग सव्वा तास बऱ्यापैकी अवघड गाणी गाऊन तिनं तिचं पारितोषिकही योग्य असल्याचं दाखवून दिलं.
सत्कार आणि पारितोषिक समारंभ ठीकठाक होते. भोजनाचा बेत मात्र खरोखरच उत्तम आणि विचारपूर्वक ठरवलेला होता. दीदींच्या आवडीचे तसे रग्गड पदार्थ असतील, पण त्यातले निवडक आणि उपस्थितांमध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर असणार हे लक्षात घेतलेलं होतं. आपण घरी करतो तशी उकडलेल्या बटाट्याची भरपूर कढीलिंब घातलेली तांबड्या तिखटातली भाजी, हिरव्या वाटणातली चवदार काजू मटार उसळ, सौम्य तोंडली भात, खुसखुशीत कोथिंबीरीची वडी, कुरडया, पुऱ्या, अतीगोड नसलेलं आम्रखंड आणि साजूक तुपातली, खाववेल अशी माफक गोड जिलेबी. अजिबात मसाले नसलेले पूर्णपणे घरगुती मराठी पद्धतीनं रांधलेले पदार्थ वाफाळते होते. हवेत चांगला गारवा होता, त्यामुळे या जेवणाची लज्जत वाढली. पंडितजींनी आवर्जून भोजनाबद्दल सांगितलं आणि ते तसंच होतंही, म्हणून हा वर्णनाचा प्रपंच केला.
सहा सात तासांच्या कार्यक्रमात शेवटचे तीन तास पंडितजींनी सूत्रं हातात घेतली. कार्यक्रम संपेतोवर ते थकून गेले होते. खरंतर यातल्या बऱ्याच आठवणी त्यांनी एबीपी माझा कट्ट्यावर पंधरा दिवसांपूर्वीच सांगितल्या होत्या. ते नुसते उपस्थित राहते तरी पुरेसं होतं. हयातभर त्यांनी चिक्कार काम केलंय, तेही सगळी ऊर्जा पिळून काढणारं, चिरंतन राहील असं. ते काम शक्य तितक्या प्रकारे रसिकांपर्यंत पोचवण्याचेही जीवापाड प्रयत्न केलेत. आता त्यांनी ही कार्यक्रमांची धावपळ कमी करावी आणि आराम घ्यावा. दीदी गेल्यापासून त्यांची तब्येत बरी नव्हती. आताआताशा त्यांनी उभारी धरली आहे. आम्हाला ते जास्तीत जास्त हवे आहेत, त्यांनी स्वतःला जपावं ही कळकळीची विनंती.
No comments:
Post a Comment